पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-१-

चित्कळेचा स्पर्श


 १८७४ ते १८८२ हा निबंधमालेचा कालखंड होय. याच्या आधीचा साधारण वीस वर्षांचा काळ आणि नंतरचा वीस वर्षांचा काळ यांचा महाराष्ट्रांतील मानवी कर्तृत्वाच्या दृष्टीने विचार केला तर काय दिसेल ?
चित्कळा
 १८८२ नंतरच्या वीस वर्षांत महाराष्ट्रियांच्या कर्तृत्वाला प्रत्येक क्षेत्रांत विलक्षण बहर आलेला दिसतो. प्रत्येक क्षेत्रांत नवें तेज निर्माण झालें, नवी चित्कळा रूपास आली, नव्या सौंदर्याचीं झगमगीत किरणें फाकूं लागलीं असा प्रत्यय येतो. लो. टिळक, आगरकर, न. चिं. केळकर, काकासाहेब खाडिलकर, शिवरामपंत परांजपे, महाराज सयाजीराव गायकवाड, ना. गोखले, चाफेकर बंधु, राजवाडे, खरे, गो. स. सरदेसाई, पारसनीस, पांगारकर, अण्णासाहेब कर्वे, अण्णासाहेब किर्लोस्कर, देवल, श्री. कृ. कोल्हटकर, पं. पलुसकर, पं. भातखंडे, पं. बखले, भाऊराव कोल्हटकर, हरिभाऊ आपटे, केशवसुत, शं. बा. दीक्षित, चिंतामणराव वैद्य हीं नांवें पाहा. वृत्तपत्र, ग्रंथ, निबंध, इतिहास-संशोधन, शास्त्र-संशोधन, काव्य, कादंबरी, नाटक, लघुकथा, विनोद, चरित्र, राजकीय जागृति, समाजसुधारणा, धर्मजागृति, अर्थकारण, कला, शिक्षण, इत्यादि मानवी संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांत कार्य करणाऱ्या थोर पुरुषांचीं हीं नांवें आहेत. त्यांतील कांही नांवें हीं दोन-दोन, तीन-तीन क्षेत्रांत ख्याति पावलेली असून कांहींना अखिल भारतीय कीर्ति मिळालेली आहे.