पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/272

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी जवळचा सहकारी नेताजी पालकर अशाच दडपणाखाली नाइलाजाने मुसलमान झाला. शिवाजी महाराजांनी त्याचे पुन्हा शुद्धीकरण करून घेतले. या ऐतिहासिक दाखल्यानेही धर्मांतराविषयीच्या एकूण कडवट भावनेत फारसा फरक पडलेला नाही.
 हिंदुस्थानात फार मोठ्या प्रमाणावर हिंदू प्रजेने धर्मातर केले. मुसलमानी अमलात जातिभेद नसलेल्या, प्रार्थनास्थळांत सर्वांना प्रवेश देणाऱ्या नवीन धर्माचे आकर्षण अनेक शूद्रातिशूद्रांना वाटले. महात्मा जोतीबा फुल्यांच्या शब्दांत, 'त्यांनी महंमदाच्या जहांमर्द शिष्यांचे स्वागत केले.' बलुतेदारांना, कारागिरांना, कलावंतांना दरबारचा आश्रय हवा असेल तर बादशहाचा धर्म स्वीकारण्यात काही सोयही होती. एवढे मात्र खरे, की कुराणाच्या 'कलमा' देशी लोकांना समजतील अशा भाषेत पोहोचवून त्यांची शिकवण लोकांच्या गळी उतरवण्याचे प्रयत्न फारसे झाले नाहीत.
 इंग्रजी आमदनीत ख्रिस्ती धर्मप्रसारक आले. त्यांना राजश्रय होता, साधनसंपत्तीही भरपूर होती. डोंगरखोऱ्यांत. रानावनांत, आदिवासी प्रदेशांत त्यांनी आपला शिरकाव केला. त्याबरोबरच, वारंवार दुष्काळग्रस्त होणाऱ्या इलाख्यांतही त्यांनी ठाण मांडले. एक चांगल्यापैकी दवाखाना किंवा इस्पितळ, एखादी शाळा आणि वर, लोकांना उदरनिर्वाहाकरिता काही आधार देऊ केला की दीनदुःखी लोक हजारोंच्या संख्येने त्यांच्याकडे आपोआप येत. सत्तेखालील काही अपवाद सोडल्यास, ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेसारख्या दुष्ट प्रथा आणि, उलटपक्षी, ख्रिस्ताची करुणामयी शिकवण यांवर भर दिला. रेव्हरंड टिळकांसारखी मंडळी ख्रिस्ती बनली. केवळ धर्माची शिकवणच ख्रिस्ती धर्मप्रसारक देत राहिले असते आणि बरोबरीने भुकेलेल्यांना जेवू घातले नसते, आजाऱ्यांची शुश्रूषा केली नसती तर लोक ख्रिस्ती झाले असते किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. पण, रेव्हरंड टिळकांसारख्या अनेकांना जडजंबाल कर्मठ धर्मापेक्षा करुणा शिकविणारा आणि अमलात आणणारा धर्म भारून टाकणारा वाटला यात काही शंका नाही.

 हिंदुस्थानात, धर्म हा एक विषय सोडला तर बाकी सर्व विषयांत प्रत्येकाने आपापले मत मांडावे, आपल्यापेक्षा वेगळी मते असणाऱ्यांना आपला विचार पटवून द्यावा, आपल्या मताचा प्रचार करणे हा मनुष्यमात्राचा अधिकार आहे असे मानले जाते. धर्मांतराबाबतही दुसरे धर्म सोडून कोणी हिंदू धर्माचा स्वीकार केला तर हिंदुत्ववाद्यांना त्यात आक्षेपार्ह असे काहीच वाटत नाही; उलट,

अन्वयार्थ – दोन । २७४