पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रा. अविनाश सप्रे, डॉ. महेंद्र कदम, डॉ. रफीक सूरज, व डॉ. नंदकुमार मोरे यांनी देशमुख यांच्या समग्र कादंबरी वाङ्मयाच्या विविध पैलूंवर लिहिले आहे.
 अविनाश सप्रे यांनी देशमुख यांच्या लेखनातील उदारमतवादी, मानवतावादी विचारव्यूह शोधला शोधला आहे. प्रशासनाची सर्जनशील चिकित्सा त्यांच्या कादंबरीवाङ्मयात आहे. समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग दाखविणारी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही मराठीमधली एकमेव कादंबरी असल्याचे सप्रेनी नमूद केले आहे. अनुभवाचे कल्पितामध्ये रूपांतरण करणारी कादंबरी देशमुखांनी लिहिली आहे. तसेच देशमुख यांच्या कादंबरीची त्यांनी चित्रपट माध्यमाशी तुलना केली आहे. डॉक्युमेंटरीतील दृश्यमिती त्यांच्या कादंबरी रचिताला आहे. मराठीतील साने गुरुजी, वि. स. खांडेकर बोधवादी परंपरेतील देशमुखांची कादंबरी आहे असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. बदलणारे जग कसे असेल याबद्दलची भूमिका देशमुखांच्या कादंबरीत आहे असे नोंदविले आहे.
 डॉ. महेंद्र कदम यांनी हिंदीतील सुप्रसिद्ध विचारवंत मॅनेजर पाण्डेय यांनी मांडलेल्या 'लोकशाही आणि कादंबरी' या विचारसूत्राच्या प्रकाशात देशमुख यांच्या कादंबरीचे स्वरूप विशद केले आहे. देशमुख यांच्या कादंबरीतील आशयसूत्रांचा समकाळातील लोकशाही मूल्यांशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे. लोकशाहीचे बळकटीकरण करून रांगेतल्या शेवटच्या माणसाला या कादंबरीने केंद्रस्थानी ठेवले आहे, असा विचार मांडला आहे.
 मुस्लीम जीवनसंस्कृतीची विपुल चित्रणे देशमुख यांच्या कथात्म साहित्यात आहेत. डॉ. रफीक सूरज यांनी देशमुख यांच्या कादंबरीतील मुस्लीम जीवनचित्रणाच्या वेगळेपणाबद्दलचा विचार मांडला आहे. विशेषत: मुस्लीम स्त्रियांची अधिकांश रूपे त्यांच्या साहित्यात आहेत. मराठी साहित्याने या प्रकारच्या चित्रणाकडे पूर्वग्रही दृष्टीने पाहिले आहे. मुस्लीम संस्कृतीत असणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावी चर्चा देशमुखांनी केली आहे. 'सलोमी' च्या तुलनेत 'इन्कलाब विरुद्ध जिहाद' मधील स्त्रिया अधिक बंडखोर व स्वतंत्र विचारसरणीच्या आहेत. या व्यक्तिरेखांतून त्यांच्या विचारसरणीचे वहन केले असून जगातील मुस्लीम संस्कृतीचे, त्यांच्या जीवनरीतीचे देशमुख यांनी बारकाईने केल्याचे चित्रण त्यांनी नमूद केले आहे. डॉ. नंदकुमार मोरे यांनी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबरीच्या भाषारूपाबद्दलचा विचार मांडला आहे. भाषेची संदर्भबहुलता ध्यानात घेऊन प्रशासन भाषेची तपशीलवार चित्रे त्यांच्या लेखनात आहेत. औपचारिक भाषारूपे, सिनेमॅटिक स्वरूपाची भाषा व भाषेची संमिश्ररुपे त्यांच्या कादंबरीत असून तीमध्ये काही प्रमाणात भाषिक आवाहकत्वाचा अभाव असल्याचे नोंदविले आहे.
 

राजकीय जाणिवांचे चित्रण हा देशमुखांच्या कादंबरीचा एक महत्त्वाचा अक्ष

१४ □ अन्वयार्थ