पान:गांव-गाडा.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७६      गांव-गाडा.

जंगलबंदीमुळे असाम्यांना महार सरपण पुरविण्यास व मांग केरसुण्या, दोरखंड पुरविण्यास असमर्थ झाले आहेत. सुताराला व लोहाराला काम होऊन उरलेले सरपण ठेवू देणे नुकसानीचे झाले आहे. धान्याचे, चाऱ्याचे व लांकडाचे भाव कडकले आहेत. असे सर्व प्रकारे मन्वंतर झाले आहे. तरी सर्व कारूनारू आपले हक्क पूर्वीप्रमाणे उकळतात, इतकेंच नव्हे तर जास्तही उपटतात, आणि कुणब्याचा आडवा नाडा पङल्यामुळे तो चुंबित सर्वांची भरती करतो. कुणबिकीचे उत्पन्न उघडे असल्यामुळे आणि तोच प्रधान धंदा असल्यामुळे बळीराजा सर्वांचा पोशिंदा जो एकदां कधी काळी ठरला तो आतां ज्येष्ठ-आषाढांतील बैलाप्रमाणे उठवणी आला आहे तरी त्याची झटें कमी होत नाहीत. कुणबी व कारूनारू ह्यांजवळ तपास करतां असें समजतें की बलुते, आणि आलुतें मिळून राशीचा शेकडा २२ ते २५ मुख्य धान्य जाते. याखेरीज किरकोळ धान्य, भाजीपाला, गवत, काडी, सणवार, शिधा, वाढणी, पंक्तीचा ठाव वगैरे. कुणब्याचा हात नेहमी वर असतो, असे म्हणतात. ही माहिती मिळवितांना बहुतेक कुणबी ती देण्याचे नाकारीत आणि दिलदारपणाने म्हणत की, 'आपल्या हाताने दिलें मग त्याचा उच्चार कशाला पाहिजे !' यावरून असे वाटते की, ते देतात त्यापेक्षा कमी सांगतात. कारूनारू तर खात्रीने कमी सांगावयाचे. अशी ही दुहेरी छपवाछपव ध्यानांत आणली म्हणजे असा अंदाज बांधण्यास हरकत नाही की, आलुत्येबलुत्ये व भिकार कुणब्याचे देखत किंवा हातून त्याच्या उत्पनाचा कमकसर तिसरा हिस्सा घेऊन जात असावें, व चोरट्यांची तस्करगिरीची कमाई ह्या खेरीज असावी.

 ह्या राज्यापूर्वी मिरासदार उपऱ्यांची स्थिति कशी होती, तिच्यांत काय फेरबदल झाला आहे, उदमी हळकरी कुणब्याला कसे लुबाडतात, त्याला आपला माल बाजारांत कां विकता येत नाही, इत्यादींचे वर्णन पूर्वी आलेच आहे. ह्या ठोकरींचा व त्यामुळे मागे लागलेल्या भगभगीचा परिणाम त्याच्या सांपत्तिक स्थितीवरच नव्हे तर देहस्वभावावरही झाला