गजानन विजय/अध्याय ८

विकिस्रोत कडून

<poem> ॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना । हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥

तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान । परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥

तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं । त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥

गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद । कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥

अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती । तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥

जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां । तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥

ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी । दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥

हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी । स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥

तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून । घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥

मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात । निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥

ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा । घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥

तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन । अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥

असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं । मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥

जेथ जेथ ही नादे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी । अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥

क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला । नेतसे यमसदनाला । प्रयत्‍न पडती लुळे तेथ ॥१५॥

असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार । करुं लागला चरचर । या खंडूपाटलापुढें ॥१६॥

पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी । कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥

तो असे मर्‍या महार । देशमुखांचा ज्याला जोर । तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥१८॥

पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी । गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥१९॥

उणीं उत्तरें बोलण्याचा । अधिकार आहे देशमुखाचा । तुझ्यासारख्या नकटयाचा । नाहीं हें आण मनीं ॥२०॥

तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना । त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥

बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण । कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥२२॥

तो टप्पा न्यावयासी । सांगितलें होतें महारासी । कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥

तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार । देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥२४॥

कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी । तुझ्या हुकुमालागुनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥

ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला । मूठ वळुनी हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥

ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं । भरीव वेळूची काठी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥

त्याच काठीचा केला प्रहार । महाराचिया हातावर । पाटील मूळचा जोरदार । त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥

त्या प्रहारें करुनी । हात गेला मोडूनी । महार बेशुद्ध होवोनी । पडता झाला भूमीवर ॥२९॥

पाटील दुसर्‍या महाराला । गेले टप्पा द्यावयाला । तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आतां सांगतों ॥३०॥

तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं । मोडला हात हें पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥३१॥

वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली । ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥

त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी । समाजविलें अधिकार्‍यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥

कोठेंही दोन पक्षांत । वांकडें आल्या यत्किंचित् । कांटयांचेच होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥

फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची । आज्ञा झाली अधिकार्‍याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥

शेगांवीं झाली पुकार । उद्यां आहे पडणार । पाटलाच्या पदीं थोर । बेडी करीं हातकडया ॥३६॥

खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें । तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥३७॥

ज्या शेगांवीं मी वाघापरी । वागत होतों आजवरी । तेथेंच कां हा श्रीहरी । प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥

अब्रुदारास अपमान । वाटे मरणाहून मरण । बंधु गेले घाबरुन । कांहीं विचार सुचेना ॥३९॥

खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला । श्रीगजानन महाराजाला । सांकडें हें घालावें ॥४०॥

त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन । करणारा न कोणी आन । राहिला या वर्‍हाडीं ॥४१॥

लौकिकीं यत्‍न करण्याला । बंधु गेले अकोल्याला । खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥४२॥

येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर । महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥

सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत । तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥४४॥

त्याचा ऐसा परिणाम झाला । कांटयाचा नायटा केला । देशमुख मंडळींनीं भला । माझें अहित करण्यास ॥४५॥

त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला । समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥

उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत । बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥४७॥

त्यापेक्षां गुरुवरा । गळा माझा येथेंचि चिरा । ही घ्या तलवार देतों करां । वेळ करुं नका हो ॥४८॥

अब्‍रुदाराकारण । बेइज्जत हेंच मरण । अपराध माझा त्यांतून । अति अल्प दयाळा ॥४९॥

त्या अपराधरुपी खडयाचा । हा डोंगर झाला साचा । अभिमान माझ्या अब्रूचा । धरा समर्था ये काळीं ॥५०॥

जयद्रथाच्या वेळेला । अग्निकाष्ठ भक्षिण्याला । होता अर्जुन तयार झाला । केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥

तेथें भगवंतानें भली । अब्रू त्याची रक्षण केली । प्रभूनें वस्त्रें नेसविलीं । द्रौपदीला सभेंत ॥५२॥

तेवीं मम अब्रूही पांचाळी । देशमुख कौरवांनीं आणिली । नग्न करण्यासाठीं भली । तिचें करा हो रक्षण ॥५३॥

ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला । आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥

