पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाऊस पडण्यासाठी यज्ञकर्म जागोजाग होतात, तेथे लोक उत्साहाने जमतात. पण, असल्या कर्मकांडाला बौद्धिक प्रतिष्ठा नाही. गीतेतील 'यज्ञात् भवति पर्जन्यः' हे पाठ करून विद्याथ्यांनी नंतर भूगोलाचा आणि हवामानशास्त्राचा अभ्यास करावा कसा? आणि 'संकरो भयावहः' पाठ करून जैविक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बीजसंकराचे काम निष्ठेने करावे कसे? उपनिषदांतील शिकवणुकीचे मर्म ध्यानी आल्यानंतर वेदांचे महत्त्व ते काय? पाण्याचे सरोवर मिळाल्यानंतर परसातील कूपाचे ते काय महत्त्व? वेदांतील कर्मकांडांना भुललेले आणि त्यापलीकडे काही नाही असे बेडकांप्रमाणे ओरडणारे यांच्यावर केलेला भगवद्गीतेतील शेलक्या वचनांचा मारा ऐकून वेद आणि उपनिषदे यांच्यातील संघर्षाचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले तर ते शिक्षण खात्याला आणि शासन संस्थेला परवडणार आहे का?
 राष्ट्राभिमानाच्या शिकवणुकीतही असेच सारे धोके आहेत. मी मराठी शाळेचा विद्यार्थी. शिवाजी महाराज हे आमचे दैवत. कर्नाटकातील कोणा यल्लम्मा राणीने केलेला शिवाजीचा पराभव आणि केलेली फजिती याची कहाणी ऐकल्यावर राष्ट्र म्हणजे नेमके कोणते हा प्रश्न मनात उठला. शेतकरी संघटनेचे काम सुरू केले त्याआधी 'भारत' आणि 'इंडिया' यांतील द्वंद्व कळले. कोणत्या राष्ट्राची बाजू घेऊन आपण उभे राहायचे आहे हेच कळेनासे झाले आहे. राष्ट्रांचा इतिहास विजेते लिहितात आणि जितांवर तो लादतात. चांगल्या हुशार विद्यार्थ्याच्या मनातही भारत म्हटले म्हणजे आपापल्या सभोवतालच्या प्रदेशाचेच चित्र येते; आसाम, नागभूमी, लक्षद्वीप यांचा विचार येत नाही. शालेय पाठ्यपुस्तकांत नेमक्या कोणत्या राष्ट्राच्या प्रेमाचे पोवाडे गायिले जाणार आहेत? वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या राष्ट्रांचा अभिमान शिकवला गेला तर त्यातून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल की तिला तडा जाईल?

 नाझी जर्मनीत आणि समाजवादी रशियात तसेच बहुतेक सर्व राष्ट्रांत राजकीय सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता वर्तमानात तर चालवायचीच; पण ती भविष्यकाळातही दीर्घ काळ चालावी यासाठी लहान विद्यार्थ्यांच्या मेंदूवर बलात्कार करायचे मेंदूसफाई (Brain Washing)चे तंत्र विकसित केले. आपल्या देशातही धर्म, राष्ट्र, इतिहास यांच्या शासनसंमत संकल्पना मुलांच्या डोक्यावर लादण्यात आल्या. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे राज्य आले, त्यांनी त्यांना अनुकूल असलेल्या व्यक्तींना मोठे केले; त्यांचा विचार प्रभावशाली राहावा यासाठी पाठ्यपुस्तकांच्या आधारे विद्यार्थ्यांची कोवळी मने दडपून टाकली. आता नवा पक्ष सत्तेवर आला

अन्वयार्थ – दोन / ११९