पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

येताना बायकोचा आणि मुलाबाळांचा निरोप घेऊन आला आहे. प्राण गेला तरी बेहत्तर, तुरुंगात जावं लागलं तरी हरकत नाही; पण दर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही अशी प्रत्येक शेतकऱ्यानं शपथ घेतली आहे."
 ह्या सर्वच भाषणांना जोरदार प्रतिसाद मिळत होता. आंदोलकांमधील जिगर इतके दिवस थांबूनही कायम होती. सरकारला वाटले होते, आपण दुर्लक्ष करत राहिलो तर एक दिवस सगळे शेतकरी थकून जातील, आपापली घरची व शेतावरची तुंबलेली कामे करायला आपापल्या गावी परत जातील. पण प्रत्यक्षात तसे घडले नव्हते.
 शनिवार, चार एप्रिलला वातावरण बरेच तापू लागल्याचे जाणवत होते. त्या दिवशी शरद जोशींच्या आदेशानुसार निपाणीतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सोमवार, सहा एप्रिलपासून निपाणीतील सर्व बँका बंद ठेवायचा आदेश शरद जोशींनी दिला होता. त्यामुळे सामान्य माणसाचीही काही गैरसोय नक्कीच होणार होती, पण खरी गैरसोय होणार होती ती रोज लाखोंचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांची व तोच आंदोलकांचा उद्देश होता.
 सोमवारपासून आंदोलननगरीला समांतर असलेल्या एका पर्यायी मार्गावरही रास्ता रोको करायचा निर्णय शरद जोशींनी शनिवारीच जाहीर केला होता. चिकोडीमार्गे जाणारा हा रस्ता महामार्गाला पर्याय म्हणून वाहने वापरत असत व ते आवश्यकही होते. कारण अन्यथा सगळा पुणे-बंगलोर महामार्गच ठप्प झाला असता. सगळ्यांचीच फार गैरसोय होऊ नये म्हणून हेतुतःच जोशींनी हा पर्यायी रस्ता चालू ठेवला होता. पण आता तीन आठवडे शांततापूर्ण सत्याग्रह करूनही सरकार अजिबात दाद देत नाहीए, हे बघितल्यावर नाइलाजाने सोमवारपासून तो पर्यायी रस्ताही बंद ठेवायचे ठरले होते. बहुधा त्यामुळेच त्या रात्री पोलिसांच्या हालचाली एकाएकी खूप वाढल्याचे दिसत होते. संकेश्वर, बेळगाव, चिकोडी इथून बऱ्याच एसटी बसेस मागवल्या गेल्या होत्या. एसआरपींच्या अनेक पलटणीदेखील आंदोलन नगरीच्या आसपास येऊन दाखल झाल्या होत्या. स्वतः डीएसपी निपाणीच्या डाकबंगल्यात मुक्काम ठोकून होते.
 रविवार, पाच एप्रिलचा दिवस उजाडला.
 त्या दिवशी गुढी पाडव्याचा सण होता. आंदोलन नगरी उत्साहाने वाहून निघाली होती. गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. तसा कर्नाटकच्या ग्रामीण भागात सणांचा प्रभाव जास्तच असतो; आंदोलनाच्या ह्या वातावरणात तो अधिकच होता. खूप लौकर उठून सर्वांनी मोठ्या हौसेने आपापल्या राहुट्या झाडून काढल्या. भोवताली पाण्याचा शिडकावा केला. दारावर आंब्याच्या पानांची तोरणे लटकवली. स्वच्छ धुतलेल्या काठीवर आकर्षक अशा इरकली किंवा धारवाडी खणाची कुंची चढवून लख्ख धुतलेला पितळी गडू त्यावर उलटा ठेवला. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या सगळ्या ओळीने उभारलेल्या गुढ्या मोठ्या सुरेख दिसत होत्या, सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. सगळे शेतकरी आणि त्यांच्या बायका

धुमसता तंबाखू - १८३