पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/273

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपले पितर स्वर्गात गेल्याचा आनंद होतो. आद्य शंकराचार्यांनी हातात मशाल घेऊन बौद्धधर्मीयांना वादविवादाचे आव्हान दिले आणि हिंदुस्थानातील बौद्ध धर्म संपवून टाकला अशी एक निराधार आख्यायिका सर्वदूर पसरली आहे. शंकराचार्यांनी काही वाईट कृत्य केले असे कोणी मानीत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लाखो दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याबद्दलही अनेक हिंदुत्ववाद्यांच्या मनात खुपते; पण त्याबद्दल क्रोध उफाळून येत नाही.
 पंजाबमध्ये शिख आणि हिंदू समाजांतील सरहद्दीची रेघ इतकी धूसर आहे की कोण हिंदू, कोण शिख हा प्रश्नसुद्धा फारसा उभा राहत नाही.
 मतप्रचाराच्या स्वातंत्र्याला हिंदू मानसिकतेत धर्मांतर हा एकच अपवाद, तोसुद्धा शीख किंवा बौद्ध अशा दोस्त धर्माबद्दल नाही. थोडक्यात, धर्मातराविषयीचा सारा आक्रोश हा हिंदुंनी मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याविषयी आहे.
 हिंदु समाजाने ज्यांना माणूस म्हणूनदेखील वागवले नाही त्यांनी दुसऱ्या धर्माच्या समाजात प्रवेश केला तर त्यात दुःख मानण्याचे ते काय कारण? याला हिंदुत्ववाद्यांचा युक्तिवाद असा, की मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्यांची राष्ट्रभावना मंदावते आणि ख्रिस्ती व मुसलमान यांच्याप्रमाणे त्यांचे डोळे देशाबाहेरील धर्मसत्तेकडे किंवा धर्मबांधवांकडे लागून राहतात. याहीपेक्षा खरे कारण असे, की कालपर्यंत ज्याला अस्पृश्य मानले तो मुसलमान किंवा ख्रिस्ती झाला, की रावसाहेब किंवा खानसाहेब म्हणून पार चावडीपर्यंत येतो, त्याला कोणतीच कमीपणाची भावना राहत नाही. धर्मांतराने जातिव्यवस्थेला बाध येतो हे हिंदू समाजाचे मोठे दुःख आहे.
 धर्मांतरित मुसलमान आणि ख्रिस्ती समाजांतही जुने जातिभेद चालूच राहतात, ब्राह्मण ख्रिश्चन इतर जातींतून आलेल्या ख्रिश्चनांना बरोबरीचे मानीत नाहीत आणि मुसलमान झाले तरी हीन जातीचा बाट काही संपत नाही हे खरे; परंतु हिंदू समाजाशी त्यांचा जेथे जेथे संपर्क यईल तेवढ्यापुरतीतरी जातीमुळे आलेली हीनता फारशी राहत नाही.

 मार्क्सवाद्यांना आपला विचार लोकांना पटवून सांगण्याचा आणि त्याना मार्क्सवादी बनविण्याचा अधिकार असेल तर कोणत्याही धर्माच्या पाइकास आपल्या धर्मातील तत्त्वे श्रेष्ठ आहेत हे दुसऱ्यास पटवून देण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. ज्याला ते पटेल त्याला आपला धर्म बदलून दुसरा धर्म स्वीकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. राज्यघटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा अर्थ 'धर्मांतराचे स्वातंत्र्य' असाही होतो.

अन्वयार्थ – दोन । २७५