पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



संपन्न गणले जात. एकेकाळी पाच-पाचशे एकर शेती असणारे अनेक शेतकरी इथे होते. अशा मोठ्या शेतकऱ्यांसाठी विदर्भातला यवतमाळ जिल्हा विशेष प्रसिद्ध होता. (हाच जिल्हा आज मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे.) तिथला कापूस प्रसिद्ध. ब्रिटिशांनी त्या काळात इथल्या कापसाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मीटर गेज रेल्वे मार्गाचे, वळणावळणाने जाणारे, सगळा जिल्हा व्यापणारे जाळे उभारले होते. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र विदर्भाची आर्थिक स्थिती खालावत गेली. इथल्या शेतीतही तसेच स्खलन झाले.
 भारतातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी ३६ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे, परंतु कापसाच्या एकूण उत्पादनात मात्र महाराष्ट्राचा वाटा फक्त १७ टक्के आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात कापसाखाली असलेल्या एकूण जमिनीपैकी फक्त ४ टक्के जमीन बागायती आहे उर्वरित ९६ टक्के पूर्णतः कोरडवाहू आहे. पावसाने दगा दिला, की कापूस उत्पादन कोसळते. महाराष्ट्रातील कापसाचे दर एकरी उत्पादनही अन्य राज्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. महाराष्ट्रात एका एकरात एक क्विटलपेक्षा कमी कापूस निघतो, तर देशातील कापसाचे सरासरी एकरी उत्पादन दोन क्विटल आहे: महाराष्ट्राच्या दुप्पट.
 कापसाचे एकूण क्षेत्र अधिक असल्यामुळे साहजिकच कापसावर अवलंबून असलेल्यांची संख्याही महाराष्ट्रात बरीच मोठी आहे. परंपरेने हा शेतकरी कापूस लावत आला आहे व त्याला अन्य कुठल्या कोरडवाहू पिकांकडे वळवणे, सोयाबीनसारखा अपवाद वगळता, आजवर तरी फारसे जमलेले नाही. दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात विदर्भातील कापसाचे पीक बाहेर पडते आणि दरवर्षी हा शेतकरी कर्जाच्या गाळात अधिकाधिक रुतत जातो.
 कांदा, ऊस, तंबाखू यांच्यानंतर शेतकरी संघटनेने उभारलेले महत्त्वाचे आंदोलन म्हणजे कापूस आंदोलन. ऊस आंदोलनानंतर लगेचच, १९८०-८१च्या सुमारास, शरद जोशींनी विदर्भाचा दहा दिवसांचा दौरा केला होता. पुण्यातील एक पत्रकार सतीश कामत हे त्यावेळी त्यांच्यासोबत होते. विदर्भात जायचा जोशींचा हा पहिलाच प्रसंग होता. कामत यांनी प्रस्तुत लेखकाला दिलेल्या माहितीनुसार विजय जावंधिया आणि रवी काशीकर यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. जावंधिया जोशींच्या आधीपासूनच शेतकऱ्यांच्या चळवळीत होते; अगदी आणीबाणीच्या काळातही त्यांनी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याविरुद्ध कापसाच्या भावावरून निदर्शने केली होती. काशीकरही सामाजिक कामात सहभाग घेणारे होते; शरद पवार यांच्याशी त्यांची व्यक्तिगत मैत्रीही होती. या दोघांनी विदर्भात दहा दिवसांत दहा जिल्ह्यांमध्ये जोशींसाठी जाहीर सभा आयोजित केल्या होत्या. कामत म्हणतात,
  “या सर्वच सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आम्ही सगळीकडे मोटारीतून फिरलो. वाटेत ठिकठिकाणी बैठका होत असत. जोशींचे विचार पारंपरिक नेत्यांपेक्षा अतिशय वेगळे होते व सर्वांना अगदी भारावून टाकत असत. या पहिल्याच दौऱ्यात जोशींनी अनेक माणसे विदर्भात जोडली व पुढे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा या भागांपेक्षा विदर्भातील कार्यकर्त्यांनीच जोशींना सर्वाधिक साथ दिली."


१९० = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा