पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/274

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 राहता राहिला एक किरकोळ प्रश्न. सेवासोयींची लालूच दाखवून धर्मांतराला प्रवृत्त करणे कितपत योग्य आहे? कोणाचे प्रेम संपादन करायचे असले तर त्याला वारंवार भेटावे, त्याच्या संगे बोलावे चालावे, त्याला भेटवस्तू द्याव्यात असे पूर्वसूरींनी सांगून ठेवले आहे. प्रणयाराधनाच्या काळात प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देणे अयोग्य आहे असे कोणी म्हणत नाही. मग, तहानलेल्यांना पाणी पाजणे, भुकेलेल्यांना खाऊ घालणे, ज्ञानाचा हक्क नाकारलेल्यांना लिहायवाचायला शिकविणे आणि रोगपीडितांची शुश्रूषा करणे यांत आक्षेपार्ह ते काय? माणसाच्या दुःखांकडे कठोरतेने दुर्लक्ष करणाऱ्या स्वधर्मलंडांपेक्षा या वेगळ्या प्रकारच्या माणसांचा विचार काय, हेतू काय, त्यांच्या प्रेरणा कोणत्या याविषयी कुतूहल निर्माण झाले आणि त्यातून कोणी आपला, जन्माच्या अपघाताने मिळालेला, धर्म सोडून देण्यास तयार झाला तर त्याचे कौतुक झाले पाहिजे. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या धर्माचा जो अभिमान बाळगतो त्याचा तो अभिमान अभिनिवेशाचा आहे; जाणीवपूर्वक ज्याने धर्म स्वीकारला त्याचा धर्माभिमान नव्या 'मुल्ले'पणाचा काळ संपल्यानंतर तरी अधिक गंभीर आणि गाढ असणार.

दि. २५/८/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / २७६