एके दिवशी हेमा शीतला नदीच्या तीरी मैत्रिणीसह हिंडत होती. शिरीषही नदीतीरी होता. शेकडो लोकांची जा- ये सुरू होती. शिरीष एकटाच तीरातीराने गेला व एका झाडाखाली बसला. तो शून्य दृष्टीने कोठे तरी पाहात होता ! त्माला का आईबापांची आठवण येत होती ? करुणेची आठवण येत होती ?
ती पहा हेमा पळत पळत येत आहे.
" काय झाले ? का पळता ?” शिरीषने विचारले.
“ तुमच्याजवळ दोन शब्द बोलावे म्हणून.”
“ त्यासाठी पळत येण्याची काय जरूरी ?"
“ मैत्रिणींना चुकवण्यासाठी. हं, बोला. दोन शब्द बोला.”
“ दहा शब्द झाले, ” तो म्हणाला.
“ शब्दात पकडणे बरे नव्हे.”
"मग कशात पकडाचे ?"
“ प्रेमात पकडावे."
“ मला काही समजत नाही.”
“ तुम्ही तर सर्वात हुशार असे सारे म्हणतात.”
"म्हणोत बिचारे, ”
“ तुम्ही दु:खी का ? तुम्हाला घरची आठवण येते ? आईबापांची येते. होय ना ?”
" होय."
“ आणखी कोणाची ?”
“ काय सांगू ? त्या पाहा तुमच्या मैत्रिणी आल्या."
“ हे घ्या तुम्हाला फूल, कसले आहे ओळखा.”
" माझ्या नावाचे."
“ तुमचे नाव शिरीष वाटते?”
“ विचारता कशाला ? तुम्हाला माहीतच आहे.”
“ कोण म्हणतो माहीत आहे?”
“ मी म्हणतो. माझे नाव माहीत नसते, तर हे फूल तुम्ही आणलेच नसतेत. आणि त्या दिवशी वसतिगृहात माझे नाव तुम्ही ऐकले होते.”