पान:अंगारमळा (Angarmala).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतो? कोठे आहे? काय होतो? काय आहे? असा षडाक्षरी मंत्र सारखा जपत होतो. भजनाने तरी काही बरे वाटले तर बघत होतो. खरे म्हणजे गावातले भजन नेहमी 'केशवा माधवा'नेच चालू व्हायचे; पण या निरक्षर अडाण्यांनी मी त्यांच्या चेहऱ्यावर वाचले नव्हते इतके भाव माझ्या चेहऱ्यावर वाचले होते. भजनाची सुरुवात झाली,

 हरिश्चंद्र राजा, तारामती राणी
 डोंबाघरी भरी पाणी, डोंबाघरी पाणी..

 मृदुंग झांजांचा कल्लोळ आणि गाणाऱ्यांची सामूहिक बेसूरता ओलांडून अर्थ असा भिडला, की गळ्यातला आवंढा गिळेना.


 आणीबाणीचा काळ अजून चालू होता. भूमिहीनांना दोनअडीच एकर जमिनीची वाटणी चालली होती. माझ्या जमिनीच्या पश्चिमेला दहाबारा घरांना मिळालेल्या जमिनी पडून राहिल्या होत्या. महाळुंग्याच्या शिवळे पाटलांच्या जमिनी कित्येक आदिवासींना मिळालेल्या, रिकाम्याच पडल्या होत्या. हे प्रकरण मला काही समजेना. खरे म्हणजे जमीन मिळाल्यानंतर नवभूधारकांनी उत्साहाने जमीन कसायला लागले पाहिजे होते. जमिनीचे फेरवाटप झाले, जमीन नसणाऱ्यांना जमिनी मिळाल्या म्हणजे ग्रामीण दारिद्राचा प्रश्न सुटतो असे आम्ही कित्येक वर्षे ऐकत, घोकत होतो आणि या जमिनी हाती आलेल्यांना त्याचे काहीच कौतुक नव्हते.

 कुणी म्हणाले, जमीन मिळाली तरी औते पाहिजेत, बैल पाहिजेत, बियाणे पाहिजे, खतं पाहिजेत, नुसती जमीन घेऊन काय करता? अकलूजला का कुठे कुणी पुढाऱ्यांनी नवा प्रयोग केला. नवभूधारकांना त्यांच्या जमिनी नांगरून, पेरून द्यायच्या. मी मनात विचार केला, पाचपंचवीस नवभूधारक एकत्र झाले, थोडीफार पैशाची सोय झाली, तर सामूहिक शेती जमणार नाही का? खेडच्या प्रांत अधिकाऱ्यांनी दावडीच्या नवभूधारकांची गाठ घालून दिली. अडचण कोणतीच नव्हती, जुना मालक थोडा कटकट्या होता; पण कायद्याने त्याचे काहीच चालण्यासारखे नव्हते. मामलेदारांनी स्वत: येऊन जमिनीच्या सीमा काढून दिल्या. एकूण अकरा भूमिहीनांना सलग जागी जमीन मिळाली होती. अकरा घरच्यांची बैठक बोलावली. निम्मेअधिक चावडीवर आले. सगळ्यांनी सामूहिक शेती करायची. सगळ्यांची जमीन सामूहिक मानायची. माझा हा तुकडा असे म्हणायचा कोणालाच अधिकार राहणार नाही. नाही तर विहिरीची जागा ज्याच्या जमिनीवर लागेल, तो विहीर खणून झाल्यावर म्हणायला लागायचा- मला नाही तुमच्या सामूहिक शेतीत

अंगारमळा । १२