पान:कथाली.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 साने गुरुजींचे 'यती की पती' हे पुस्तक वाचताना जिजी खूप विचारात पडल्या होत्या. थोडा वेळ मिळाला तरी त्या ते पुस्तक उघडीत. नवराबायकोमधले एक नवे नाते उमगल्यागत त्यांना वाटले होते.
 त्या रातच्याला मालकांनी सांगितलं की, ते आता लिंबाळ्यात राहणार न्हाईत. पाथरीच्या शाळेत मुक्काम हलविणारेत. धाकटी भागिरथी आणि न्यानोबा यांची भावजय नाही तर माय होऊन मी ऱ्हायचं. म्हणाले, "चंद्रभागा, तू चार पोरांचीच माय न्हाईस तर न्यानोबाची लेकरं बी तुझीच आहेत. घरातल्या पोरी भाकरी भाजाया, गवऱ्या थापाया नि कालवण कराया कवा बी शिकतील. पन शाळेतलं शिक्षण वेळीच व्हाया हवं. तेच उपयोगी येतं. कामाचा बोजा तुमी उचला. तुमच्या मागं धाकटीपण तसंच वागील. तर देणार नव्हं आम्हाला शब्द? त्या रातच्याला मी शब्द दिला. तो आजवर पाळला.
 अण्णांच्या लक्षात आले की चंद्रभागाने धरलेल्या हाताची पकड सैल झाली आहे.
 "चंद्रभागाऽऽ चंद्रभागाऽऽ” अण्णांनी घाबरून आकांताने हाक मारली. बाहेरची मंडळी घाईने आत आली. जिजीच्या प्रसन्न शांत चेहेऱ्यावरच्या कुंकवाच्या ठसठशीत टिळ्यावर अण्णांच्या डोळ्यातले अश्रू पडत होते. डोक्यामागच्या मॉनिटरवरची नागमोडी नक्षी आता सरळ रेषेत पळत होती.

यती आणि सती/ ९१