पान:अंगारमळा (Angarmala).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या दिवशी भाषण झाल्यानंतर त्याने कबूल केले व तो म्हणाला, "दर वेळी तुम्हाला मी कोणत्या संकटात टाकतो ते मला आज कळले."

 बाबूलालचा छापखाना जुन्या पद्धतीचा. त्यात कधी मोडतोड व्हायची, कधी जुळारी नसायचा तर कधी वीजच जायची. अशाप्रसंगी तयार झालेला मजकूर घेऊन मी पुण्यात जायचो, पुण्याच्या जुन्या भागात एका छापखान्यात ते घेऊन जायचो, दादापुता करून रात्रीत खिळ्यांची जुळणी करून द्यायला सांगायचो. तिथेच बसून राहायचो आणि जुळणी होईल तसे मुद्रिते तपासून द्यायचो.

 'वारकरी'च्या प्रकाशनाचा कार्यक्रम ठरला त्याच वेळी छातीला बिल्ले लावण्याचीही कल्पना निघाली. लाल रंग असावा, पांढरी अक्षरे असावीत हेही ठरले; पण कागदी बिल्ले करणे हे कुणाला पटेना. बाबूलालचाच कोणी शहा म्हणून मित्र पुण्यात होता. त्याच्याकडे जाऊन त्याला आम्ही गळ घातली. त्याने २४ तासांत प्लॅस्टिकचे बिल्ले तयार करून द्यायचे अंगावर घेतले. या पहिल्या बिल्ल्याचा नमुना आजही काही जणांकडे असेल ! नंतर, परभणी अधिवेशनापासून बिल्ले पत्र्याचे निघाले. एवढेच नव्हे तर, हा बिल्ला संघटनेच्या झेंड्यावरही अवतरला. आज शेतकरी संघटनेचा हा बिल्ला कुठेही दिसला तर लोकांना खूण पटते. त्या प्रतीकाचे श्रेय बाबूलालकडे जाते.

 आंदोलन सुरू झाले. कांद्याची बाजारपेठ बंद पडली. त्याच वेळी भामनेर सडकेचे आंदोलनही पेटू लागले. भामनेरचे बार्डोली बनले. करबंदीची चळवळ सुरू झाली. एस.आर.पी.च्या गाड्या भरभरून भामनेर रस्त्याला जाऊ लागल्या. रस्ता कसला खाचखळग्यांनी, दगडगोट्यांनी भरलेला व जवळजवळ सर्व अंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूस टेकड्यांचे उंचवटे. गावकऱ्यांनी गोफणीच्या हत्याराने एस.आर.पी.ना अडवण्याची तयारी चालवली. तेवढ्यात निवडणूक आली आणि साऱ्या भामनेरच्या २४ गावांनी मतदान केंद्रे उघडूच द्यायची नाहीत आणि मतदानही करायचे नाही असे जाहीर केले. मग, सरकारनेही पावले उचलायला सुरवात केली. आम्हा दहा जणांना चाकण बाजारात पकडले. खेडच्या कोर्टात नेऊन उभे केले. कोर्टाने दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. आम्हाला सगळ्यांना पोलिसांनी निळ्या गाडीत बसवले. त्यांत बाबुलालही आला. गाडी पुण्याकडे निघाली. आमची चर्चा सुरू झाली. 'येरवड्याला नेतात वाटतं?' गाडी येरवडा ओलांडून नगर रस्त्याला लागली. 'नगरच्या तुरुंगात नेतात असे दिसते.' पहाऱ्यावरच्या पोलिसाला बाबूलालने विचारले, 'गाडीत पेट्रोल भरपूर आहे ना? नाही तर मध्येच कुठेतरी थांबवाल.' बाबूलालने विचारायचा अवकाश, गाडी गचकन् थांबली. 'पेट्रोल नसावे.'

अंगारमळा । ८०