पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






गुजरात आपत्तीची जबाबदारी कोणावर?


 ३० सप्टेंबर १९९३, अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस होता. मी शेतकरी संघटनेच्या कामाच्या दौऱ्यावर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मुक्कामी होतो. पहाटे पहाटे वीज कडकडावी तसा आवाज बराच वेळ येत राहिला. जमीन हादरल्याची काही फारशी जाणीव झाली नाही; पण काहीतरी जगाविपरीत घडले याची जाणीव झाली. आसपास काही अपघात झालेला नाही; तेव्हा, हा दूरवर कोठेतरी झालेल्या भूकंपाचा परिणाम असावा हे जाणवले. बातम्या समजण्यासाठी आकाशवाणीकडे धाव घेतली. संथपणे नेहमीची भक्तिगीते चालू होती. फटफटीत उजाडल्यानंतर पहिल्या बातम्या लागल्या, त्यात लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावी भूकंपाच्या धक्क्याने तीस हजारांवर माणसे ठार झाली असावीत असा अंदाज वर्तवण्यात आला. दोनतीन तासांनंतर प्रसृत झालेल्या वार्तापत्रात मृतांचा आकडा तीस हजारांच्या वर जाईल अशी भीती व्यक्त करण्यात आली किल्लारी, सास्तूर हा संघटनेच्या आंदोलनाचा महत्त्वाचा टापू. कोणत्याही कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे शक्य नव्हते. लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणच्या नेत्यांनी संध्याकाळपर्यंत निरोप दिला : सध्या भूकंपग्रस्त भागात ढिगारे उपसून त्यांतून प्रेते बाहेर काढण्याचे काम करण्याचा अनुभव आणि साधनं असलेल्या कार्यकर्त्यांचं प्रयोजन आहे. अन्यथा, हौशानवशांची इतकी भीड उसळली आहे, की पोलिसांना गर्दी आवरणे हेच मोठे काम होऊन बसले आहे. तीन दिवसांनंतर थोरमोठे पुढारी भेट देऊन गेले. तोपर्यंत मृतांचा आकडा एकदम तीस हजारांवरून दहा हजारांवर उतरला होता.

 गेल्या आठवड्यातील गोष्ट. २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन. मी सध्या दिल्लीतील राष्ट्रपती भवनासमोरील राजपथाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे इंडिया गेटच्या बाजूला राहतो. गेले दोन महिने मानवंदनेच्या कवायतींचा सराव करणाऱ्या

अन्वयार्थ – दोन / १६१