पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहिले तर तिकडे हिंदीमध्ये कबीरदास, तुलसीदास व सूरदासांनी मराठीतील संत कवींप्रमाणे मोठ्या प्रमाणात हिंदीमध्ये भक्तिपर पदे लिहिली आहेत. मराठी भाषी संतकवी भागवत धर्माच्या प्रसारार्थ उत्तरेकडे भ्रमण करायचे. उत्तर प्रांतात त्यांचे दीर्घकाल वास्तव्यही असायचे. परिणामी, त्यांच्या आचार विचारांवर व पर्यायाने साहित्यावर हिंदी भाषा व साहित्याचा परिणाम व्हायचा. संत एकनाथांनी लिहिलेल्या ‘भावार्थ रामायणा'वर हिंदी रामभक्त सगुण कवी संत तुलसीदास रचित 'रामचरित मानस'चा प्रभाव आहे, तर तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगांवर संत कबीराचा. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर सामावल्याचे वर्णन करताना कबीरांनी एके ठिकाणी म्हटले आहे.

 कस्तुरी कुंडली बसै, मृग हुँदै बन माहि।
 ऐसे घटि घटि राम है, दुनिया देखे नाहि।।

 कबीरांच्या या विचारांचा प्रभाव तुकारामाच्या अभंगात स्पष्टपणे दिसून येतो. ते म्हणतात,

 मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास।
 असे ज्याचा त्यास नसे ठावा।।

 हिंदी भाषेचा असाच परिणाम समर्थ रामदास, सेना महाराज, शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर, शहाबाबा, चक्रपाणी यळंबरकर, महादजी शिंदे इत्यादी मराठी प्राचीन कवींवर हा दिसून येतो. मराठी संत कवी त्रिस्थळी यात्रेच्या निमित्ताने सतत हिंदी भाषेच्या संपर्कात आल्याने एकंदर प्राचीन साहित्यावरच हिंदीचा प्रभाव झाल्याचे दिसून येते. जवळ जवळ सर्वच मराठी संत कवींनी हिंदीमध्ये भक्तिपदे रचली आहेत, ही गोष्ट हिंदी भाषेच्या मराठीवरील ठळक परिणामाचेच द्योतक आहे.

 प्राचीन काव्याप्रमाणेच मराठीतील आधुनिक काव्यावरही हिंदी भाषा व साहित्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. आधुनिक मराठी कवितेच्या प्रांगणात रूढ झालेले गझल, रूबायांसारखे काव्य प्रकार हे मराठीला हिंदी भाषा नि साहित्याचे लाभलेले वरदानच म्हणावे लागेल. गझल व रूबाई हे काव्य प्रकार तसे मूळ अरबी फारसीतील. पण हे काव्य प्रकार मराठीत रूढ झाले ते हिंदी माध्यमांमुळेच. हे काव्य प्रकार मराठीत आणण्याचे ऐतिहासिक कार्य कविवर्य माधव ज्युलियन यांनी केले. त्यांनी उमर खय्यामच्या रूबायांचा मराठी अनुवाद करून या काव्य प्रकाराची ओळख मराठी भाषिकास करून दिली. असाच प्रयत्न डॉ. तारा भवाळकर यांनी अगदी अलीकडे हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाले' तील रूबायांचा मराठी अनुवाद करून केला आहे. रूबाई हा काव्य प्रकार मराठीत आला, तरी तो फारसा रुळल्याचे मात्र दिसून येत नाही. पण

आकाश संवाद/६८