आणि पंचक्रोशी ह्या यात्रा कराव्या लागतात. ह्यांच्याबद्दल तपशिलवार हकीकत मागाहून लिहीन.
गंगेस आशी, दशाश्वमेध, मणिकर्णिका, पंचगंगा आणि वरुणा हे पांच मुख्य घाट ३ कोसांच्या लांबीत आहेत. येथे प्रत्येक ठिकाणी यात्रेकऱ्याने श्राद्ध करावे लागते.
प्रथमतः यात्रेकरी काशी क्षेत्रीं गेला म्हणजे त्यानें क्षौर करून माणिकर्णिका तीर्थप्रयुक्त श्राद्ध करावे लागतें. नंतर वर लिहिलेली पांच श्राद्धे केली पाहिजेत. पुढे पंचक्रोशीच्या वाटेनें ५ श्राद्धे केली पाहिजेत.
आतां महाराज पत्रविस्तार फार झाला सबब पुरे करितों. लोभ असावा हे विनंती.
एडिटराचा मित्र एक
फिरस्ता.
ता० जानेवारी १८७२.
ज्ञानप्रकाशकर्ते महाराज,
वि० वि०. रेल्वे ह्या देशांत होण्यापूर्वी वाराणशी ही जागा पंजाब, काश्मीर आणि काबूल तसेंच बंगाल, बहार, आढीया, ब्रह्मदेश आणि नेपाळ ह्या प्रांतांची आणि दक्षिण हिंदुस्थानांतील प्रांतांची व उत्तर हिंदुस्थानांतील प्रांतांची व्यापाराची एक मोठी उतार पेंठच होती. तो संबंध आतां अगदी सुटला यामुळे व्यापाराच्या निमित्तें जें वैभव ह्या स्थलास आले होतें तें अगदींच कमी झाले असे म्हटले तरी चालेल. आतां देखील येथे व्यापार मोठा होतो, परंतु तो फक्त यात्रेच्या संबंधाने जो होतो तितकाच मात्र. इतर पालवी त्याच्या अगदी नाहीशा झाल्या.