पान:अर्धुक (Ardhuk).pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रहायला जाते. तिथं मोलमजुरी करून राहीन."
 पोरं म्हणाली, "हंऽऽ आणि मग आम्हाला करून कोण घालणार? आता तर तायडी बी लग्न होऊन गेली. तू कशाला घाबरतेस? आम्ही आहोत तवर तो तुला धक्का लावणार नाही. आता त्याला घरात येऊच देणार नाही काय बी झालं तरी. तू निवांत रहा."
 मुलं आता स्वत:चीच नव्हे तर आपली सुद्धा काळजी घ्यायला समर्थ आहेत असं वाटून सुमनचा जीव सुखावला. सगळी जबाबदारी आता आपण एकटीनेच वहायला नको म्हणून ती सैलावली. मुलं मिळवती झाली आहेत तेव्हा त्यांच्या लेखी मिळवून पालनपोषण करणाऱ्या आईपेक्षा भाकरी करून घालणारी आई ही प्रतिमा जास्त महत्त्वाची झाली आहे ह्याचं तिला वैषम्य वाटलं नाही. किंवा ह्याचीच तार्किक परिणती म्हणजे त्यांना भाकरी करून घालायला त्यांच्या बायका आल्या की ही गरज सुद्धा संपेल असाही विचार तिच्या मनात आला नाही.

॥अर्धुक॥
॥९२॥