पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१. नाणे निधी - एक शेवग्याचे झाड


 नेहरू अर्थशास्त्राचा पाडाव झाला आहे, याची कबुली लाजत लाजत लपूनछपून दिली जात आहे. देशाची प्रगती व्हायची असेल तर जुन्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे हे मान्य केले जाते. अर्थव्यवस्था अधिकाधिक मुक्त व्हावी, लायसेन्स-परमीटचे राज्य जावे, सूट सबसीडींचे खेळ बंद करावे, रोजगार व्यवसायास महत्त्व द्यावे, हे सगळे म्हटले जाते. पण, हे म्हटले जात असताना नेहरूचे नाव घेऊन त्यांनी सांगितलेल्या अर्थशास्त्राचा पाडाव झाला आहे असे कुणी म्हणत नाही.
 नेहरूवादाचा पाडाव हा अपरिहार्यच होता. शेतकरी आंदोलनाची आर्थिक भूमिका हीच मुळात नेहरूवादाविरुद्ध होती. स्टॅलिनने रणगाड्याने केले ते नेहरूंनी जास्त सभ्य मार्गाने केले, एरव्ही फरक काही नाही, हे संघटनेने आवर्जून सांगितले. स्टॅलिनने शेतकऱ्यांवर रणगाडे पाठवले त्याच दिवशी सोव्हियेट युनियनमधील कम्युनिझमचा पाडाव झाला होता. त्यानतर जीवाच्या आकांताने प्रयत्न झाले ते कम्युनिझमची अवस्था कशीबशी सांभाळून नेण्यासाठी. कम्युनिस्ट अर्थव्यवस्थेच्या श्रेष्ठतेच्या वल्गना झाल्या, पण तिचा पाडाव झाला आहे हे सोवियेट संघातील धुरिणांनासुद्धा पक्के उमजले होते. ख्रुश्चेवने काही प्रमाणात मुक्त अर्थव्यवस्था आणण्याची सुरुवात केली. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर तीन दशके उलटून गेल्यानंतर मुक्त व्यवस्थेची खुलेआम घोषणा करणारा गोर्बाचेव अवतरला. नेहरूवादाचा खुलेआम धिक्कार करणारा भारतीय गोर्बाचेव प्रकट व्हायला किती वर्षे लागतील कुणास ठाऊक? नेहरू महात्मा गांधींचे राजकीय वारस होते, पण आर्थिक प्रश्नांवरील दोघांच्या विचारात सापमुंगसाचे वैर होते. नेहरूच्या औद्योगिक धोरणाविरुद्ध आपणास लढा द्यावा लागेल आणि प्रसंगी नेहरूराजवटीच्या तुरुंगात जावे लागेल असे गांधींनी स्पष्ट नमूद केले होते. गांधीनेहरू हा द्वंद्वसमास वेदोपनिषद या समासासारखा आहे. आर्थिक प्रश्नांवर तरी नेहरू आणि गांधी उलटी टोके होती.

 नेहरू-अर्थशास्त्र म्हणजे काय? या अर्थशास्त्राची दोन प्रमुख सूत्रे

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने