तिच्या डायरीची पाने/गीताईचे भागवत

विकिस्रोत कडून


गीताईचे भागवत....


 "मी मायच्या पोटात होते तवा अण्णांच्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, घरी भागवत बसवलं होतं. मी पाचवी लेक. पोरगं झालं तर भागवत नाव ठिवनार होते. पन समाप्तीच्या दिवशीच मायनं घाई केली नि मी झाले. पुन्हा पोरगीच! पन पोथी वाचणारा बामण बरा असावा. त्याने समजून घातली म्हणे, की पांच लेकीचं कन्यादान केलं की स्वर्गातली सीट पक्की होते. देवांनीच पाचवी लेक धाडलीय. गीता नाव ठेवा असंही सांगितलं. म्हणून हे असं सुंदर नाव मिळालं. पन म्हणतात नां? नाव सोनाबाई आन् हाती कथलाचा वाळा नाही. नांव गीता पन अख्खा जन्म रडगाणी गान्यात चाललाया." गीता बोलायला लागली की किती बोलू नि किती नको असे होऊन जाई. लहानपणापासून बोल वर नेमीच अळीमिळी गुपचिळी' चा कायदा होता. एकतर ही पाचवी. त्यातून रीतीरिवाजाच्या घडीबंद घरातली लेक. वडिलांना पंधरा एकर रान होतं. दोन विहिरी होत्या. पण पदरातल्या पाच पोरींचा उताडा घराबाहेर काढायचा ही काय चुटकी वाजवण्यासारखी सोपी बाब होती?
 "भाभी, आजकाल चपराशाची नोकरी मिळवायची तरी तीस-तीस हजार मोजावे लागतात. नोकरीवाला नवरा शोधायचा तर लाखाची तयारी हवी. ती कशी आमच्या अण्णांना पेलणार? मोठे दाजी आक्कीपरीस चौदा वरसांनी वडील आहेत. त्याची पहिली बायकू तिसऱ्या बाळंतपणात खर्चली. तिच्यावर आक्कीला दिली. रुपया नि नारळावर लग्न लागलं. दाजींचा बारदाना मोठा. पन्नास एकरात तर नुसती बागायत. आक्की पहिलीची तीन नि स्वतःची चार अशा सात लेकरांना वाढवतेय. तिसरी माया. लईच देखणी होती. म्हणून शेजारगावच्या हायस्कुलातील चपराशाने मागून केली. आक्कीनंतरची शांतू. लई कामसू नि
गरीब होती. तिला कुंबेफळात दिली होती. नवरा टेलर काम करायचा. अण्णांनी दोन एकराचा तुकडा इकून लगीन करून दिलं. वरीसभर सुद्धा नांदली नाही. पंचमीला पहिल्यांदा माहेरपणाला आली तेव्हा खूप घुसमटल्यागत वाटली. डोळं नेहमीच भरून वाहात. आमच्या धाकटया काकीने खोदून-खोदून विचारलं. पन तिनं काहीच थांगपता लागू दिला न्हाई. आणि नवरात्रीच्या तिसऱ्या माळंलाच तिच्या गावाकडून निरोप आला की सकाळी पानी भरतांना हिरीत पाय घसरून पडली नि तिथंच म्येली. अण्णा नि आई फकस्त मातीला पोचले. माय एक दिवस आक्कीला सांगत होती की, तोंडावर, हातावर ओचकाऱ्याचे वरखडे होते. माज्याहून मोठी रंजा. तिचा नवरा मुंबईत फरशी बसवण्याचे काम करतो. चार महिन्याला फेरी मारतो. रंजा सासू सासऱ्यांना सांबाळते. तीन एकराचा मळा आहे. भरपूर काम करते. मजेत राहाते.
 माज्या नवऱ्याने पहिली बायको टाकून दिली. का तर लेकरू होत नाही म्हणून! रंजा आणि शांतूच्या लग्नाच्या खर्चात अण्णा बुडालेले होते. माज्यासाठी त्यांनी फारशी जिकीर न करता दोन पैसे देणाऱ्याच्या गळ्यात मला बांधून टाकले. माज्या नवऱ्याचा व्याजाने पैसे देण्याचा धंदा आहे. पैसा भरपूर. शिवाय पिढीजात पाटिलकी. त्याला कुठल्या की वैदूनं सांगितलं नुकतीच वयात आलेली पोरगी कर. औषध देतो, सहा महिन्यात गरवार राहील. लगीन झालं. वरीस झालं तरी माझी पाळी येत राहिली. नि मग माझ्या छळाला पारावार राहिला नाही. नहाणं येऊन तीनच महिने झाले होते. तोच लगीन झालं. नवऱ्याचा लई त्रास व्हायचा. पन जाणार कुठे? बापानं मोजून चार हजार घेतले होते. रडत पडत दोन वर्ष त्याच्या घरात राहिले.
 ताई, शिणेमात सुद्धा असला त्रास दाखवला नसेल असा छळ तो करायचा. डोक्यावर दगडाचं जातं ठेवून तासन्तास उभं करायचा. शिवाय दोन्ही हातात दगड. जातं तर पडलं नाही पाहिजे. पैशाच्या जोरावर त्याला तिसरी बायको आणायची होती. मी माहेरी पळून तरी जावे नाहीतर मरून तरी जावे अशी त्याची इच्छा. तो अडानी नव्हता. बायकोच्या डोक्यात दगड घालायची वा रॉकेल ओतून काडी लावायची बी हिंमत नव्हती. म्हणूनच फार-फार त्रास द्यायचा. भर उन्हात बिनचपलांची उभी करायचा. शेतात नेऊन सारे चाळे
चालत. शेवटी सोसवेना म्हणून एक दिवस पळून बापाच्या घरी आले. आईला माराचे वण दावले. तिलाच कळवळा आला. माहेरी तीन वरीस होते. त्या काळातच वाप्पा भेटले. शेतकरी संघटनेचं काम करायचे. बायांच्या मिटिंगा घेत. मी पण तिथे जाई. माझ्या बंद डोक्याचं मशीन पुन्हा चालू झालं. सहावी पसवर वर्गात नेहमी पहिली येत होते. ते दिवस पुन्हा जागे झाले. मिटिंगमध्ये मी पण बोलायची. बाप्पा नि सारेच भाऊ माझं कवतुक करीत. अण्णाला हे आवडत नसे. पण माझ्या पाठच्या भावाने कधी हरकत घेतली नाही. पुण्याला एकदा संघटनेचं बायांचं शिबीर होतं. मला जायचं होत. पण अण्णांची परवानगी नव्हती. आईच्याकडून पैसे घेऊन मी शिबिराला इतर बायांबरोबर गेले. घरी आल्यावर अण्णांनी घरात घ्यायलाच नकार दिला. बाप्पा माझ्या आजोबांसारखे. गेली चाळीस वर्ष कम्युनिस्ट पक्षात काम करणारे. पण त्यांच्या नि माझ्याबद्दल घाणघाण सौंशय घेऊन बोलले. मग मात्र मी ठरवलं. विहीर गाठायची पनं माहेराला रामराम ठोकायचा. मग बाप्पांनी मला पिंपळपूरच्या संघटनेच्या ताईंकडे ठेवले. तिथे महिना काढला. पण पुढे काय? हा प्रश्न होताच. तेवढ्यात या संस्थेची माहिती कळाली. नि मला बाप्पांनी इथे आणून घातले." अशी ही गीता चार महिने दिलासा घरात होती. गुबरे गाल. अपरे नाक. नेहमीच उत्सुकतेने विस्फारलेले मोठेमाठे डोळे. उंची जेमतेम चार फूट दहा इंच असेल. ठुसका बांधा. गीताला संसाराची खूप हौस होती. बाजार करण्यात, स्वयंपाक करण्यात रस होता. अशा या गीताचे लग्न करून द्यावे असा बाप्पांचा आग्रह होता. योग्य मुलगा शोधण्यास मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. अर्थात गीताशी बोलल्याशिवाय लग्नाचा घाट घालणे योग्य वाटेना. कारण विवाहाच्या संकल्पनेभोवती सांस्कृतिक, भावनिक व धार्मिक रेशीम कलाबतूंची सुनहरी नक्षी विणलेली असली, तरी शेवटी पुरुषाला हवी असलेली "बाई” ची गरज, असेच मूळ स्वरूप असते. खेड्यात काय किंवा शहरात काय फारसा फरक नसतो. गीताला तर वयाच्या चौदाव्या वर्षीच तिशीच्या घरातल्या, त्यातूनही मूल होत नाही म्हणून बेचैन असलेल्या आणि त्यासाठी हपापलेल्या पुरुषाचा शारीरिक सहवास सहन करावा लागला होता. त्या मानसिक धक्क्याचे नेमके स्वरूप लक्षात घेणे महत्त्वाचे होते.
