पान:अर्धुक (Ardhuk).pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मंगलला थोडी धाकधूक वाटत होती, पण तिनं विचार केला, विश्वास तरी कुणावर टाकायचा? बहिणीनं हे असं केलं. ह्या बाईंनी मला नेहमीच चांगलं वागवलंय. त्या मुद्दाम माझं वाईट कशाला करतील?
 ती म्हणाली, "जाते मी."
 "आईला, वडलांना विचारायचं नाही का?"
 "मग कळवीन. आता मला कुणालाच काही सांगायचं नाही की विचारायचं नाही."
 मंगलला नोकरी पसंत पडली. जेवण, कपडे, वर चांगला पगार. ती आईवडलांना दर महिन्याला पैसे पाठवायची, पण पगार किती आहे ते तिनं त्यांना सांगितलं नाही. बँकेत खातं उघडून ती त्यात नियमितपणे पैसे टाकायची. कुणी कुणाचं नसतं आणि आपल्या भविष्यकाळाची तरतूद आपल्यालाच केली पाहिजे हे तिला कळून चुकलं होतं. वर्षातनं पंधरा दिवस तिला सुट्टी मिळायची तेव्हा ती सगळ्यांसाठी खाऊ, बक्षिसं घेऊन घरी जायची. सगळे खूष असायचे. पाचसहा दिवसांतच कंटाळा येऊन ती परत जायची. बहिणीला मात्र ती कधी भेटायला गेली नाही आणि बहिणीनं पुढाकार घेऊन करून दिलेल्या लग्नाबद्दल ती कुणाला काही बोलली नाही. वडलांनी तिच्याकरता एक-दोन स्थळं आणली होती पण तिनं ती पसंत केली नाहीत. त्यांना धड नोकऱ्या नव्हत्या, घरदार, जमीन नव्हती. तिनं विचार केला, म्हणजे नवऱ्यानं शेवटी माझ्या जिवावरच जगायचं. बाहेरही मी राबायचं आणि घरातही. पुन्हा तो चांगलं वागवील ह्याची काय हमी? त्यापेक्षा मी आहे ती काय वाईट आहे? तिनं वडलांना सांगून टाकलं ह्यापुढे स्थळं बिळं बघू नका, मला लग्न करायचं नाही.

॥अर्धुक॥
॥७५॥