पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचाराबद्दल एक समजूतदारपणा आहे. या वखारीचा कुणी एक प्रमाणग्रंथ नाही, कुणी एक प्रेषित नाही. हा एक प्रवाह आहे - सतत बदलणारा आणि सर्व सामावून घेणारा.

 इतर वखारींचे तसे नाही. तिथले नियम फार कडक. हा एक ग्रंथ, त्यात हजार दोन हजार वर्षांपूर्वी जे लिहिले असेल तेच काय ते सत्य; अमक्या महात्म्याने, प्रेषिताने जे काय सांगितले असेल तेच सत्य. या धर्मांनी अशी असहिष्णुता शिकविली आहे असे नाही; पण व्यवहारात परिस्थितीनुरूप अशी असहिष्णुता इतर वखारीत बोकाळली आहे.

 बौद्ध म्हणा, मुसलमान म्हणा हिंदूना डिवचण्याचा, खिजवण्याचा प्रयत्न करतात हे कदाचित संकुचित आणि मर्यादित धर्म-संकल्पनेशी सुसंगतही असेल; पण स्वतःला हिंदू म्हणविणारा समाजही इतरांना चिडविण्याचे, डिवचण्याचे काम सतत करतच असतो. किंबहुना, अशा डिवचण्यासाठी त्याला काही करावेच लागत नाही.

 बौद्ध म्हणा, मुसलमान म्हणा एक दलित तर दुसरा दलितातील दलित. आर्थिक, सामाजिक, राजकीय - सर्वच क्षेत्रांत मागे पडलेले. आसपासच्या बहुसंख्य समाजाविषयी त्यांच्या मनात रोष आहेच. तो रोष दाखवण्याला त्यांच्याकडे साधने काय? शाळेतल्या पोरांना एखाद्या बलदंडाचा जाच होतो, त्याला उपाय काहीच करता येत नाही. मग ती पोरं चिडवाचिडवीचा प्रकार सुरू करतात. जातिव्यवस्थेवर आधारलेली आपली समाजरचना हा एक सततचा जाच आहे. बौद्धांनाही आहे, मुसलमानांनाही आहे आणि हिंदू समाजातील बहुसंख्य लोकांनाही आहे. ज्याला बलुतेदारी आणि हुन्नर बुडून गेली आहे, ज्याची नोकरी मिळण्याची काही आशा नाही अशा कुणालाही ही समाजव्यवस्था जाचाचीच वाटणार.

 मग, या जाचाबद्दल त्यांनी ओरडायचे कसे? हे दुःख व्यक्त करण्याकरिता बौद्ध आणि मुसलमान झेंड्याचा उपयोग मोठा सोयीस्कर असतो.

 पण, म्हणून हिंदू वखारीने आपला बहुमूल्य पंचप्राण सहिष्णुताच सोडून दिली तर त्या वखारीत वाखाणण्यासारखे काहीच राहणार नाही. हिंदुत्वाचा झेंडा विवेकानंदांनी फडकवला, सावरकरांनीही पुढे नेला. हिंदू धर्मातल्या चांगल्या गोष्टींना उजाळा देत आणि वाईट गोष्टी दूर करीत त्यांनी हे काम केले. हिंदुत्वाचे आधुनिक पुरस्कर्ते हिंदू समाजातही इतर समाजातील असहिष्णुता आणि संकुचितपणा वाणवण्यात धन्यता मानत आहेत. मला चिंता आहे ती ही की,

भारतासाठी । २५