पान:अंगारमळा (Angarmala).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फार मोठा नेता आहे' वगैरे 'भलावण' केली; पण बस कंपनीला त्याचे काहीच कौतुक दिसले नाही. भल्या पहाटे टोळभैरवांकडून तिकीट घ्यायला मोठ्या ताठर मानेने नकार दिला होता. आता अशा एका टोळभैरवाला शोधून काढावे लागले. वरकड पैसे घेऊन सिटांच्या मधल्या जागेवर बसू देण्याचे त्याने मोठ्या औदार्याने कबूल केले. एकूण चौदा तासांचा, घाटांनी भरलेला प्रवास... नजीकच्या भविष्यकाळात तरी त्याची आठवण विसरायला होणे नाही.

 पुण्याला परत फिरण्याचा निरोप मला बडोद्याला मिळाला तो जवळजवळ दहा तासांच्या पाठलागानंतर. मी चाकणहून निघाल्यानंतर दोनएक तासांनी माईची प्रकृती खालावल्याची आणि रक्ताच्या उलट्या सुरू झाल्याची बातमी आंबेठाणला पोचली. तोपर्यंत मी मुंबईची निम्मी वाट चालून गेलो होतो. नितीन प्रधान यांच्यामार्फत दादर प्लॅटफॉर्मवर निरोप द्यायला कुणी माणूस गेला होता; पण त्याला मी दिसलो नाही. सुरतला बिपिनभाई देसाईंच्या घरी निरोप ठेवला होता; पण कर्णावती पकडून बडोद्याला जायच्या बदलामुळे सुरतलाही हा निरोप मिळाला नाही. शेवटी बिपिनभाईंनी बडोद्यातल्या त्यांच्याच मित्राला फोन करून निरोप पोचवला. अगदी सुरतला जरी निरोप असता, तर निदान तीनशे कि.मी.ची कष्टयात्रा कमी झाली असती. पुण्याला पोचायला साडेदहा वाजले. अंघोळबिंघोळ करून तातडीने इस्पितळात पोचलो. आता वातावरण अगदीच वेगळे होते. माईला वरून सलाईन लावले होते, नाकामध्ये अन्न देण्याकरिता नळी खुपसली होती. मी आल्यावर काही तरी बोलण्याचा तिने प्रयत्न केला; पण नाकातील नळीमुळे तिची वाक्यं सराईतांच्यासुद्धा ध्यानात येत नव्हती. नाकात नळी खुपसलेली असल्यामुळे बोलणे आणखीच अस्पष्ट झाले होते. संध्याकाळच्या सुमारास डॉक्टरांनी निरोप पाठवला की, पुन्हा एकदा रक्त देणे आवश्यक आहे. पूर्वी ज्यांची नोंदणी केली होती ते रक्तदाते, दिवस महाशिवरात्रीचा असल्यामुळे पुण्यात भेटेनात; मग श्रेयाची एक मैत्रीण आणि शेजारच्या खोलीतल्या रुग्णांचे चिरंजीव अशा दोघांना घेऊन प्रयोगशाळेत गेलो. रक्त तपासणीकरिता दिले. रक्त जुळले तर पुन्हा वेळेचा अपव्यय नको म्हणून दोघांचेही रक्त काढून ठेवले. कोणत्याही परिस्थितीत ब्लड बँकेतले रक्त घ्यायचे नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तपासण्या होईपर्यंत आणखी चार तास तरी जाणे भाग होते. रात्री एक वाजता प्रयोगशाळेला फोन केला. त्यांना रक्त जुळत असल्याची शुभवार्ता सांगितली. इस्पितळात रात्री दोन वाजता डॉक्टरांनी रक्त देण्यासाठी शीर शोधायला सुरुवात केली. माई आता इतकी अशक्त झाली होती, की अक्षरश: डझनवारी ठिकाणी सुया खूपसूनसुद्धा

अंगारमळा । ३२