 दिलासाघर सुरू झाल्यापासून प्रथमच मानसशास्त्राच्या तांत्रिक अभ्यासाची
उणीव भासली. या लहान गांवात मानसशास्त्राचा अभ्यासक सापडणे अशक्यच होते. गावात शासकीय मेडिकल कॉलेज जरूर आहे पण या आडवळणाच्या गावात यायला तज्ज्ञ डॉक्टर्सही फारसे तयार नसतात. त्या शास्त्राची जाण आणि आवड असणारी व्यक्ती 'मनस्विनी'ला सुद्धा हवी होती. शेवटी अनुभव, वाचन आणि गीताला अधिक नेमकेमणानी बोलते करणे, याचा आधार घेतला आणि एक लक्षात आले की गीताला शारीरिक आघात व ताण जाणवला तरी त्या मानाने मानसिक धक्का कमी होता. खेड्यातला गोतावळा गाई, कुत्री, कोंबड्या, बकऱ्या अशांसह असतो. लैंगिक जीवनाबद्दलची गुप्तता, घृणा इ. भावना मानवी कुटुंबातून सहजपणे जोपासल्या जातात. पण खेड्यातील गोतावळ्यात या भावनांना एक सहज छेद आपोआप मिळतो. प्राण्यांचे कामजीवन, जननप्रक्रिया दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून अनुभवल्या जातात. वाढत्या वयानुसार, आपले जीवन आणि प्राणिजीवन यांतील संगतीचे आढावे अंतर्मनात आपोआप घेतले जातात. त्यातून काही गृहिततत्वे जोपासली जातात. घरातल्या पारंपारिक संस्कारातून स्त्री ही 'देणारी' असते आणि पुरुष हा 'घेणारा' असतो ही भूमिका आपोआप तयार होतेच. अगदी सुशिक्षित, मध्यमवर्गीय स्त्रियाही मुलींबद्दल असाच विचार करतात.
 "ज्याचा माल त्याच्या दारात नेऊन टाकला की आपण मोकळे. कधी करणार लेकीचं लग्न? आमचीचं ठरवून मोकळे झालो आम्ही!" या शब्दात एक शिक्षक बाई. मला टोकत होत्या. मग सर्वसामान्य स्त्रियांबद्दल काय बोलायचं?
 गीताने ती लहान असताना वडिलांचं आईच्या पांघरूणात घुसणं पाहिलं होतं. शारीरिक त्रास मात्र जबरदस्त होता. सुरुवातीच्या काळात नवऱ्याने लाड भरपूर केले होते. त्यामुळे स्त्री पुरुष सहवासाची आवड आणि ओढ निर्माण झाली होती. गप्पांच्या ओघात तिने सारे बोलून दाखवले. जोडीदार तरुण आणि तिच्या भावना जाणणारा असावा अशी तिची अपेक्षा होती. गीताला शेतकामाची भरपूर माहिती होती. आवड होती. शेतकरी संघटनेच्या शिबिरातील अनुभव, बैठकीतून शेतीचे व महिलांचे प्रश्न मांडण्याची सवय यामुळे गीताची जीवनाकडे, कुटुंबाकडे, स्वतःकडे बघण्याची दृष्टी अत्यंत सुजाण आणि संवेदनशील होती.
