तिच्या शेजारच्या एका बाईनं मला सांगितलं की परत आल्यापासून संगीताला पुन्हा मारहाण चालूच आहे. काही दिवसांनी कळलं तिचा नवरा अचानक मेला. सायकलवरून चालला होता, चक्कर येऊन पडला की दारू प्यायला होता कुणाला कळलं नाही. पण पडला तेव्हा त्याचं डोकं दगडावर आपटलं आणि तो जागच्या जागी खलास झाला.
मी विचारलं, "आता संगीता काय करणार?"
"राहील दिराबरोबर. त्यांच्यात तसंच असतं."
एकदा ती शेजारीण म्हणाली, "बाई, मुळात तिचा दीरच तिला मारायचा जास्त करून.आता तर ती त्याच्या तावडीतच सापडलीया. अक्षी गुरावाणी बडवतो हो तिला. ती किंचाळते ते आमच्या घरात ऐकाय येतं".
एक दिवस मावळतीला संगीता माझ्या फाटकाशी उभी. तोंड सुजलेलं, दंडावर माराचे वळ, एक डोळा काळा निळा झालेला.
"काय ग?"
"बाई मला आजच्या रातीला आत घ्या. उद्या कुठेतरी पाठवून द्या."
"मी आता पुन्हा तुझ्या भानगडीत पडणार नाही. एकदा तू मला तोंडघशी पाडलंस तेवढं पुरे. तू आपली घरी जा मुकाट. नाहीतर आपल्या पायानं कुठं जायचं ते जा."
थोडा वेळ माझ्याशी हुज्जत घालून मी बधत नाहीसं पाहिल्यावर ती निघून गेली.
आठेक दिवसांनी तिचा सासरा एका लहान मुलाला घेऊन माझ्याकडे आला. धोतर, कोट, डोक्याला फेटा, मोठा झोकात होता माणूस.
"नमस्कार, बाई."
"नमस्कार, कोण आपण?"
"संगी आठवते का, ती तुम्ही पुण्याला पाठवलेली मुलगी? तिचा सासरा मी."
"काय काम होतं?"
"ती पुन्हा पळून गेलीय."
"मग?"
"नाही, म्हटलं तुम्हाला माहीत असेल कुठं गेलीय ते."
"मला काहीएक माहीत नाही."