पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/289

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिजे.
 मंगल संस्काराचे सोंग
 हिंदू विवाहाची परंपरा व्यवहाराच्या देवघेवाची नाही 'मंगलसंस्कार', शब्द मोठे मोहक आणि उदात्त, स्त्रियांना 'देवता' म्हणायचे आणि पायदळी तुडवायचे असा हा कसला संस्कार? 'संस्कार' आणि 'करार' दोन्ही गुऱ्हाळात स्त्रियांचे चिपाडच होत आले.
 संस्कार, आयुष्यभराकरिता घेतलेली 'नातिचरामि' शपथ असल्या संकल्पना कधी महत्त्वाच्या होत्या किंवा नाही याबद्दल शंका आहे. रामाने सीतेला वनवासात पाठवले. त्याला काही मिथिलेतील मंगल विवाहात घडलेल्या संस्कारांची अडचण वाटली नाही. मग 'कलियुगात' संस्कारांची काय ती मातब्बरी!
 करारनामा भागीदारीचा हवा
 पती-पत्नीचे नाते जमीनदार - कुळासारखे आहे. सारे एकतर्फी. मालक संतुष्ट झाला, त्याची मेहरनजर झाली तर काय वाटेल ते औदार्य दाखवले; पण कशाने नाराज झाला तर लाथ मारून हाकूनही लावेल. पत्नीला आणि कुळाला हक्क म्हणून काही नाहीत. त्यामुळे सर्व समाजातील स्त्रियांची भूमिका एकसारखीच आहे, "तुमच्या औदार्यावर आम्ही जगू इच्छित नाही. आमच्या हक्काचे काय ते बोला!"

 विवाह संबंध भविष्यकाळात कराराच्या स्वरूपाचे होणार आहेत यात काही शंका नाही. संस्काराच्या सोंगाचे दिवस आता संपत आले आहेत; पण येणाऱ्या युगातील विवाह करार भागीदारीच्या स्वरूपाचेच असतील. गुलामगिरीचे किंवा नोकरदारीचे नसतील.
 या वाटचालीत अडथळा येतो आहे तो सुधारणावाद्यांचा आणि दुसऱ्यांच्या धर्मव्यवस्थेत लुडबुड करणाऱ्यांचा.
 लुडबुड्यांना स्त्रियांच्या वेदनांचे काय होय?
 "संस्कार म्हणून मुलीचे कन्यादान केलेत ना त्याच दिवशी ती तुम्हाला मेली, आता तिच्या मरणाबद्दल पोलिसात जाऊन तक्रार कसली करता? सासरच्यांनी मुलीचे काहीही हाल केले तरी त्याबद्दल वधूकडील लोकांनी चकार शब्द काढू नये. न तद्वाच्यम वधूबंधूभिः असा कालीदासी नियम आहे. पोलिसात मुलीच्या मृत्यूबद्दल तक्रार करणारा हरेक आईबाप हिंदू परंपरेचा भंग करतो." असा आक्रोश धर्ममार्तंडानी केला तर? त्रिवार तलाक इस्लामचा अविभाज्य भाग आहे. असा आग्रह मुल्ला मौलवींनी धरला तर?

अन्वयार्थ - एक / २९०