पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/271

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुखंड काहीतरी तारे तोडून लोकसभेत गदारोळ घालायला सबब तयार करून देतो.
 सोमवार दिनांक २० ऑगस्ट २००१. सकाळच्या वर्तमानपत्रांत सरकारला धारेवर धरता येईल असे काहीच नव्हते. त्यामुळे, लोकसभेतले कामकाज कसे काय चालणार यासंबंधी कुतूहल वाटत होते; पण सोमवारच्या अंकात नसले म्हणून काय झाले? रविवारच्या अंकात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी श्रीकृष्णाविषयीच्या एका पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या निवासस्थानीच केले त्याची बातमी होती. असे कार्यक्रम एकामागोमाग एक घडतच असतात; पण या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सुदर्शनजीही हजर होते. संघाचे स्वयंसेवक वेगवेगळ्या राज्यांतील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रचाराविषयी नाराज आहेत. त्यांच्या विरोधाचा परिणाम जागोजागी हिंसाचारातही होतो. संसदेतील विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी जन्माने ख्रिश्चन कॅथॉलिक पंथाच्या आहेत; तेव्हा, अटल बिहारी यांनी ख्रिस्ती धर्मप्रचाराविरुद्ध खंबीर भूमिका घ्यावी अशी संघस्वयंसेवकांची फार जुनी मागणी आहे. बहुधा सुदर्शनजींना खूश करण्याकरिता, पंतप्रधानांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. ख्रिस्ती धर्मप्रसारक गोरगरिबांची कळकळीने सेवा करतात; इतर कोणीही जेथे पोहोचत नाहीत तेथे ते जातात याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. पण, या सगळ्या भल्या कामगिरीमागे ख्रिस्ती धर्माचा प्रचार करून लोकांना तो धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याची जी बुद्धी आहे, ती मात्र दुर्दैवी असल्याची टिप्पणीही पंतप्रधानांनी केली.
 श्रीकृष्णाविषयीच्या पुस्तकाचे प्रकाशन, त्यातून धर्मांतराचा विषय कसा काय निघाला असेल? भगवद्गीतेत श्रीकृष्णाने 'स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहः' असे निक्षून सांगितले आहे. त्यातील 'धर्म' शब्दाचा अर्थ 'व्यक्तिमात्राची प्रकृती' असा आहे; सार्वजनिक संघटित धर्मांना उद्देशून हे वाक्य म्हटलेले नाही; पण हिंदुत्वनिष्ठांत इतक्या दार्शनिक तपशिलात जाण्याची परंपरा नाही.

 धर्मांतर ही काही भयानक गोष्ट आहे अशी हिंदुस्थानातील अनेकांची ठाम समजूत आहे. मुसलमान बादशहांनी 'इस्लाम स्वीकारलास तर तुला जिवदान देतो, अन्यथा हाल हाल होऊन मरशील' अशी धमकी दिल्यावर निग्रहाने 'स्वधर्म' सोडण्यास नकार देणाऱ्या वीरांच्या बाणेदार कथा घोळवून घोळवून सांगितल्या जातात. त्यामुळे, आपला धर्म सोडण्यापेक्षा मृत्यू श्रेयस्कर अशी सर्वसाधारण भावना आहे.

अन्वयार्थ – दोन / २७३