निर्माणपर्व/२८ नोव्हेंबर

विकिस्रोत कडून

 २८ नोव्हेंबर






 शेतकरी हा हिंदुस्थानच्या प्रगतीचा कणा आहे, हे केंद्रसत्य म. फुले यांनी स्वच्छपणे ओळखलेले होते.
हा कणा सर्वत्र मोडून पडलेला ते पहात होते.

 टिळकही ही वस्तुस्थिती समजावून घेत होते. लहान, स्वतंत्र शेतकऱ्याचा मृत्यु त्यांना स्पष्ट दिसत होता. पुणे जिल्ह्यातच, टिळक तरुण असताना, शेतकन्यांचे एक बंड उसळलेले होते. दुष्काळात टिळक महाराष्ट्रभर फिरले. शेतकन्यात त्यांनी जागृतो उत्पन्न केली. त्या वेळीही त्यांना या केंद्रसत्याची महती चांगलीच प्रत्ययास आलेली होती.

 फुले आणि टिळक या दोघांनी शेतकरी खंगत-मरत असलेल्या डोळ्यांनी पाहिला. या संहाराची मीमांसा मात्र वेगवेगळी केली. फुल्यांनी भटशाहीला मुख्यतः जबाबदार धरले. टिळकांनी सर्वांनाच गुलाम करून टाकणाचा परकीय इंग्रज सत्तेला दोष दिला.

 गावोगावचा भट-सावकार उखडला व त्याचेजागी एखादा कर्तव्यदक्ष निःपक्षपाती गोरा अधिकारी आणून ठेवला की, शेतकऱ्यांची दुर्दशा संपेल, असा फुल्यांचा विश्वास होता. त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या चळवळीचा मांड मांडला. संस्था वगैरे काढून भटशाहीविरोधाचे मोठेच रान महाराष्ट्रात पेटवून दिले.

 टिळकांनी हेच नेमके इंग्रजांबाबत केले. कारण शेतकरी वर्गाचा व एकूणच हिंदी जनतेचा, क्रमांक एकचा शत्रू इंग्रज आहे, देशी भट-भिक्षुक किंवा शेठसावकार नव्हे, असे त्यांचे मत होते.

 सोने काठीला बांधून आता कुणीही हिंदुस्थानभर प्रवास करावा, वाटेत चोर-दरोडेखोर-पेंढाऱ्यांचे भय नाही. रेल्वे आली, तारायंत्रे-पोस्टांचे जाळे विणले गेले, शाळा निघाल्या, सुधारणांचे युग अवतरले, कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले असे म्हणन ब्रिटिशांचे स्वागत करणाऱ्या मवाळांच्या भूमिकेशी फुल्यांची भूमिका मिळतीजुळती राहिली. 

काही प्रसंगी तर ती मवाळांपेक्षाही अधिक ब्रिटिशधाजिणी ठरली. हाच आगरकर-फुल्यांमधीलही एक मतभेदाचा मुद्दा होता. उलट, 'अहो ! काठीला बांधायला सोने शिल्लक राहिलेच आहे कुठे मुळी ! साहेब सगळेच सोने विलायतेत घेऊन चालला आहे' - असा प्रतिपक्ष मांडून टिळकांनी आपला वेगळा आखाडा काढला.

 एकमेकांविषयी आदर असला तरी टिळक, फुले यांचे जमणे शक्यच नव्हते. कारण दृष्टिकोनात मूलभूतच फरक होता. टिळकांचा शत्रू हा अनेकदा फुल्यांचा मित्र ठरत होता. फुल्यांच्या शत्रुस्थानी असलेल्या वर्गाचे हितसंबंध टिळकांकडून वरचेवर जपले जात होते. तरीही एक गोष्ट जाणवते, टिळकांनी मवाळांना जसे ठोकले, सुधारकांवर टिळक जसे घसरले तसे फुल्यांवर घसरलेले दिसत नाहीत.

 आज असे म्हणायला हरकत नाही की, दोघेही कमीजास्त प्रमाणात चुकतच होते.

