पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होता. हे अगदी अनपेक्षित होते. बहुतेकदा नेते मंडळी दूर कुठेतरी सरकारी डाक बंगल्यात किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलात मुक्काम करत असत. जोशींचा साधेपणा सर्वांनाच भावणारा होता. ज्या अनौपचारिकपणे जोशी सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर मिळूनमिसळून वागत होते त्याचेही दोघांना खूप आश्चर्य वाटले.
 आपली मोटरसायकल ह्या दोघांनी शरद जोशींच्या झोपडीच्या बाहेर ठेवली होती व पुढले जवळजवळ चार तास गप्पांच्या ओघात ते तिथे फिरकलेही नाहीत. मोटरसायकलवर आपल्या दोघांचे सामान ठेवलेले आहे हे ते पार विसरूनही गेले होते. पण त्यांनी ठेवलेले त्यांचे सर्व सामान तसेच्या तसे सुरक्षित राहिले होते, ही गोष्ट कुळकर्णी यांनी नंतर आपल्या लेखात आवर्जून नमूद केली होती. रात्री अकरा वाजता सगळ्यांचे एकत्रच जेवण झाले. पिठले, भाकरी, चटणी, आंबील व शेवटी दहीबुत्ती. हजारो आंदोलक शेतकऱ्यांसोबत उघड्यावरती एकत्र जेवणे हा खूप रोमांचक अनुभव होता. जेवताना दिवसभर काय घडले व उद्या काय करायचे आहे ह्याचीच चर्चा सुरू होती.
 ह्या आंदोलनात कुळकर्णी व म्हात्रे यांना जोशी यांचे व शेतकरी संघटनेचे जे दर्शन घडले त्यामुळे दोघेही अतिशय प्रभावित झाले. दोघांनीही पुढे आंदोलनात सक्रिय भाग घेतला. आंदोलनाविषयी कुळकर्णीनी सोबत साप्ताहिकात व इतरत्रही बरेच लेखन केले. म्हात्रे यांनीतर त्यानंतर आपले सगळे जीवनच शेतकरी संघटनेला अर्पण केले.
 दोन आणि तीन एप्रिलच्या सभा विशेष महत्त्वाच्या होत्या. कारण निपाणीतील शेतकऱ्यांनी काढलेल्या व नंतरच्या व्यापाऱ्यांनी प्रायोजित केलेल्या प्रतिमोामुळे वातावरण बरेच तंग झाले होते. इतके दिवस रास्ता रोको करून शेतकरीही आता काहीसे इरेस पेटले होते. संयम कमी होत चालला होता. ह्या सभांमधून वेगवेगळ्या नेत्यांनी मांडलेले काही विचार इथे संक्षेपाने मांडणे उपयुक्त ठरेल. परुळकर यांनी आपल्या लेखमालेत उद्धृत केलेल्या भाषणांमधील हे अंश आहेत.
 तंबाखू कामगार महिलांच्या नेत्या अक्काताई कांबळे म्हणाल्या :
 "माझ्या शेतकरी बांधवांनो, डीएसपी काय, पण त्याचा बाप आला तरी तुम्ही रस्त्यावरून उठू नका! ज्यावेळेला हे दलाल शेतकऱ्यांच्या पाया पडतील, तेव्हाच हे आंदोलन संपणार, त्याआधी नाही. आमच्या तंबाखूला योग्य भाव मिळाल्याशिवाय आम्ही हलणार नाही, आम्हाला खुशाल अटक कर, असं डीएसपीला सांगायचं.... तुमच्यासाठी आम्ही आमच्या रोजगाराची, मुला-बाळांचीसुद्धा फिकीर करायची नाही असं ठरवलंय. वखारीतील आमचं काम बंद पडलं तर आम्ही दगड फोडून पोट भरू, पण आता ह्या दलालांना सोडणार नाही. आम्ही आमच्या नवऱ्यांनापण सांगितलंय, की जरी आम्ही तुमच्या लग्नाच्या बायका असलो, तरी आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या कोणी नव्हेत. आम्ही फक्त आंदोलनातल्या सत्याग्रही आहोत!"

धुमस्वता तंबाखू - १८१