पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंदू सहिष्णुता संपली तर पुन्हा सहिष्णुता उत्पन्न करायची कोठून? समुद्राने खरटपणा सोडला तर मीठ आणायचे कोठून?

 हिंदू वखारीची श्रेष्ठता ही काही उखाळ्यापाखाळ्यांत वरचढ ठरून होणार नाही; दंगे, मारामाऱ्या करूनही हे साध्य होणार नाही. सगळ्या मशिदी पाडल्या आणि त्या जागी देवळे बांधली तरी हे सिद्ध होणार नाही. हिंदू समाजाने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःच्याच रणभूमीवर राहिले पाहिजे; इतर संकुचित चिखलदऱ्यांत उतरता कामा नये. ज्या दिवशी सहिष्णुतेचे उपासक असहिष्णु बनतील आणि विटेला वीट, दगडाला दगड असे उत्तर देऊ लागतील त्या दिवशी सहिष्णुतेचा पराभव स्वयंसिद्धच असेल. हिंदुत्ववादी जिंकतील; पण हिंदुत्वाचा पराभव झाला असेल. हिंदू शब्दाबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान असेल, त्या धर्माचे रक्षण करावे अशी तळमळ असेल त्यांनी काम केले पाहिजे; गुंड पुंड मौलागिरी नाही. आपली समाजव्यवस्था ही श्रेष्ठ आहे, कार्यक्षम आहे असे दाखवून दिले पाहिजे. या व्यवस्थेत कुणी एक दुसऱ्याच्या कष्टावर जगत नाही, येथे अबलांवर अत्याचार होत नाही, माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी आहे अशी व्यवस्था झाली तर तिचा पराभव कोण करू शकेल?

 आपल्या मनातील खरी कळकळ काय आहे? हिंदुत्वाच्या नालायक वारसदारांना मोठे सिद्ध करणे ही आहे की हिंदुत्वाचा आत्मा जोपासणे ही आहे? या प्रश्नाचे जे उत्तर त्याप्रमाणे तुमचा मार्ग ठरेल.

 तुमच्या प्रश्नाला उत्तर कदाचित मिळालेले नाही असे तुम्हाला वाटले तर पुन्हा एकदा हे वाचून पाहा. हिंदुत्वाच्या आत्म्याच्या तुम्ही जवळ असाल, कुडीच्या नाही, तर तुम्हाला शेतकरी संघटनेची भूमिका पटल्याशिवाय राहाणार नाही.

(६ जून १९९१)

♦♦

भारतासाठी । २६