पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाठिंबा जाहीर केला. व्यापाऱ्यांची तशी थोडीशी फजितीच झाली.
 दगडफेकीची व मोटार सायकलींची नासधूस केल्याची बातमी आंदोलननगरीत पोचताच अकोळ व निपाणीमधले दीड-दोन हजार चिडलेले तरुण शेतकरी लगेच प्रतिमोर्चा घेऊन निपाणीत जायला निघाले. प्रत्येकाच्या हातात झेंडे लावलेल्या लाठ्या होत्या. व्यापाऱ्यांच्या चेल्यांना चांगला धडा शिकवायचा त्यांचा निर्धार होता. काही स्थानिक नेत्यांनी उत्साहाच्या भरात त्यांना तसे करायला प्रोत्साहनही दिले, पण जोशींनी आपल्या भाषणात त्यांना थोपवले. 'कुठल्याही प्रकारे आपण दुसऱ्यांवर हात उगारायचा नाही. एकही काठी आंदोलनात दिसता कामा नये. समोरचा कसाही वागो, आपण मात्र संयम, शिस्त आणि शांतता पाळायची.' असा जोशींचा आदेश होता. त्याचबरोबर आजच्या निपाणीतील हिंसक मोाला जबाबदार असलेल्या वीस व्यापाऱ्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची एक यादीही त्यांनी आपल्या भाषणात दोन वेळा वाचून दाखवली व सहा एप्रिलपर्यंत त्यांना पोलिसांनी अटक केली नाही, तर त्यानंतर ५०,००० शेतकरी सत्याग्रहासाठी निपाणी गावात प्रवेश करतील असेही त्यांनी जाहीर केले.
  'सहा एप्रिलच्या दुपारपर्यंत सगळ्या आंदोलकांना आम्ही इथून हुसकावून लावणार आहोत,' असे आश्वासन एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांना दिल्याची बातमी शेतकरीनेत्यांच्या कानावर आली होती, पण त्यांनी त्याची फारशा गांभीर्याने दखल घेतली नाही.
 अलिबागचे एक प्राध्यापक व समीक्षक अरविंद वामन कुळकर्णी यांच्याविषयी इथे लिहायला हवे. साहित्यक्षेत्रातील ज्या फार थोड्या व्यक्तींनी त्या काळात शरद जोशींच्या आंदोलनाची आस्थेने दखल घेतली त्यांच्यातले हे एक. त्याआधी पाच महिने, गेल्या नोव्हेंबरमध्ये, त्यांनी ऊस आंदोलन जवळून पाहण्यासाठी नाशिकचा दौराही केला होता; पण त्यावेळी जोशी तुरुंगात असल्याने दोघांची गाठ पडली नव्हती. पुढे कुळकर्णीनी शेतकरी आंदोलनासंबंधात लिहिलेला एक लेख निपाणीत आंदोलन सुरू असताना शरद जोशींच्या वाचनात आला. तो त्यांना आवडला आणि ते म्हणून गेले की, 'या माणसाला भेटायला पाहिजे.' आंदोलकांच्या गर्दीत उभे असलेले विश्वासराव भोजकर ओरडले, 'अहो, तो माझा लाडका पुतण्या आहे. त्यावर शरद जोशी म्हणाले, 'तार करून बोलवा त्यांना.' विश्वासरावांनी त्वरित अलिबागला तार करून कळवले की, 'शरद जोशी तुला भेटू इच्छितात, लगेच ये.' त्यानुसार नाशिकप्रमाणेच ते सुरेशचंद्र म्हात्रे ह्या आपल्या प्राध्यापक स्नेह्यांसोबत त्यांच्याच याझदी मोटरसायकलवरून ३ एप्रिल १९८१ रोजी सकाळी आठ वाजता अलिबागहून निघाले. साधारण बारा तासांचा प्रवास करून रात्री आठच्या सुमारास निपाणीला पोचले.
 त्याच रात्री उशिरा त्यांची शरद जोशींबरोबर गाठ पडली. जोशींना प्रत्यक्ष भेटण्याचा त्यांचा तो पहिलाच प्रसंग. "मुख्यमंत्र्यांच्या गावचे तुम्ही! आम्हाला वाटलं हेलिकॉप्टरनेच याल!" असे म्हणत, थट्टामस्करी करतच जोशींनी दोघांचे स्वागत केले. प्रत्यक्ष रास्ता रोको जिथे चालू होते तिथेच एका छोट्या झोपडीत स्वतः जोशी यांनीही त्या रात्री मुक्काम केला
१८० अंगारवाटा... शोध शरद जोशींचा