 टिळक साठ टक्के बरोबर ठरले. बैलाचा आणि हत्तीचा पाय हिंदी जनतेच्या उरावर होता, असे मानले, तर हत्तीचा पाय प्रथम काढू म्हणणाराच अधिक बरोबर ठरला, यात आश्चर्य काही नाही. टिळकांची चळवळ मनूच्या माशाप्रमाणे वाढत गेली. सुराज्यापेक्षा स्वराज्याची ओढ जनसामान्यांना, तेल्यातांबोळ्यांना अधिक वाटली, हे पुढील इतिहासानेच दाखवून दिले आहे.

 फुले चाळीस टक्के बरोबर होते. रयतेवर उच्चवर्णियांचा, भटसंस्कृतीचा शेठ–सावकारांचा बोजा आहे; परकीय इंग्रज सत्ता हा येथील जनतेच्या छाताडावरचा मोठा हत्तीचा पाय असला तरी दुसरा स्वदेशी शोषकांचा बैलाचा पाय दृष्टिआड करून चालणार नाही, या पायाच्या दाबातूनही रयतेला मोकळे करणे अवश्य आहे; मोठ्या लढाईच्या अंतर्गत ही छोटी लाढाईही खेळण्याची तयारी ठेवली पाहिजे, निदान तिला विरोधी भूमिका घेऊन तरी चालणार नाही, ही एक स्वच्छ जाणीव टिळकांनी मोकळेपणे व्यक्त केलेली दिसत नाही. ही त्यांची चूक होती. त्यांच्या प्रतिपादनातील एक मोठीच उणीव होती.

 दोघांच्याही या कमीजास्त चुका, दृष्टिकोनातील फरक, परिस्थितीमुळे, पूर्वसंस्कारांमुळे, आपल्याकडील जातीय तटबंदीमळे पडलेला असावा. कारण काळ जसजसा पुढे सरकला, तसतसा, उभयतांच्या भूमिकेत इष्ट तो बदल घडत गेलेला दिसतो. देवाने सांगितले तरी अस्पृश्यता मानणार नाही असे टिळक शेवटी शेवटी म्हणू लागले होते. मजूरवर्गाच्या उदयाकडेही ते आशेने पाहात होते. फुल्यांच्या चळवळीत ब्राह्मण मंडळींचा प्रवेश होऊ लागला होता.





 हे दोन विरोधी प्रवाह गांधींच्या कालात पुढे बरेचसे एकत्र आले.आंबेडकरांनी आपले वेगळेपण जपले, पण ब्रिटिश आपला मित्र नाही, हेही ओळखले. म्हणूनच एकीकडे त्यांनी बौद्धधर्मही स्वीकारला आणि दुसरीकडे भारतीय घटनेचे शिल्पही तयार केले.


 हाच सुमार. टिळक-फुल्यांचा उदयकाल. देश रशिया. १८९२ च्या प्रारंभी रशियातील एका प्रांतात ( समारा ) दुष्काळ पडला. रशियन शेतकरी असाच देशोधडीला लागत होता. लेनिनचाही हा उदयकालच होता. मार्क्सवादी अमृत प्राशन करून लेनिन ताजातवाना झालेला होता. तो या दुष्काळाची मीमांसा सांगू लागला --

  'या दुष्काळाला एक विशिष्ट समाजरचना जबाबदार आहे. जोपर्यंत ही समाजरचना कायम आहे, तोपर्यंत दुष्काळ पडणारच. आपण जर का ही समाजरचना नष्ट केली, तरच आपण हे दुष्काळाचे संकट कायमचे नाहीसे करू शकू. प्रचलित समाजरचना उधळून लावण्याच्या दृष्टीने दुष्काळाची मदतच होत आहे. कारण दुष्काळामुळे शेतकरी समाज खेडेगावातून उठून शहरांकडे निघाला आहे. आता शेतीप्रधान अर्थव्यवस्था कोसळणार आहे. शहरात गेल्यावर शेतकरी औद्योगिक कामगार होणार आहे. मग तेथे या वर्गाला भांडवलशाही रचनेचं खरं स्वरूप अनुभवावं लागेल. या अनुभवामुळे हा कामगारवर्ग एकदा जागृत झाला की, तो झारच्या जुलमी सत्तेला आव्हान देऊ लागणार आहे. हे सारं जितक्या त्वरेने घडून येईल तितका क्रांतीचा उषःकाल जवळ आलाच याची खात्री बाळगा.'

