जगात आजची गोष्ट उद्या जुनी होते. इतक्या गतीने जग बदलत असताना आपले अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके दरवर्षी नको का बदलायला? एस्.एस्.सी. बोर्ड तपाने पुस्तके, अभ्यासक्रम बदलते. बालभारतीची ही तीच स्थिती. त्यामुळे आपण मुलांना कालबाह्य शिकवून कालबाह्य नसतो का करत? नवे शोध, नवे विचार, नवी साधने यांनी मुले अवगत होतात व शाळेत मात्र अजून रहाट-गाडगे जर आण शिकवत राहू तर कसे होईल? अवकाश व जमीन जोडत जे देश शिकवत राहतात ते विकसित होतात. आकाशदर्शन शिकवत राहणार की अवकाश वेध घेणार यावर तुमची विकास गती ठरणार आहे.
शिक्षणातील घोकंमपट्टी जगातून केव्हाच हद्दपार झाली आहे. २+४=६ शिकवत ७ का नाही हे पण सांगितले पाहिजे. ज्या वर्गात शिक्षक कमी बोलतात व विद्यार्थी जास्त विचारतात तिथे स्वतंत्र विचारांची, शोधांची निर्मिती अधिक होत असते. मुले घरी जितके प्रश्न विचारतात तितके शाळेत का नाही विचारत असा प्रश्न ज्या दिवशी शिक्षकास अस्वस्थ करेल त्या दिवशी विचार विश्लेषण, समीक्षा, आकलन इ. शिक्षण सक्रिय करणाच्या व विद्यार्थ्यांची बुद्धी मुक्त करणाच्या प्रक्रियेचा प्रारंभ होईल हे आपण समजूत घेतले पाहिजे. शिक्षकांनी प्रश्न द्यायचे, विचारायचे... सोडवायचे, उत्तर शोधायचे विद्याथ्र्यांनी. आपल्या शिक्षणात सध्या झेरॉक्सची चलती आहे. नवनीतचे साम्राज्य आहे. या दोन्हीतून आपले शिक्षण मुक्त होईल तो सुदिन! गृहपाठ प्रकल्प, आदर्श उत्तरे नवनीत छाप असतात याचे पालकांना व शिक्षकांना, परीक्षकांना वैषम्य वाटत नाही याचे आश्चर्य वाटते! शिक्षकाच्या घरी पाठ्यपुस्तक नसते पण नवनीत हवेच. शाळेच्या ग्रंथालयाची स्थिती वेगळी नसते. मुलाने स्वतंत्र उत्तर लिहिलं, दिलं तर नापास ठरत असेल तर प्रश्नांची नवी उत्तरे, समस्यांचे नवे उपाय निघतीलच कसे? शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक मशिनवर भरण्याच्या काळात विद्यार्थी हजेरी रोल कॉलने का? असा आपल्याला प्रश्न का पडत नाही. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर ज्या शाळा येथून पुढच्या काळात सक्षमपणे करणार नाहीत त्या मागेच पडतील. मुख्याध्यापकांनी राऊंड कशाला घ्यायचा? सीसीटीव्ही जर लुगड्याच्या दुकानात लावला जातो तर शाळेत का नाही? शाळेत जे शिकवले जाते ते व्हिडिओ रेकॉर्डिंग का नाही? ते ग्रंथालयात उपलब्ध का नाही? ग्रंथालयात ई-बुक्स का नाहीत? द्रष्टेपणा असेल, समाजाला भिडण्याची संपर्क क्षमता असेल तर या सर्व सुधारणांसाठी अनुदानाची, परिपत्रकाची, शासन आदेशाची वाट का पाहायची? सर्व संस्थेनं करायच्या मानसिकतेतूनही शिक्षकांनी बाहेर