________________
२७ प्रकरण पहिले.. करतांच हा पुंडावा बंद पडला. कुष्टोबा गरिबांस पीडित नसे उलट त्याचे त्यांनां सहाय्यच मिळत होते. त्यामुळे गरीब लोकांत त्याच्याविषयी बरीच सहानुभूति होती; परंतु साधारण धनिक वर्गाला त्याने बरेच त्रास दिले होते. दादा राण्याचे बंड:-इ. स. १८९४ सालीं मोझांबिक येथें काफ्रीलोकांनी बंड केल्यावरून पोर्तुगाल सरकार त्यांशी लढाई चालवीत होते. तेथे कुमकेसाठी गोव्यांतील शिपायांना पाठविण्याचा हुकूम १८९५ साली आला. आधींच परदेशगमन म्हणजे हिंदु लोकांना मृत्युसमान वाटे, त्यांतहि जाणाऱ्या शिपायांना दुसऱ्या वसाहतींत जाण्याबद्दल कोणत्या सवलती मिळावयाच्या तें हुकुमांत उल्लेखिले नव्हते. म्हणून त्याच सालच्या सप्टेंबर महिन्यांत शिपाई लोक छावणीतून निघाले व त्यांनी शस्त्रे वगैरे घेऊन शांतपणे सत्तर प्रांतांतल्या नाणसाच्या किल्ल्यांत तळ दिला. आपल्याला मोझांबिक येथे पाठवू नये एवढीच काय ती त्यांची मागणी होती. परंतु ती पुरविणे गव्हर्नराच्या अधिकारांतले नव्हते. म्हणून गव्हर्नर साहेबांनी पोर्तुगालास तारेने कळविलें. तारेचे उत्तर नकारार्थी आले व व ते शिपायांना नाणस येथे कळतांच त्यांनी राणे लोकांना बंडास प्रवृत्त केले. या बंडाचे नेतृत्व दादा राणे अडवईकर यांनी स्वीकारलें. गोव्यांतील ख्रिस्ती वृत्तपत्रांतून त्या वेळी कांहीं युरोपियनांविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाचे कडक लेख येत होते. त्या वादामुळे यांत भरच पडली, व बंडास गोमांतकीय विरुद्ध पोर्तुगीज असें स्वरूप सरकारांत मिळाले. सदनशीर हक्क ताबडतोब तहकूब केले गेले व गोमंतकभर मार्शल लॉ पुकारला गेला. संपन्न अशी जी कुटुंबे गोव्यांत होती ती भराभर ब्रिटिश हद्दीत कारवार, खानापूर, बेळगांव, वेंगुर्ले, सावंतवाडी इत्यादि ठिकाणी पळाली. धूर्त ब्रिटिश सरकारने त्यांची बरदास्तहि सुरेख ठेविली. याच शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांनी गोवें घेण्याचे जे प्रयत्न केले व ज्यांची हकीकत स्वतंत्रपणे याच प्रकरणाच्या अंती देण्यात येणार आहे, त्यांशी या बरदास्तीचा संबंध गोवेंकरांनी सहजच लावला. __सरकार गोंधळून गेलें व गव्हर्नर साहेबांनी ब्रिटिशांची मदत मागण्याचा बेत देखील केला. परंतु त्यांचा हा ठराव कौन्सिलांत ५ मते ठरावाच्या बाजूस तर पांच मतें विरुद्ध पडून गव्हर्नरच्याच कास्टिंग व्होटवर अवलंबून राहिला होता. इतक्यांत बंडखोर शिपाई आग्वादचा किल्ला हस्तगत करून पणजीवर चाल करून येण्याच्या बेतांत आहेत अशी बातमी गव्हर्नरच्या आजुदांत द कांप ( ऑर्डली ) ने आणली व त्यामुळे कौन्सीलच घाईघाईनें बरखास्त करण्यांत आले.