पान:अंगारमळा (Angarmala).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्यांच्या कोणत्यातरी व्यवसायाच्या निमित्ताने साखर कारखानदारांशी त्यांची घसट झालेली. नाशिकच्या आंदोलनात सर्व काळ शंकरराव माझ्याबरोबर होते. माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील कराड सारे कसलेले जाणकार; पण शंकरराव शाब्दिक चकमकीत कधी कमी पडले नाही. 'ऊसवाले आणि कारखानदार म्हणजे सारे कुऱ्हाडीचे दांडे, गोतास काळ' हे त्यांनी सरळ मांडले. 'साखर कारखानदार म्हणजे एकाहून एक माजलेले पोळ, एकास एक बिलंदर. महाराष्ट्राचे राजकारण खेळणारी इरसाल माणसं', ही शंकररावांची टिप्पणी. आग्रा रोडवरील रास्ता रोकोत सरकारी अधिकारी ट्रक ड्रायव्हरांशी संगनमत करून माझ्या जिवावर उठण्याचा खेळ खेळताहेत हे हेरण्याचा चाक्षाणपणा शंकररावांचाच. मी तुरुंगात उपोषण करत असताना माझ्या बायकोबरोबर रात्री मध्यरात्री गावोगाव फिरून शेतकऱ्यांना 'तुमचा बाप उपास करतो आहे, तुम्ही काय भाकऱ्या मोडत बसलात?' असे बजावणारेही शंकररावच.

 शंकररावांना आदर किंवा धाक वाटेल इतका मोठा माणूस जन्माला आलाच नाही. त्यांनी मोठेपणाचा कधी हव्यास धरला नाही. माझी एका अर्थाने सावली होण्यात समाधान मानले; पण सर्वकाळ डोळे उघडे, मेंदूतील चाके अविरतपणे चालणारी, विरोधातील कोण कसा आंदोलनात आलेला, कोण हौशा, कोण नवशा, कोण गवशा यावर शंकररावांची टिप्पणी मोठी ऐकण्यासारखी असे. माणसांचा त्यांचा अंदाज मोठा अचूक. सभा चालू असताना दौऱ्याच्या काळात त्यांचे काही विचित्रच उद्योग चालत. सभेच्या मागच्या बाजूला उभे राहून एखादे सोईस्कर सावज हेरून त्यांना 'काय येडे झाले का तुम्ही? या बामणाचे ऐकता?' किंवा 'याला काय शेतीतलं समजतं' अशा तऱ्हेने भडकावून देऊन लोकांची प्रतिक्रिया अजमावून पाहण्याचा त्यांचा धंदा. शंकर धोंडगेसुद्धा शंकरराव वाघांच्या या चाळ्यांना बळी पडले आणि माझ्याकडे तक्रार करू लागले, 'तुमच्या अगदी जवळच्या माणसांतदेखील संघटनेविरुद्ध उघड बोलणारी माणसं आहेत.'

 निपाणी आंदोलनाच्या शेवटच्या काळात, भाई धारियांना पोलिसांनी लाठीचा खूप प्रसाद दिला, 'शरद जोशींना यांनीच निपाणीला आणले.' हा त्यांचा राग व्यक्त करीत. भाईंनी ही गोष्ट नंतर सांगितली. मी म्हटले, 'तुम्हाला मी आंदोलनात आणले अशी माझी कल्पना. तुम्ही मला आणले हे माहीत नव्हते.' भाई रहस्यपूर्ण हसले. शंकरराव म्हणाले, 'आम्हाला कोणी आणले नाही आणि आम्हीही कोणाला आणत नाही. आम्ही फक्त नदीच्या काठी टोपली ठेवून बसतो, गळसुद्धा टाकत नाही. मासे आपण होऊनच टोपलीत येऊन पडतात आणि आम्हीच कोळ्याला धरले अशी फुशारकी मारतात !'

अंगारमळा । ६५