पान:आमची संस्कृती.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६ / आमची संस्कृती


वाईट त्यात काय आहे? परंतु इंग्रजी अमदानीचा अंमल सुरू झाला तेव्हा त्यांच्या संस्कृतीचा परिणाम येथील काही लोकांच्या मनावर होऊन त्यांना आपला अधिक दैवतांचा प्रकार त्याज्य वाटू लागला. यांतूनच ब्राह्मो किंवा आर्यसमाज यांसारख्या पंथांचा उदय झाला. परंतु एक गोष्ट पाहण्यासारखी आहे की, या पंथांचा उदय व प्रसार उत्तरेकडेच विशेष झाला. दक्षिणेकडे त्यांचा प्रभाव विशेष पडला नाही. विंध्य, सातपुडा ओलांडून दक्षिणेकडे आलेले लोक इकडील लोकांच्या रूढी उचलून, त्यांच्यात मिसळून समरस झाले ते उत्तरेकडील लोकांपेक्षा थोडे निराळेच राहिले.
 संस्कृतींचा संघर्ष होऊन एकीचा पाडाव व दुसरीचा विजय असे दृश्य हिंदुस्थानात न दिसता त्यांचा संगम होऊन दोहोंचाही काही अंशी विजय व काही अंशी पाडाव होऊन शेवटी त्यांचा तह झालेला दिसतो. यामुळे गेल्या पाच हजार वर्षात चालीरितींचा व रूढींचा मोठाच साठा जमत आलेला आहे आणि तो देशाच्या सर्व भागांत प्रसृत झालेला आहे दंतकथा व इतिहास, मोठमोठ्या राजघराण्यांच्या कथा, तत्वज्ञानाची प्रमेये नीतिविषयक कल्पना. देवांच्या आणि वीरांच्या कथा. पंचतंत्र आणि बृहत्कथा यांत वर्णिलेल्या लोककथा हे सर्व आता हिंदुस्थानच्या सर्व प्रांतांचे व जमातींचे समायिक धन झालेले आहे.
 सांस्कृतिक संक्रमणाचे स्वरूप एकजिनसी किंवा केंद्रीकृत नसल्यामुळे प्रत्येक प्रादेशिक विभाग आपल्या विशिष्ट स्थानिक संस्कृतीला जुळतील असे या परंपरागत ज्ञानाचे उभे-आडवे धागे विणीत असे व न जुळणारे भाग काढून टाकून त्यांऐवजी सुसंगत, रुचतील असे नवीन कथाभाग किंवा कल्पना त्यांत घालीत असे.
 ही घडामोड सर्व बाबतींत नेहमीच चालू असे. हिंदूच्या आपल्या देवांविषयीच्या दृष्टिकोनाचे या घडामोडीस बरेच साहाय्य झालेले आहे. देव, मोठमोठे वीरमाणसे या सर्वांची उत्पत्ती एकाच तत्त्वापासून आहे आणि सर्वांभूती परमेश्वर असल्यामुळे हे सर्व शेवटी एकाच चित्तत्त्वात विलीन व्हावयाचे आहेत. यामुळे कायमचा नरकवासही नाही, आपल्या आज्ञा बरोबर पाळल्या जातात की नाही याबद्दल दक्ष असणारा कडक देवही नाही किंवा वैयक्तिक मोक्ष हा केवळ त्याच्या कृपेवर अवलंबून