 वास्तविक दुष्काळाचा आणि भांडवलशाहीचा तसा काही अर्थाअर्थी संबंध नव्हता. भांडवलशाही देशातून दुष्काळाने केव्हाच पळ काढलेला होता व समाजवादी क्रांती होऊन दहा-वीस वर्षे उलटून गेली तरी रशिया-चीन या देशात दुष्काळ अधूनमधून डोके वर काढीतच होता. भांडवलशाहीमुळे शेतकरी विस्थापित होतो, पण हे नवे तंत्र योजनापूर्वक त्याने आत्मसात केले, तर लेनिनची भविष्यवाणी खोटीही ठरू शकते. चीनमध्येच ती एका अर्थाने खोटी ठरली. माओने रशियाप्रमाणे सरसकट शेतीचे सामुदायिकीकरण न करताच चिनी शेतकऱ्याला गर्तेतून वर काढले. आपल्याकडे गांधीही हेच करू मागत होते. फक्त चरखा हा ट्रॅक्टर बॉयलरशी सामना करायला फार दुबळा ठरला. पण आज फूले-टिळक, लेनिन यांच्यापेक्षाही आपल्या शेतकऱ्याला माओ-गांधीची धोरणे व कार्यक्रम अधिक मार्गदर्शक व उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. दुष्काळ हा नैमित्तिक आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील असमतोलाचा तो परिणाम आहे. असे असमतोलाचे अधूनमधून उद्भवणारे प्रसंग सहजासहजी निभवून नेण्याइतपत

सर्वसाधारण शेतकरी सुदृढ असायला हवा. ब्रिटिश येण्यापूर्वी शेतकऱ्याजवळ असलेले जोडधंदे त्याला ही सुदृढता प्राप्त करून देत होते. या आधारामुळे दुष्काळ किंवा इतर प्रासंगिक आपत्ती आल्याच तर एकदम तो रस्त्यावर फेकला जाण्यापासून वाचू शकत असे. जोडधंदे हा एकप्रकारे त्याचा आयुर्विमा ( Insurance ) होता, पूरक अन्न होते. ब्रिटिशांनी हे जोडधंदे शेतकऱ्याकडून काढून घेतले. हेतुपुरस्पर, आपल्या साम्राज्यविस्तारासाठी, या जोडधंद्यांचे खच्चीकरण केले. हे सत्य टिळकांपेक्षाही अधिक स्पष्टपणे गांधींनी ओळखले - त्यावर खादी ग्रामोद्योगाची मात्रा सुचवली. ही मात्रा आज जशीच्या तशी उगाळून अर्थातच चालणार नाही. काळ पुष्कळ पुढे सरकला आहे. घड्याळाचे काटे मागे फिरवता येत नाहीत. परंतु १८८०-९० साली दुष्काळावर ब्रिटिशांनी, त्यांना सोयीस्कर असे शोधून काढलेले इलाज, आज, आपण काहीही सुधारणा, बदल, न करता, जसेच्या तसे अंमलात आणतच आहोत ना ? या तात्पुरत्या इलाजांनी, आपला, दुष्काळामुळे आज रस्त्यावर आलेला, उद्या, लोकसंख्येच्या दबावामुळे पुन्हा गावाबाहेर फेकला जाणारा शेतकरी वाचणे शक्य नाही. स्वदेशीचा नवा काहीतरी अर्थ लावून ग्रामोद्योगांना चालना देणे, शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर स्थिर करणे, हाच या ऱ्हासावरील कायमचा उपाय आहे. फार थोडी जमीन असलेला जपान जे करू शकला, पन्नास वर्षापूर्वी झाडाच्या साली खाऊन दुष्काळाला तोंड देणारा चीन, वाढती लोकसंख्या असतानाही जे साधू शकला, ते आपल्यालाही साधणे अशक्य नाही. लोकशाही समाजवादाची चालू चौकट जरी नीट राबवली तरी हे जमू शकेल. अधिक क्रांतिकारक व तरुण शक्ती पुढे सरसावल्या तर चीन-जपानलाही आपण मागे टाकू शकू. का नाही ?

डिसेंबर १९७२