पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८ । केसरीची त्रिमूर्ति

यांचा अभाव यांत कंसलाहि कार्यकारणसंबंध दाखवितां येत नाही. दहाव्या शतकानंतर अफगाण, घोरी, मोगल, इराणी यांची आक्रमणें सुरू झाली. त्या वेळी चव्हाण, राठोड, यादव, सेन यांची पूर्वीप्रमाणेच मर्यादित अशी राज्ये भारतांत होती; पण त्यांच्यांतला जोम नष्ट झाला होता. त्यामुळे त्यांना या आक्रमणाला तोंड देतां आलें नाही; आणि याचीं कारणें निवृत्ति, शब्दप्रामाण्य, कर्मकांड, सिंधुबंदी, स्पर्शबंदी इत्यादि शृंखला, विद्याविमुखता, अंधश्रद्धा, विषम, अन्यायी, जुलमी समाजरचना, ही होतीं. थोड्याफार निराळ्या शब्दांत लोकहितवादी, रानडे यांनी आपल्या अवनतीची हीच मीमांसा केली होती; आणि आज, साधारणतः नवव्या-दहाव्या शतकापासून हिंदुस्थानचा ऱ्हासकाळ सुरू झाला व तो वरील करणांमुळेच झाला, असेंच डॉ. मुनशी, म. म. मिराशी, डॉ. आळतेकर, चिंतामणराव वैद्य, डॉ. मुजुमदार, इत्यादि बहुतेक सर्व थोर इतिहासपंडितांनी मत मांडलेलें आहे. या ऱ्हासकाळांतहि रजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांनी हिंदु समाजाचें संरक्षण केलें हें खरें; पण पाश्चात्त्य राष्ट्रांपुढे त्यांचाहि पराक्रम चालला नाही. या काळांत त्यांनी पूर्वीप्रमाणे प्रवास केला असता, जगभर व्यापार वाढविला असता, विज्ञानाची जोपासना केली असती, नवी युद्धविद्या हस्तगत केली असती, विचारस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य प्रस्थापित केलें असतें, लोकहितवादींनी म्हटल्याप्रमाणे इतिहास लिहिला असता, भूगोल पाहिला असता, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या भाषांचा अभ्यास केला असता, निवृत्तिवाद, कर्मकांड यांचा समूळ उच्छेद केला असता, तर पुढे जपानने जें चाळीस-पन्नास वर्षांत करून दाखविलें तें रजपुतांना, मराठ्यांना, शीखांना करतां आलें असतें; पण या सामाजिक, राजकीय, धार्मिक, वैज्ञानिक, बौद्धिक, क्रांतीच्या तत्त्वांची त्यांना पुसटसुद्धा ओळख नव्हती. बंगाल, गुजरात, तमीळ, सिंधु, आसाम, काश्मीर, उत्तरप्रदेश, ओरिसा, बिहार येथील लोकांना तर जगाकडे डोळे उघडून पाहण्याची सुद्धा या काळांत शक्ति नव्हती. त्यामुळे ते नवव्या-दहाव्या शतकापासून जे सत्त्वहीन झाले ते परवापर्यंत.
परागतीचे कारण
 बाराव्या-तेराव्या शतकापासून पश्चिम युरोपांत वरील सर्व तत्त्वांचा तत्त्ववेत्ते, विज्ञानवेत्ते, राज्यकर्ते, पंडित, सामान्य जन, आणि कोठे कोठे धर्मवेत्तेहि अंगीकार करीत होते आणि आपापल्या देशांत सर्वांगीण परिवर्तन घडवून आणीत होते. त्यामुळेच त्यांची अपूर्व प्रगति झाली. ते जगभर साम्राज्य स्थापूं शकले. उलट पूर्व युरोपांतील देशांनी हीं तत्त्वें स्वीकारली नाहीत. पोलंड, रुमानिया, बल्गेरिया इत्यादि पूर्व युरोपांतले देश विस्तीर्ण नव्हते, लहान, आटोपशीर होते; पण तरीहि ते मागासलेलेच राहिले. तेव्हा देशाचा लहान किंवा मोठा विस्तार यावर कांही अवलंबून नसून सामाजिक, धार्मिक, आर्थिक क्रांतीवरच प्रगति-परागति अवलंबून असते.