पान:कथाली.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सावित्राची नि तिची गेल्या चारसहा महिन्यांत भलती गट्टी जमली होती. उठसूठ ती शीरिरसाठवैनीकडे जाऊन बसत असे. कधी कधी द्वारकाबाई न राहवून म्हणत ही असत,
 "ताई साहेब, असं तासं तास लोकावांच्या घरी रोजन् रोज जानं बरं न्हाई. पोरीच्या जातीनं झाकून पाकून व्हावं. फार तर त्या वैनीला आपल्या घरी बोलवावं, तुमचे दादा लई कडक स्वभावाचे हाईत. त्यानला आवडायचं न्हाई ह्ये."
 सावित्रा भावजयीचं म्हणणं कानाआड करी. कधीतरी तिने उलट उत्तरही दिले होते. "दादांना तर समद्या बायाबी भित्यांत. इथं घरी यायला कोनीपन नग म्हणतं. हळदीकुकवाला तरी कितीतरी येत्यात?"
 एक दिवस धुण्याभांड्याला येणारी भामा द्वारकाबाईजवळ हळूच कुजबुजली. "वैनीसाहेब ताईसाहेबांकडे जरा लक्ष द्या. त्या बँकवाल्या शिरसाठबाईंकडे रोज जातात न्हवं? तिथे एक तरणादादा नेहमी येतो म्हनं. या दोघांच्या लई हसूनखेळून गप्पा चालतात तिथं. ती शिरसाठबाईबी यांच्याच वयाची. तिचा नवरा सदा बँकेत. चहापाणी चालीतया. त्यो काही तुमच्या जातीपातीचा नव्हं. वंजाऱ्याचा हाई. शिरसाठवैनीच्या शेजारणीचा भाऊ हाई. वकिलाची परीक्षा देतोया म्हनं औरंगाबादेत. म्हईना झाला हितं आलाय हवापालटाया भैनीकडं. आजारी होता म्हनं काविळीनं."
 "आता भैनीकडं राहायचं सोडून शेजाऱ्याकडं मुक्काम असतोया त्याचा. ताईसाहेब आल्या की हा टपकलाच समजा तिथं. समद्यांच्या लक्षात आलंया त्ये. परवाच्याला ताईसाब शिरसाठवैनीसंग शहराला शिनेमा पायला ग्येल्या व्हत्या न्हवं का दुपारी? तिथे ह्यो बी बरूबर हुता. सुभामाळणीच्या रम्यानी पाहिलं. ती सांगत व्हती मला..."
 भामा सांगत होती तसं... तसं. द्वारकाबाईचं काळीज भीतीनं गारठून जात होतं. पण त्यांच्या तरी हातात काय होतं? सावित्रा त्यांची धाकली नणंद. तिला जवळ घ्यायचा त्यांनी मोप प्रयत्न केला होता पण ते कधीच जमलं नाही.
 माधवरावांनी कधी बायकोला दोन गोड शब्द दिले नाहीत, तिथे त्यांची बहीण तरी कशी देणार? सावित्राला भावजयीबद्दल कधीच ओढ वाटली नाही. आपली भावजय मरतुकडी. सदा आजारी. ना तिला कलाकुसर येत ना विणकामाची आवड. सदा आपली पोर नि घर यांत लडबडलेली असे तिला वाटे.

स्फोट / ५५