पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/253

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






नर्मदा आंदोलनाची जलसमाधी


 सामाजिक चळवळींच्या इतिहासातील एक कालखंड ७ जुलै २००१ रोजी आटोपला. नर्मदा नदीवरील धरणामागील सरदार सरोवराच्या पाण्यात बुडणाऱ्या एका गावच्या आदिवासी शेतकऱ्यांनी चौदा वर्षे त्यांच्या मनाची अनभिषिक्त राणी म्हणून गाजलेल्या मेधा पाटकर यांच्या विरुद्धनिदर्शने करून त्यांना आपल्या गावातून काढून लावले.
 पत्रकार मंडळी क्वचितच् प्रसंगाचे औचित्य समजतात आणि पाळतात. 'काय! अलीकडे तुमची चळवळ थंडावलेली दिसते!', असे, अगदी शिखरावर असलेल्या चळवळींच्या नेत्यांना सोडून, बाकी साऱ्यांना सुनावणारी पत्रकार मंडळी या वेळी मोठ्या औचित्याने वागली. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर दोनदोन मिनिटांच्या चित्रफिती दाखविल्या गेल्या. चौदा वर्षे, 'सरोवराच्या पाण्यात गाव बुडू लागले तर त्याबरोबर आपणही बुडून जाऊ' अशा निर्धाराच्या घोषणा करणारे शेतकरी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्यांना काढून लावताहेत आणि 'नर्मदा बांध झालाच पाहिजे' अशा घोषणा देत आहेत असे त्या चित्रफितींत दिसत होते.

 हे असे एक दिवस होणार आहे हे माहीत असूनही प्रत्यक्ष ही चित्रे पाहत असताना एक विषण्णता आली. 'नर्मदा बचाओ'चे हे असे झाल्यावर, छापील वृत्तपत्रांत इतके दिवस त्या आंदोलनाचा 'उदे उदे' करणारी आणि त्याच्या प्रकाशझोतात उजळून घेण्यास धडपडणारी मंडळी टोप्या फिरवून आता काय लिहू लागतील याची मोठी चिंता वाटली. प्रत्यक्षात असे काही झाले नाही. आजपर्यंततरी मराठी वर्तमानपत्रांत या नव्या कलाटणीसंबंधी कोठे छोटीशी बातमीही छापून आलेली दिसली नाही. संपादकीयाच्या बाजूचे सारे पान ऐसपैस लेखांनी भरून टाकणारी 'झोलाधारी' मंडळी सध्यातरी निपचित पडून असावीत.

अन्वयार्थ – दोन / २५५