पान:अंगारमळा (Angarmala).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माझ्यासारख्या माणसाला चिंता पडली आहे, की साहित्यसृष्टीचे ईश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर असे तुम्ही साहित्यिक, तेच ते शब्द पुन्हा पुन्हा घोळत आहात; नवीन शब्द येत नाहीत; नवीन अनुभूती नाही. कारण आमचं सगळ्यांचं आयुष्य दरिद्री झालं आहे. अमेरिकत एखादं पुस्तक प्रकाशित करायचं ठरलं तर प्रकाशक पहिली आवृत्ती म्हणून किमान दहा लाखाची काढावी असं म्हणतो. मराठीमध्ये एखादं पुस्तक प्रकाशित करायचं म्हटलं तर प्रकाशक म्हणतो, "तीन हजाराची आवृत्ती काढायचं म्हणजे जरा धाडसाचंच होईल; दीड हजारातच जमलं तर बघा!" म्हणजे, मराठीत पुस्तक लिहिलं तर ते जास्तीत जास्त दीड हजार लोकांपर्यंत जाईल अशी अपेक्षा ठेवायची. छापल्या छापल्या त्यातली सहाशेच पुस्तकं खपतील, नऊशे कदाचित कपाटातच पडून राहतील. गेलेल्या सहाशेतील शंभरएक पारितोषिकं देणाऱ्या संस्थांना देणगीदाखल गेलेली असतील. अशानं मी जे लिहिलं असेल त्याचं काय व्हायचं? आणि मराठी भाषेचं काय व्हायचं?

 मुळात, गरिबीचा प्रश्न सुटला पाहिजे. जर का गरिबीचा प्रश्न सुटला नाही, आयुष्यं संपन्न झाली नाहीत तर काय होणार आहे? गरिबी असताना आम्ही गरिबीचं विदारक दृश्य दाखविण्याच्या कामात अपयशी झालो आहोत. संपन्नतेचा अनुभव नसल्यामुळे आमचे 'डोळे'च थिटे पडले आहेत. असे असताना तुम्ही कितीही प्रयत्न केलेत, कितीही अभ्यासक्रम बदललेत, कितीही पारितोषिके दिली आणि कितीही 'ग्रंथाली'सारख्या चळवळी चालवल्या तरी त्यांचा काय उपयोग? तुमची पुस्तकं खपायची असतील तर त्यांचा केवळ प्रचार करून भागत नाही. मीतर गरीब माणूस आहे. तरीही प्रयत्नपूर्वक मी साधारणपणे वर्षाला पाचदहा हजार रुपये पुस्तकांकरिता आणि मासिकांकरिता खर्च करतो. तुम्ही ग्रामीण साहित्य लिहिलं, 'ग्रंथाली'सारखी चळवळ चालवली; पण ज्या शेतकऱ्याला समोर ठेवून तुम्ही लिहीत आहात त्याचा कापूस खरेदी केंद्रावर विकला जात नाही, विकला गेला तर चेक मिळत नाही, चेक मिळाला तर तो वटून पैसे मिळत नाहीत अशी जर स्थिती असेल तर तुमचे ग्रामीण साहित्य वाचायचे कुणी? यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे.

 आजकाल मान्यवर साहित्यिक होणं सोपी गोष्ट आहे. राजदरबारी दाखल झालं, की पुरतं. त्यांची मग वेगळी जीवनशैली असते. संध्याकाळच्या मैफली होतात, त्यांमध्ये काही वेगळ्या प्रकारचा 'कैफ' चढू शकतो आणि तो 'कैफ' हाच मुळी 'प्रतिभेचा कैफ' आहे अशीही समजूत होऊ शकते.

 या पलीकडे जाऊन आपल्या साहित्याशी इमान राखणारे साहित्यिक मराठीत आहेत

अंगारमळा । १४३