पान:अंगारमळा (Angarmala).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

थोडा अनुभव, कीर्तनकार म्हणून थोडे नाव आणि सदा समाजवादी चळवळीच्या जवळ असलेला बाबूलाल परदेशी, त्याने काही वेगळ्याच हेतूने 'वारकरी' नावाचे साप्ताहिक सुरू करण्यासाठी नोंदणी करून ठवेली होती. त्याच नावाशी आंदोलनाचा अकटोविकट बादरायणी संबंध जोडून 'वारकरी' साप्ताहिक सुरू झाले, ९ऑगस्ट १९७९ रोजी. शंकरराव चाकणचे जुने रहिवासी. घर धार्मिकतेकरिता प्रसिद्ध. अगदीच काही अनामिक नाही. काही काळ चाकणचे सरपंच राहिलेले, राष्ट्र सेवा दल आणि डाव्यांच्या चळवळीच्या बांधावर राहून मदत केलेले. शेतीपोटी भरड जमीन. म्हणून दुकानदारी, व्यापार, ट्रक वाहतूक, मुंबई-पुण्याची अडत, इतर काही व्यवसाय अशा खटाटोपी केलेला. काय दैवाच्या गाठी होत्या कुणास ठाऊक ? मी जायचे, तिथे त्यांनी दोघांनीही यायचे असा सुरवातीच्या काळातला नियम.

 बाबूलाल पट्टीचा वक्ता, मोठा बहुश्रुत. माझ्याबरोबर येण्याच्या कष्टांची बाबूलालच्या बाबतीत काही तरी भरपाई होती. शंकररावांच्या बाबतीत तीही नाही. चुकून कधी व्यासपीठावर शंकरराव पाऊल टाकायचे नाहीत. पुष्कळ वर्षांनी कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत त्यांनी बोलायचा प्रयत्न केला; पण माईकचं आणि शंकररावाचं कधी जमलं नाही. खासगी बैठकीत म्हणजे सगळेजण बसलेले असताना जिभेवर अफाट अनुभवाची, परखड मतांची सरस्वती नाचवणारे शंकरराव सभेत अगदी 'मौनीबाबा'.

 माझ्या प्रेमापोटी शंकररव संघटनेत आले.या कामातली माझी तळमळ आणि उत्साह निरर्थक आहे अशी त्यांची मनोमन खात्री असावी; पण 'बाबा काहीतरी धडपतोय ना, मग त्याला साथ द्यावी.' त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर "तुम्ही फक्त 'की' म्हणा आम्ही 'जय' म्हणायला आहोतच." शेतकरी भोळा असतो, गरीब नाडला जात आहे, त्याच्या गुलामीतून सुटण्याकरिता तो नांगर टाकून तलवार हाती घेईल ही माझी सारी खुळचट स्वप्ने आहेत ही शंकरावांची धारणा. अगदी चाकणच्या आंदोलनापासून ते मला बजावीत, "तुम्ही कांद्याच्या भावाविषयी बोलता म्हणून हे लुच्चे येतात; तुरुंगात जायची वेळ आली, की हे कोणी तहान लागली म्हणून, कोणी लघवीसाठी, कोणी कशासाठी असे काढते पाय घेतील." अशी त्यांची खात्री.

 आणि तरीही कोणताही कार्यक्रम निघाला, की सांगितल्या वेळी सांगितल्या जागी शंकरराव हजर. त्यांच्या घरची परिस्थिती बिकट. शंकरराव कर्ता कारभारी माणूस. मुले लहान लहान. त्यांच्या गैरहजेरीत कुटुंबातील लोकांची चांगलीच दैना होत असणार; पण या सगळ्यांचा शंकररावांनी कधी अवाक्षरानेही उल्लेख केला नाही.

अंगारमळा । ६४