पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तरतूद करावी लागते तो खर्च, सल्लागार, तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी व भावी वाढीसाठी गंतवणूक, नव्या मशिनरीचा खर्च, देखभालीचा खर्च, समाजात आपल्याविषयी गुडविल' (सद्भावना) राहावी म्हणून केल्या जाणाऱ्या दानधर्माचा खर्च इत्यादी असंख्य बाबी कारखानदार आपला उत्पादनखर्च काढताना पकडत असतो. कधी कधी तोटा आला, तर तो भरून काढता यावा, एका प्रकारचे उत्पादन बंद करून दुसऱ्याच प्रकारचे उत्पादन सुरू करायचे असेल तर त्यासाठीची तजवीज वगैरे सगळे घटकही कारखानदार विचारात घेत असतो.
 मग त्यावर स्वतःचा नफा किती ते धरून कारखानदार आपल्या मालाच्या विक्रीची किंमत ठरवत असतो. जगातले सर्वच उत्पादक आपल्या उत्पादनाची किंमत आपण ठरवतात; आपण शेतकऱ्यांनीदेखील हेच केले पाहिजे असे जोशी म्हणत.
 कृषिमूल्य आयोग शेतीमालाचा भाव निश्चित करत असे व त्याच्या कार्यपद्धतीत जोशींनी अनेक त्रुटी दाखवन दिल्या. उदाहरणार्थ, शेतकऱ्याला आपला माल बाजारपेठेत नेण्यासाठी जो खर्च करावा लागतो, तो आयोगाने सुरुवातीची पंधरा वर्षे विचारातच घेतला नव्हता व जेव्हा जोशींनी त्यांच्याशी चर्चा करताना ही त्रुटी निदर्शनास आणली, तेव्हाच त्यांनी ती चूक कबल केली होती. हाच प्रकार औत-अवजारांच्या दुरुस्तीखर्चाच्या बाबतीत घडला होता. तीही चूक नंतर त्यांनी कबूल केली होती.
 खर्च काढताना देशातले सहाएक हजार शेतकरी निवडून, त्यांच्या खर्चाची सरासरी काढण्याची पद्धत कृषिमूल्य आयोग वापरतो. त्या पद्धतीत साडेपाच हजार शेतकरी अतिशय लहान असतात व औषधफवारणीसाठी त्यांचा खर्चही जवळपास काही नसतो. त्यामुळे कृषिमूल्य आयोगाने काढलेला औषधफवारणीचा सरासरी खर्च हा एका हेक्टरला फक्त रुपये १०.७३ असतो! प्रत्यक्षात तेवढ्या पैशात पाणीफवारणीदेखील करता येत नाही! शिवाय, दुर्दैवाने जे बहुसंख्य शेतकरी अत्यंत दरिद्री आहेत, त्यांचेच खर्चाचे आकडे सरासरी खर्च काढताना व त्यावर आधारित भाव ठरवताना अधिक प्रमाणात आधारभूत धरले गेले, तर त्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भविष्यातदेखील कधी सुधारण्याची काहीही शक्यता राहत नाही. कारण त्यांना मिळणारे भाव अत्यंत अपुरे असतात.
 सामान्य शेतकरी जास्त खर्च करत नाही म्हणून त्याला जास्त भाव मिळत नाही, व त्याला जास्त भाव मिळत नाही म्हणून तो जास्त खर्च करू शकत नाही, अशा दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे.
 हे दोष टाळण्यासाठी उत्पादनखर्च काढताना एक शास्त्रीय उपाययोजना जोशींनी मांडली होती. त्यांच्यातील संख्याशास्त्रज्ञ व अर्थशास्त्री ह्या कामात दिसून आला होता. शेतीमालाचा उत्पादनखर्च कृत्रिम नमुना पद्धतीने (Synthetic Model Method) काढला पाहिजे असा त्यांचा प्रस्ताव होता. तो नेहमीच्या सरासरी काढण्याच्या पद्धतीने कधीच काढता येणार नाही असे ते म्हणत. ती पद्धत संख्याशास्त्रीयदृष्ट्या किती चुकीची आहे हे जोशींनी दाखवून दिले.


२३४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा