पान:अंगारमळा (Angarmala).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाबूलालच त्यांच्यावर ओरडणार, दिसत नाही का साहेब बसले आहेत?' बिचारे गिऱ्हाईक माझ्या धाकाने निघून जायचे. पण, शेवटी व्हायचे तेच झाले. छापखाना बुडायला आला.

 बाबूलालचे त्या वेळी थोड्या वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या लग्नाची आख्यायिका तो सांगे, 'माझी शेती आहे, छापखाना आहे, मी ग्रॅज्युएट आहे; पण कोणी मुलगी देईना. मग मी देहूच्या एका शाळेत शिक्षकाची तात्पुरती नोकरी मिळवली. मुलगा नोकरदार आहे म्हटल्यावर मुलींच्या बापांच्या ह्या रांगा लागल्या. शेवटी, पार दूरच्या नागपूरच्या सुखवस्तु कुटुंबातल्या सुषमाचा बाप आला. लग्न ठरले. इष्ट हेतू साध्य झाल्याबरोबर मी नोकरी सोडून दिली.'

 बाबूलालचे पूर्ण नाव मोहनलाल बिहारीलाल परदेशी. चाकणात परदेशींचा गोतावळा मोठा आहे. देहूआळंदी क्षेत्रांशी येऊनजाऊन संबंध दाट. बाबूलाल लहान वयातच कीर्तन करू लागला; अगदी धोतरकुडता, उपरणेपागोटे घालून. कीर्तनकारीच्या या कालखंडातच बाबूलालने पुराण -भागवतातील अनेक कथा- अख्यायिका आणि चुटके यांचे संपन्न भांडार जमा केले. तुकारामाचे पाठांतर कोणाताही संदर्भ विनासायास देण्याइतके चांगले होते. तुकारामात xxx घालून वाचावेत असे अभंग अनेक. ते बाबूलालला अगदी मुखोद्गत. बहुतेक कीर्तनकारांच्या शैलीतच एक चावटपणा असतो. समोरच्या श्रोतृवृंदात कोणी लक्षणीय दिसल्यास, मग त्याची सरस्वती अधिकच पाल्हाळू लागते. हा कीर्तनकारांचा परंपरागत गुण बाबूलालने आपल्या बी.ए. पर्यंतच्या शिक्षणाचा आणि संस्कारांचा मसाला घालून चांगलाच अंगी बाणवला होता. कीर्तन पुराणभागवतातील कथांचे आणि पाचकळपणा आधुनिक पुणेरी कॉलेजातील टवाळखोरीचा असे हे मोठे स्फोटक मिश्रण होते.

 आंबेठाणच्या शेतीच्या अनुभवाने जसजसा पोळत गेलो तसतसे माझे विचार अधिक स्पष्ट होऊ लागले. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधल्या वाचनाचा पुरेपूर उपयोग करून माझ्या अनुभवाला प्रस्थापित अर्थशास्त्राची जोड मिळाली होती. १९७८-७९ मध्ये मोहन धारियांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली; भाव पडले. इतरांबरोबर आम्हीही कलेक्टर साहेबांच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेलो. कार्यालयातल्या साऱ्या खुर्च्या चाकणच्या भारदस्त पुढाऱ्यांनी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अडवलेल्या. सगळ्यांची बोलणी झाल्यावर मला शंकररावांनी आग्रह करून बोलायला लावले. 'माल शेतकऱ्याच्या हाती असताना निर्यातबंदी, माल व्यापाऱ्याकडे गेला म्हणजे निर्यात खुली' या मुद्द्यावर मी बऱ्याच धारेचे बोललो. 'दुष्काळाच्या काळात सक्तीने लेव्ही घेणारे

अंगारमळा । ७५