पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विहीर, चर, बैल, गोठा, मांडव, कुंपण, मोट, इंजिन, मोटार, पंप, स्टार्टर, पाइप्स इत्यादीवर जो खर्च केला असेल, तो भांडवली खर्च पकडून, त्याच्या १० टक्के रक्कम ही वार्षिक खर्चापोटी धरली पाहिजे. ह्यातील काही गोष्टी पाच वर्षे टिकतात, काही वर्षभर टिकतात तर काही दर हंगामात घ्याव्या लागतात. त्यांच्या देखभालीवर व पुनःखरेदीवर होणारा खर्चही त्या-त्या प्रमाणात वार्षिक खर्चात धरला पाहिजे.
 शेतावर मजूर नेमताना जी मजुरी दिली जाते तो खर्च तर धरलाच पाहिजे, पण शिवाय आपल्या घरची जी माणसे शेतावर राबतात त्यांचीही मजुरी खर्चात धरली पाहिजे. ही मजुरी पकडताना मुलांचे शिक्षण, औषधपाणी, लग्नकार्य वगैरेंवर होणारा खर्चही विचारात घेतला पाहिजे. नाहीतर वरकरणी शेती नफ्यात दिसली, तरीही लग्नकार्य करताना प्रत्येक वेळी जमीन गहाण ठेवावी लागेल!

शेती चार महिने चालते; पण त्या उत्पन्नावर बारा महिने आपल्याला जगायचे असते; म्हणून संपूर्ण बारा महिन्यांचा सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च शेतीखर्चातच पकडला पाहिजे.
 खते, बियाणे, औषधे, फवारणी, वीज, पाणी, वाहतूक यांचाही खर्च हिशेबात धरला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशातील भ्रष्ट यंत्रणेमुळे शासनाकडचे प्रत्येक काम करून घेताना शेतकऱ्याला प्रचंड त्रास होत असतो. तलाठ्याकडून सात बाराचे उतारे आणणे, गाव नमुना क्रमांक आठचे उतारे आणणे, भावाचा अंदाज घेण्यासाठी बाजारसमितीत जात राहणे, चालू असलेल्या अनेक खटल्यांत कोर्टात हजेरी लावणे आणि संध्याकाळी निराश मनाने पुढची तारीख घेऊन परत येणे, कर्जासाठी सोसायटीकडे वा बँकेत चकरा मारणे, इतके सारे करूनही जेव्हा कर्ज फेडता येत नाही, व्याजही भरता येत नाही आणि घराची जप्ती होणार अशी नोटीस येते, तेव्हा काहीतरी पळवाट काढण्यासाठी थोरामोठ्यांचे पाय धरायला धावाधाव करणे ह्या साऱ्यात शेतकऱ्याचा पैसा व वेळ जातोच, पण शिवाय जीव अक्षरशः मेटाकुटीला येत असतो. भविष्यात अधिक शेती घ्यायची असेल, घर बांधायचे असेल, इतर काही मोठा खर्च करायचा असेल, तर त्याची तजवीजही करून ठेवायला हवी. ह्या साऱ्यासाठी लागणारा पैसा हा शेतीमालाच्या विक्रीतूनच येणार असल्याने त्याचाही हिशेब शेतीमालाचा रास्त भाव काढताना करायला हवा असे जोशी सांगत.

 कारखानदार आपला उत्पादनखर्च कसा काढतात हे जोशी समजावून सांगत. केवळ कामगारांचा पगार वा कच्च्या मालाची किंमत खर्चात धरणे पुरेसे नाही. इमारती, वीज, पाणी, सरकारी कर, सुपरवायझर, हिशेबनीस, सुरक्षा व्यवस्था, इतर व्यवस्थापन, कामगारकल्याण, स्टेशनरी, गोदामे, जाहिराती, विक्रेते, त्यांनी विक्रीसाठी केलेले दौरे, प्रदर्शने, प्रवासखर्च, विक्री वाढावी म्हणून दिलेल्या मेजवान्या, अधिकाऱ्यांना द्यावी लागणारी लाच, भांडवलावरील व्याज, कर्ज मिळवण्यासाठी करावा लागणारा खर्च, वकील व इतर मदतनिसांचा खर्च, इमारतींचा घसारा, विम्याचे हप्ते, काही टक्के उत्पादन रिजेक्ट होणार हे गृहीत धरून त्याचा पकडलेला खर्च, बाजारपेठेतील चढउतारांमुळे तोटा आला, तर तो सहन करण्यासाठी जी

शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी ◼ २३३