आणि खेड्यातील शिक्षणमानात अंतर असले तरी नवा पालक हा आपल्या पाल्याला शिक्षण दिलं पाहिजे अशी जाण असलेला आहे. त्याला शासकीय योजनांची माहिती असते व तिच्या सवलती मिळाव्यात म्हणून तो आग्रही व जागरूक असतो. विशेषतः खेड्यातील गरीब, अशिक्षित व अल्पशिक्षित पालक या संदर्भात लक्षात घ्यायला हवा. तालुका, शहरचा पालक हा आता ग्रामीण न राहता नागरी, शहरी, सुशिक्षित झाला आहे तर जिल्हा, महानगर, राजधानीतील पालक हा उच्च आकांक्षी बनला आहे. त्याची मानसिक स्पर्धा व ईर्षा थेट अमेरिकेशी भिडू पाहते आहे. हे सारे पालकांतील बदल जागतिकीकरणाच्या प्रभावाची फलनिष्पत्ती होय.
नवा पालक पाल्यास भरभरून देणारा, आपल्या शल्याची भरपाई करणारा व शिक्षणासाठी सर्व ते करायला तयार असणारा पालक आहे. आपल्या अपत्यानं 'नंबर वन'च असलं पाहिजे. चार आकडी पगार आता त्याला समाधान देत नाही. तो 'पॅकेज'ची भाषा बोलू लागला आहे. मुलगा व मुलगी भेद त्यानं मागे टाकले आहेत. इंग्रजी माध्यम, संगणक साक्षरता, मुला-मुलींचं ‘मिलियनर' होणे त्याचे किमान स्वप्न आहे. एमपीएससी, युपीएससी ही क्षेत्रे त्याने प्राधान्यक्रम ठरवलेत, ते पैसे न देता नोकरी मिळवायचा हुकमी राजमार्ग म्हणून. सरकारी नोकरीतील भ्रष्टाचार, मार्केटिंगचे नवे क्षेत्र नव तरुणांना क्षमतेनुसार कमाईचे आकर्षण होते आहे. खेड्यातील शिक्षित तरुण-तरुणींचा मात्र यात 'कांचनमृग' झाला आहे. तो स्वप्नभंगाचा बळी ठरून ‘न घर का, ना घाट का' झाला आहे. अशा मुलांच्या पालकांचे अस्वस्थपण समाज बदलाच्या खिसगणतीत दिसत नाही. ज्यांच्याकडे पैसा, सत्ता, संपत्ती, साधन आहे तो अधिकारी ठरतो. ज्यांच्याकडे यातले काही नाही त्याला झोप, भूक नाही अशी विषम स्थिती आहे.
आजच्या मुलांचे भावविश्व
जन्म
अशा बदलत्या पाश्र्वभूमीवर जी मुले घरोघरी जन्म घेत आहेत, ती भौतिकदृष्ट्या समृद्ध पण भावनिकदृष्ट्या अनाथ, कोरडी होत आहेत. जन्मानंतर संगोपनाच्या सुविधा सर्व वर्गास मिळत आहेत. माता-बाल संगोपन योजनेत 'आशा' भगिनी आहार, आरोग्य, लिंग समानता, समान संधीचं गाव नि वस्ती पातळीवर जाळे विणत प्रत्येक जन्म घेणारे बाळ जगले पाहिजे अशी काळजी घेतली असल्याने भूक, उपेक्षा, संगोपनात आबाळ कमी होत आहे. परिणामी भारताचे बाल्य सुदृढ नसले तरी इथियोपियन