पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/277

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिजे यातही काही मतभेद असण्याचे कारण नाही.
 मार्च महिन्यातील प्रकरणात आरडाओरडा झाला तो बंगारू लक्ष्मण, जैन, जया जेटली आणि जॉर्ज फर्नाडिस यांच्या विरुद्ध; लष्करी सामग्री विकण्यात स्वारस्य असलेल्या कंपनीचे नाटक उभे करणे आणि बळेबळेच नोटांच्या थप्पी देऊ करणे हा प्रकार पत्रकारांच्या साधनशुचितेत बसतो किंवा नाही याविषयी त्या वेळी फारसे बोलेले गेले नाही. याउलट, ऑगस्ट महिन्यात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांबद्दल कोणीच फारसे बोलले नाही; सारी चर्चा झाली ती पत्रकारांनी अवलंबलेल्या मार्गाच्या शुद्धाशुद्धतेची. पैशाचे प्रलोभन आणि माषुकांचा वापर यांत केवळ अंशात्मकच फरक असेल तर सर्वसाधारण प्रतिक्रियेतमात्र एवढा 'घूम जाव' बदल कसा घडला?
 हे नवे प्रकरण उद्भवले तेव्हा मला १९५४-५५ सालच्या टी. टी. कृष्णम्माचारींच्या आयुर्विमा प्रकरणाची आठवण झाली. त्या वेळी मी मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये शिकत होतो. 'आशियातील सर्वप्रथम वाणिज्य महाविद्यालय, येथील विद्यार्थ्यांचे पालक देशात जमा होणाऱ्या आयकरापैकी निम्मा भरतात,' अशी माहिती तत्कालीन अर्थमंत्री चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांनी कॉलेजच्या वार्षिक संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिली होती. अर्थशास्त्राच्या विशेष अभ्यासासाठी वाणिज्य शाखेकडे वळलेली आम्ही मराठी भाषीक नोकरदारांची पोरे साऱ्या महाविद्यालयात फारतर डझनभर; मुख्य भरणा बडेबडे व्यापारी, कारखानदार यांच्या पाल्यांचा. बहुतेक सर्व भांडवलदार घराण्यांतील नावे माझ्या वर्गाच्या हजेरीपटावर होती. कृष्णम्माचारी प्रकरणात न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी लोकसभेत जाहीर केले. तासादोन तासांच्या मधल्या वेळात या विषयावर विद्यार्थ्यांत चर्चा चालू होती. असल्या चर्चा समाजवाद, नियोजन, तुटीची अर्थव्यवस्था इत्यादी विषयांवर चालत असल्या तर त्यांत बहुसंख्येने आम्ही घाटी विद्यार्थीच भाग घ्यायचो; पण या प्रकरणात जीवन बिमा निगम आणि अनेक मोठ्या संस्था गुंतलेल्या, त्यामुळे चर्चेत पोद्दार, तुराखिया अशी मंडळीही उत्साहाने सामील झाली होती.

 बराच वेळ चर्चा झाल्यानंतर मी म्हटले, "एवढ्या सगळ्या अंध:कारात भाग्याची गोष्ट अशी, की आपल्याकडील न्यायव्यवस्थातरी अजून स्वच्छ राहिली आहे. त्यामुळे, निदान, न्यायालयीन चौकशीच्या आधारेतरी सत्य बाहेर येऊ शकते." कोणा शेठियाचा पाल्य विद्यार्थी फटकन म्हणाला की, "घाटी लोकांची भाषा सोडून द्या. हिंदुस्थानातील बड्याबड्या न्यायाधीशांना, निर्णय आपल्या

अन्वयार्थ - दोन / २७९