 ग्रामीण परिसरात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना एक महिन्याचे
प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प एका स्वयंसेवी संस्थेनी लोणावळ्याला आयोजित केला होता. आम्ही दोन कार्यकर्त्या पाठविण्याचे ठरवले. त्यात गीताची निवड केली. वातावरणात, विषयात बदल होईल, त्यातून तिचे मन स्थिर होईल असे वाटले. पण गीता तिथे जेमतेम आठ दिवस राहिली. दोन वर्षे शेतकरी संघटनेच्या लहानमोठया कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव असल्याने या प्रशिक्षणात तिला काही नवीन वाटेना. त्यातून तिथे आलेल्या महिलांच्या त्याच त्या गप्पांचाही तिला कंटाळा आला. बहुतेक प्रशिक्षणार्थी संसारी होत्या अथवा कुमारिका होत्या. कुणाला सारखे घर वा मुले दिसत. नवऱ्याची सय येई. तर कुमारिका पोरींची आपसात खुसपूस चाले. गीता तेथे काहीशी एकटी पडली. त्यातून डोंगर चढायउतरायची सवय नाही. शेवटी तिथे लेखी अर्ज देऊन बाई माघारी परत आल्या.
 एक दिवस बाप्पा एका बावीस-तेवीस वर्षाच्या तरुणास घेऊन मनस्विनीच्या कार्यालयात आले. या तरुणाचा विवाह तो दहा वर्षाचा असताना एका पाच वर्षाच्या चिंगुलीशी झाला. चौथी पास झाल्यावर तो तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी आला. मॅट्रिकची परीक्षा दिली, पण इंग्रजी विषयाने पाय अडकवला नि मॅट्रीक फेल ही डिग्री मागे लावली. खरे तर शाळेत असतानाच रेडिओ दुरुस्ती, लाईट फिटिंग, विजेच्या मोटारींची दुरुस्ती यांची विशष आवड निर्माण झाली. मग एका रेडिओ मेकॅनिकच्या हाताखाली दोन वर्षे काम केले. मध्ये बराच काळ लोटला होता. लहानपणी ज्या मुलीशी लग्न झाले होते तिच्या वडिलांना तिचा विवाह दुसऱ्या मुलाशी करून द्यायचा होता. यालाही शिकण्याची इच्छा होती. तो नववीत असतानाच रिवाजानुसार काडीमोड झाला होता. रेडिओ मेकॅनिकचा धंदा बरा चालू लागल्यावर लग्न करण्याची इच्छा होती. पण त्याला पत्नी थोडंफार शिकलेली आणि गांवाकडे राहून शेत व सासू सासऱ्यांची काळजी घेणारी हवी होती. बाप्पांनी गीतूची माहिती दिली. पहिल्या भेटीत दोघांनी एकमेकांच्या आवडी निवडीबद्दल, मागील जीवनातील घटनांबद्दल गप्पा मारल्या. दुसऱ्या भेटीत मुलाने प्रश्न केला की संस्थेत नोकरी मिळेल का? बाप्पांचीही इच्छा होती की मुलाला संस्थेच्या व्यापात सामावून घ्यावे. पण आम्ही या गोष्टीला विरोध केला. पूर्वीपासूनच तो संस्थेत असता आणि नंतर संस्थेतील मुलीशी विवाह
