पान:अंगारमळा (Angarmala).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ही दुसरी शस्त्रक्रिया ४ एप्रिलला झाली. तीन तारखेलाच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांतून सहकारी कार्यकर्ते रक्तदानासाठी येऊन पोचले. 'गंगा सिंधू सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा' अशा सगळ्या नद्यांचे पाणी एकत्र करून शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण शेतकरी रक्तदानासाठी आले. मागितले असते तर जीवदान देण्यासही ते कचरले नसते. स्वयंसेवक जास्त झाले म्हणून काही जणांचे रक्त घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला. ते स्फुंदून स्फुंदून रडले. शस्त्रक्रियेच्या दिवशी सकाळी पहाटेपासूनच सगळी आप्तमंडळी आणि शेतकरी संघटना परिवार एकत्र झाला. स्ट्रेचर ऑपरेशन थिएटरकडे निघाले. नांदेडच्या करुणा पा. हंगर्गेकर स्वत: शस्त्रक्रियेच्या वेळी भूल देण्यातल्या निष्णात डॉक्टर. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर स्ट्रेचर असताना 'सगळं काही ठीक आहे' असं त्यांनी सांगितले. त्यांची भाची डॉ. अनिता हिनेही हाताने बाय बाय केले. त्यानंतरचे काहीच स्पष्ट आठवत नाही.

 भूल दिल्याने सर्व शुद्ध जाते, काहीच जाणीव होत नाही असे मी ऐकले होते. प्रत्यक्षात तसे काही होत नव्हते. शरीरातील सर्व संवेदना बधिर झाल्या आहेत याची जाणीव होत होती. मध्येच कोणीतरी लाकडाच्या गिरणीत कापण्यासाठी फिरते चाक वापरतात तसे चाक बरगडीच्या मध्यभागी हाडावरून चालवते आहे याची जाणीव झाली; दुखले मात्र काहीच नाही. मग, माझी स्वत:चीच डावी बरगडी उचलून कोपऱ्यात ठेवली आहे असे दिसले आणि मग सगळेच चिडीचूप झाले. मध्ये बराच काळ गेला असावा. थोडी थोडी आसपासच्या हालचालीची जाणीव होत होती. हालचाल शक्यच नव्हती, कारण शरीरातून अनेक नळ्या बाहेर काढल्या होत्या. तोंडात एक भलीमोठी प्लॅस्टिक नळी कोंबली होती. त्यामुळे बोलणे अशक्य होते.

 ग्लानीने पुन्हा डोळे मिटले आणि अगदी स्पष्ट जाणीव झाली, की आपण आता या लोकातले राहिलो नाही आणि आपल्याच अंत्ययात्रेची तयारी चालू आहे. डाव्या, उजव्या हातापाशी, उशापाशी स्वच्छ घडीची कापडं आणून लावत होते. समोरून अंत्यदर्शनाला आलेल्या लोकांची रीघ लागलेली होती. संपूर्ण काळा वेश परिधान केलेला एक पाद्री काही मंत्र म्हणत होता. माझ्या कानाशी कोणीतरी पुटपुटलेही Ultime sanction झाली - ख्रिश्चन धर्मातील, तोंडात गंगाजल टाकण्यासारखा विधी. कितीतरी वेळ गेला. भेट देणाऱ्यांची रीघ होती. 'आता निघायचंय' असंही कानावर आलं; पण शव कोणी उचलेना. मग जाणीव झाली, आपण मेलो खरे; पण खरे मेलो नाही. अजून हाताला आतमध्ये कोठेतरी संवेदना जाणवते आहे. हे असेच विद्युतदाहिनीत सरकवणार की काय? त्याआधी

अंगारमळा । ४१