पाजणेच टाकून दिले म्हणून मग स्तनपान अभियान चालवावे लागले. दुधाची बाटली निपलचा काळ जाऊन वाटी-चमचा आला. तरी बाळाला कुणी कसे घ्यायचे हा शहरी प्रश्न दिवसेंदिवस उग्र होतो आहे. संगोपनात पालकवजा होऊन पाळणाघरची मावशी, प्ले स्कूलच्या नेहा टीचरचे वर्चस्व वाढतंय. खेड्यात अजून बाळ अनाथ नाही. तरी पूर्वीची सावली राहिली नाही, हे मात्र खरे!
बाळगाण्यांची जागा एमपीथ्रीनं घेतली. भातुकली, लपंडाव, गलोरी गेली नि कार्टून कोना पॉवरफुल झाला. कार्टून नेटवर्क, निक, हंगामा, पोगो, हॅरी पॉटर, छोटा भीम, मिस्टर बीन सर्वांनी मिळून मुलांचे खेळ, खाणे, पडणे, खरचटणे, भांडणे बंद केले. भांडणे राहिली फक्त रिमोटची व कोणते चॅनल बघायचे ती. बाळाला भेटायला वारंवार येणारे नातेवाईक फक्त हॅपी बर्थडेचा केक खायला व रिटर्न गिफ्ट घ्यायला वर्षातून एकदा येतात. ते पण त्यांना लहान मूल असेल -नात-नातू असेल तरच. मधले सारे नातेवाईक बारशानंतर एकदम बाळाच्या लग्नालाच (ते पण बाळानं तशी संधी दिली तरच.) यात मुलं एकटी वाढू लागली. ती एकलकोंडी, तुसडी, आक्रमक झाली. अप्पलपोटी झाली, त्यांना समूहजीवन, समाजजीवन पारखं झालं. ती वाढतात इन मीन तीन माणसात. एक तर दुर्लक्षात, अन्यथा अति काळजी, लाडात त्यांचं संगोपन होतं. सहज संगोपन लाभणारी पाल्ये भाग्यवान. ती अल्पसंख्य होत निघालीत, हे वेगळे सांगायला नको. ज्यांना नातेवाईक लाभतात ते सहज संगोपनाचे स्वामी होतात.
आहार
बाल आहार अशी कल्पना पूर्वी नव्हती. मुलाला आईचं अंगावरचं दूध मिळायचंच. ज्या आईला पान्हा नसायचा तिथं दुसरी आई पाजायची. पंढरपूरच्या अनाथाश्रमात कैकाडी गल्लीतून पान्हा असलेल्या बायका आणल्या जायच्या. त्यांना पैसे दिले जायचे. आपल्या बाळाचं पोट भरून उरलेलं दूध त्या आश्रमातल्या मुलांना द्यायच्या. पेज, वरणभात, दूधभात, दुध भाकरी वय वाढेल तशी दिली जायची. हा काऊचा घास, हा चिऊचा, हा माऊचा म्हणत मुलं रेंगाळत रंगात येऊन जेवायची. आता मुलांना भरवायला वेळ नसल्यानं मुलं गिळायला शिकतात. चॉकलेटमुळे दात गेलेली पिढी त्यांना ऊस सोलून खायचं माहीतच नाही. अक्रोड दातानं फोडणारी आजोबांची पिढी नाही तशी खाणारी पिढीपण राहिली नाही. सोयाबीन, सतरा धान्याचं कडबोळे गेलं नी बेडी फूड, बेबी मिल्क आलं. आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर आला. भाकरी, लापशी, थालीपीठ गेलं. पंचपक्वानांची जागा झटपट होणाच्या,