करण्याचा निर्णय घेतला असता तर, संस्थेने त्याला सहकार्य केले असते. बधाई दिली असती. संस्थेचे नियम वेगळे आणि शिस्त वेगळी. ती पाळणे महत्त्वाचे. भविष्यात या संदर्भात त्याच्या हातून चुका घडल्यास त्याचे परिणाम त्याला स्वीकारावे लागले असते. विवाहाचा एक परिणाम वा फायदा म्हणून नोकरी मिळेलच असे त्याला वाटणे हे आम्हाला योग्य वाटले नाही. कदाचित त्यातून संस्थेच्या कामावर दबावही आला असता. गीताच्या संसारातही त्यातून छोटीमोठी वादळे निर्माण झाली असती. अर्थात आम्ही आमच्या नकारामागची भूमिका गीता व बाप्पांना समजावून दिली. मुलाला मात्र सध्या जागा नाही, पुढे मागे जागा असल्यास विचार करू असे सांगून समजूत घातली. गीताचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावला. नव्या संसारासाठी लागणाऱ्या सामानाची यादी आमच्या दिलासातील इतर मुलींनी अगदी हौशीने तयार केली. प्रेशर कुकरचा आग्रह सर्व जणींनीच धरला. पोळपाट, कळशी, कढई, जर्मनचे डब्बे, वाट्या, पेले आदी भरपूर सामान मुलींनी जमवलं. मात्र सतरंजी, गादी आणि चादरीला जाणीवपूर्वक चाट मारली. हा निर्णय त्यांचाच.
 गीता गावातंच राहात होती. अधूनमधून संस्थेत येत असे. नंतर सासरच्या गावी गेल्याचे कळले. आज पाच वर्षानंतर दोन मुलांना घेऊन गीता समोर उभी राहिली. हातात अर्ज होता.
 "मी गीता मधुकर पाखरे मनस्विनीच्या दिलासाघरात राहात होते. तिथेच माझे लग्न झाले. आता मी सासरी आनंदात आहे. मला दोन मुले आहेत. माझे जोडीदार मधुकर, पुणे येथे दापोडीस काम करतात. मी गावी सासू-सासऱ्यांसह राहते. शेतमळा सांभाळते. माझ्या वडिलांनी माझ्या भावांच्या नावे १२ एकर शेत करून दिले. उरलेले सहा एकर शेत माझे नावे करून देतो म्हणतात. माझे भाऊ त्यांना सांभाळत नाहीत. त्यांचे फार हाल होतात. वडिलांची इच्छा माझ्याजवळ राहाण्याची आहे. मधुकरांच्या कानावर मी त्यांची इच्छा घातली. त्यांनी व मी असे ठरवले की तुम्हाला भेटून निर्णय घ्यावा. कृपया मला यावाबत सहकार्य करावे ही विनंती.

 आपली, 
गीता मधुकर पाखरे.

 मोफत कायदा आणि कुटुंबसल्ला मदत केंद्राच्या रीतीनुसार आम्ही तिचे आई-वडील, जोडीदार, सासू-सासऱ्यांची एक बैठक घेतली, चर्चा केली.

 गीताच्या मनात वडिलांविषयीचा राग आलेला परत दाटलेला होता. घरात आईला होणारा जाच तिने जवळून पाहिला होता. भावांचे लाड तर आई नि वडील नको तितके करीत. दोघांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले होते. एकाला मटक्याचा नाद होता. दुसऱ्याची बायको जळून मेली होती. गीताच्या मनात आई विषयी पण आढी होती. तिला वाटे की, आई सुनेशी नीट वागली असती, मुलाला धाकात ठेवले असते तर तिने जीव दिला नसता. गीताच्या विवाहानंतर गेल्या नऊ-दहा वर्षात माहेरच्यांनी कधी तिची दखल घेतली नव्हती. बाप्पावर नि गीतावर घाणेरडा संशय घेणारे वडील, बाप्पांना घेऊन गीताच्या दारात आले होते. आपले दुःख सांगताना भडभडा रडलेही होते. पहिल्या भेटीत वडिलांना जेऊखाऊ घालून, शंभर रुपये खर्चाला देऊन पण "आता तरी माझा संसार नासवायला येऊ नका " असे ठामपणे बजावून त्यांना माघारी धाडले होते.
