पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माहीत होणे आवश्यक आहे. अन्यथा, चार्वाक का शंकर, यांतील निवड करण्याचा अधिकार शिक्षण खात्यातील नोकरशाहीच्या हाती एकवटून जाईल.
 धर्म जिज्ञासा जागृत कशी करता येते याचा अनुभव घेण्याचे भाग्य मला काही थोर शिक्षकांमुळे लाभले. मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजात प्राचार्य एस.के. मुरंजन आठवड्यातून एक दिवस आत्मचिंतनचा कार्यक्रम ठेवीत. या कार्यक्रमात त्यांनी विश्वाचे अनंत स्वरूप वेगवेगळ्या तऱ्हांनी मांडले. ज्ञानेंद्रियांची त्रोटकता समजावून सांगताना आकाशात तारे दिसतात म्हणजे ते आहेत असे नाही, दिसतात याचा अर्थ काही प्रकाशवर्षांपूर्वी ते तारे होते असे त्यांच्या तोंडून ऐकताच डोक्यात झिणझिण्या उठत. 'ईश्वराच्या साक्षात्काराचा अनुभव सेंट पीटरपासून अनेकांनी सांगितला आहे. अशा अनुभवांचा भास आकडी (Epilepsy)च्या आजाराच्या अनुभवाने येऊ शकतो असे मानण्यात धार्मिकांचा काही उपमर्द नाही. काही आजार विश्वाच्या आकलनाचा मार्ग सुलभ करून देतात, एवढेच फारतर तात्पर्य निघते.' एवढी स्पष्ट मांडणी ते करीत. रसेलचा ट्रिस्ट्रॅम सॅण्डी आत्मचरित्र लिहायचे ठरवतो. अगदी बारीकसारीक तपशीलसुद्धा नोंदवायचा निश्चय करतो. एका दिवसाचे चरित्र लिहिण्यासाठी त्याला एक वर्ष लागते. बोला, त्याचे आत्मचरित्र कधी लिहून पुरे होईल? असे त्यांनी विचारताच आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात उत्तर लगेच तयार - शक्यच नाही. मग प्राचार्यांनी अनंत दिवस = अनंत महिने हे गणिती समीकरण सांगितले आणि कोणत्याही सात कालखंडात अशक्य असणारी ही गोष्ट अनंतात शक्यप्राय होते याची जाणीव होताच आम्ही सारे भांबावलो; पण डोक्यात धर्मजिज्ञासा जागृत झाली. अनंताच्या नेढ्यातून पुढे जाताना जग उलटेपालटे होते आणि लुई कॅरोलच्या आरशापलीकडील जग कथेप्रमाणे सारेच काही अनुभव उलटेपालटे होतात. या भूलभुलैयाने थोर थोर विचारवंत प्रेषित चकले. सांत विश्वातील नियम त्यानी अनंतावर लादले, त्यातून ज्ञानमार्गातील ईश्वराची भाकडकथा तयार झाली. या असल्या, बुद्धी चेतवणाऱ्या जिज्ञासा जागृत करणाऱ्या आत्मचिंतनाच्या प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांचा फायदा होईल यात काही शंका नाही; पण
 स्वतः प्रमाणम् परतः प्रमाणम् नैको मुनिर्यस्य मतमभिन्नम्
 धर्मस्य तत्त्वम् निहितम् गुहायः महाजनो येन गतः स पंथः

 या उक्तीप्रमाणे धर्माचे तत्त्व जाणून घेण्याची इच्छा तयार करण्याऐवजी केवळ पाठांतर आणि घोकंपट्टी या प्रशस्त मार्गाने विद्यार्थ्यांना हाकीत नेण्यात आले तर त्याचा विपरीत परिणाम होण्याचा भरपूर धोका आहे. आजच्या जगात

अन्वयार्थ – दोन / ११८