पान:करुणादेवी.djvu/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते बोललो. तुला छळले. तू सारे सहन केलेस. तुझ्या पवित्र पातिव्रत्यावरही शितोडे उडवले. अरेरे ! झडो माझी जीभ. करुणे, तू किती कष्ट करतेस. सारे आमच्यासाठी. तू रानावनात जात असस. पायांना तुझ्या फोड येत. हातांना लाकडे तोडून घट्टे पडत आणि वाटेल ते बोलून तुझ्या हृदयासही आम्ही घरे पाडीत असू. तू उपाशी राहून आम्हाला जगवीत होतीस. तू कोंडा खाऊन आम्हास चांगले देत होतीस. तरी मी तुला उलट म्हणत असे, की तूच चांगले खातेस, आमची उपासमार करतेस. मुली ! क्षमा कर आम्हाला. पुत्रवियोगाच्या दुःखामुळे तुला बोलत असू. आमचा बाळ गेला. आम्हाला विसरला. तूच आता आमचा मुलगा. तूच आधार. ये अशी जवळ ये. तुझ्या डोक्यावरून हात फिरवू दे. तुझे अश्रूपुसू दे. ये, ये हो जवळ, ”

 आणि त्या वृद्ध दुर्बळ सासूने सुनेला जवळ ओढून घेतले. करुणेने सावित्रीबाईच्या वक्षःस्थलावर डोके ठेवले. तिला हुंदके आवरत ना.

 “ उगी. नको हो रडू बाळ. उगी उगी. तुझे सारे चांगले होईल. शिरीष तुला भेटेल. आमचे आशीर्वाद आहेत हो तुला. तू सुखी होशील. अमावास्येची पौर्णिमा होईल. दुर्दैव जाऊन सुदैव फुलेल हो,"

 किती तरी दिवसांनी अशी प्रेमळ, अमृतमय वाणी करुणेच्या कानी आज पडत होती. धान्यपाण्याचा दुष्काळ ह्या वर्षी होता; परंतु शिरीष गेल्यापासून करुणेच्या जीवनात प्रेमाचा, सहानुभूतीचा, सदैव दुष्काळच होता. तिला एक थेंबही मिळत नव्हता. ती किती तरी दिवस प्रेम व सहानुभूती ह्यांची भुकेली होती. आज तो दुष्काळ संपला. बाहेरचा दुष्काळ अद्याप होता. पाऊस अजून पडायचा होता. मेघ यायचे होते. परंतु करुणेच्या जीवनात आज प्रेमाचे दोन मेघ आले. सासूबाईंनी तिला प्रेम पाजले. तिने त्यांना पेज दिली, परंतु त्यांनी तिला माया ममता दिली इतक्या वर्षाचे श्रम सफल झाले. सासूसासच्यांनी वाहवा केली. प्रेमाने पाठीवरून हात फिरविला. दुःखी करुणा प्रसन्न झाली.

दुःखी करुणा * ४१