 मधुकर पुण्याहून आल्यावर तिने त्याच्या कानावर सारी हकीगत घातली. गीताची सासू अतिशय प्रेमळ आहे. गीताने बापाला एवढे टाकून बोलायला नको होते असे तिने आवर्जून लेकाला सांगितले. गीताचा बाप रीतीनुसार वागला. सगळा समाजच पोरींना गळ्यातली धोंड समजतो. "ज्याच्या घरी पाप त्याच्या घरी जन्मतात लेकी आपोआप" अशी म्हणच आहे. पाच पोरींना हुंडा द्यायचा म्हणजे बापाच्या गळ्यावर जूच की. त्यातून कोणत्याही वयाचा बाप्या नि लहानगी मुलगी एकत्र दिसले की लोकांना संशय येतोच. बाई नि बुवा यांच्यात तीनच स्वच्छ नाती असतात. आई, बहीण आणि मुलगी. अशा वेळी त्यांच्या मनात संशय येणे चुकीचे असले तरी ते रितीनुसार होते. त्यांच्यावर वसावसा रागावण्यापेक्षा त्यांना गोडीने बोलायला हवे होते असे गीताच्या सासूचे मत. सासूचे मत ऐकून गीताला खूप बरे वाटले. सासूबद्दलचा आदर आणखीनच दुणावला. गीता नि मधुकर आधी संस्थेत येऊन आमच्याशी बोलून गेले. मधुकर पुण्यात राहातो. रात्रशाळेत जाऊन त्याने बारावीची परीक्षा दिली आहे. कामगार संघटनेचे कामही उत्साहाने करतो. सासऱ्यांनी शेत दिले नाही तरी, लेकीने त्यांना आधार द्यावा असे त्याचे मत. गीताचे सासरे मात्र काहीसे नाराज
होते. एकत्र राहाणे कसे जमावे? पटले नाही तर पुढे कसे? असे त्यांना वाटे. अर्थात त्यांच्या म्हणण्यातही तथ्य होते.
 मधुकर पुण्यात राहणार. दोन घरातल्या, सासर नि माहेरच्या चार वयस्कांना 'नांदवणे' ही एक मोठी जबाबदारी होती. गीताचा स्वभाव तसा बडबड्या. काहीसा तापट. तिला ही जबाबदारी नीट पार करता येईल की नाही याची मलाही शंका होती. त्यासाठी तिच्याशी बोलणे महत्त्वाचे होते. ती जबाबदारी आमच्या कार्यकर्तीने संवादिनीने स्वीकारली. वृद्धाश्रम, त्यामागची कल्पना, तेथील वातावरण, वृद्धांना आवडणाऱ्या कामात त्यांना कसे गुंतवावे लागते वगैरे अनेक गोष्टी तिला सांगितल्या. माहिती दिली. त्यानंतर मधुकर, गीता, तिचे आईवडील, सासूसासरे सगळेच एकत्र बसले. मागील घटना कुणाच्या उकरून काढायच्या नाहीत, एखादी गोष्ट पटली नाही तर मोकळेपणी सांगायचे, टोमणे मारायचे नाहीत. सर्वांनी गीताला मदत करायची, असे ठरले. दोन वर्ष नीटनेटकी, समाधानाने पार पडली तर मग सहा एकर शेती वडिलांनी गीताचे नावें करावी असा निर्णय घेतला. आज या गाष्टीलाही तीनचार वर्ष उलटली आहेत.
 आज गीता, सासूसासरे, आईवडील यांच्या सोबत राहाते. वडिलांचे शेत दुसऱ्याला बटाईने दिले आहे. मधुकर वर्षातून तीनचार वेळा येऊन जातो. माहेरात आसरा न मिळालेली नकोशी मुलगी आज आई वडिलांना आणि सासूसासऱ्यांना दिलासा देत संसार करीत आहे.