घरचीं माणसें चिंतातुर । आधींच झालीं होतीं फार । नाहीं त्यांच्या शोका पार । तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥

इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळिलें । खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥५६॥

अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात । वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥

स्वार्थदृष्टि बळावतां । ऐसेंच होतें तत्त्वतां । खर्‍या नीतीची ती वार्ता । अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥

तुम्ही पाटील देशमुख दोघेजण । एका जातीचे असून । एकमेकांचें नुकसान । स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥

मागें कौरवपांडवांत । स्वार्थेंच आला विपट सत्य । परि पांडवांचा पक्ष तेथ । न्यायें खरा होता कीं ॥६०॥

म्हणून पांडवांकारणें । साह्य केलें भगवंतानें । सत्यासाठीं मारणें । भाग पडलें कौरवांना ॥६१॥

जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार । किती जरी केला जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥६२॥

तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले । जें कां संतमुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥६३॥

पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार । कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ? ॥६४॥

पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें । नेलें रहायाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥६५॥

असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ । ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥६६॥

तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती । परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥६७॥

तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थाकडे आले जाण । तयीं होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥

त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र । जटेचे ते स्वरासहित । अति उच्च स्वरानें ॥६९॥

मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली । म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥

आणि ऐसें वदले ब्राह्मणांला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां । हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥७१॥

ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची । वा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥७२॥

मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा । उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥७३॥

जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्या सुरुं केली जाणी । तोच अध्याय समर्थांनीं । धडधड म्हणून दाखविला ॥७४॥

चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य । वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥

तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले । मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥

सूर्य उदय झाल्यावर । त्याच्यापुढें कां होणार । दीपांचा तो जयजयकार । त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥

विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी । चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥

हा विधाताच होय दुसरा । शंका येथें नुरली जरा । हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं निःसंशय ॥७९॥

परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची । कोणत्याही प्रकारची । हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥

कांहीं पुण्य होतें पदरीं । म्हणून मूर्ति पाहिली खरी । हा वामदेव याला दुसरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥

असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून । देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥

ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवां निघून गेले । महाराजही कंटाळले । उपाधीला गांवच्या ॥८३॥

श्रोते खर्‍या संताप्रत । उपाधी ना असे पटत । दांभिकाला मात्र । भूषण होतें तियेचें ॥८४॥

गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला । या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥

एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार । लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥८६॥

हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा । हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥

त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले । एका ओटयावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥८८॥

समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी । कांहीं दिवस राहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥८९॥

हा भोलानाथ कर्पूरगौर । नीलकंठ पार्वतीवर । हा राजराजेश्वर । आहे अवघ्या देवांचा ॥९०॥

तो तुझ्या मळ्यांत रमला । म्हणून मींही विचार केला । येथें येण्याचा तो भला । दे साउली करुन ॥९१॥

तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रे आणविले । ओटयावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥

समर्थांनीं वास केला । म्हणून मला क्षेत्र झाला । राजा जाय जया स्थला । मीच होते राजधानी ॥९३॥

महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर । सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाटया ॥९४॥

खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी । समर्थ ते जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥९५॥

असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्‌भुत । येते झाले फिरत फिरत । दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥

समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला । म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥

गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी । जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥९८॥

गंगोत्री जम्नोत्री केदार । हिंगलाज गिरनार डाकुर । ऐशीं क्षेत्रें अपार । पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥

ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहों साचे । महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥

हे महासाधु ब्रह्मगिरी । ज्यांचा बंदा गुलाम हरी । ती मूर्ति आली घरीं । तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥

शिरापुरीचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्ही त्वरित । लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥२॥

तीन दिवस येथें राहूं । चौथे दिवशीं येथून जाऊं । पाटील नका कष्टी होऊं । साधून घ्या ही पर्वणी ॥३॥

तुम्ही पोशिला मळ्यांत । वेडा पिसा नंगाधूत । मग आम्हां देण्या अयाचित । मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥

गाढवासी पोशिती । गाईस लाथा मारिती । ते का म्हणावें सन्मती । पहा विचार करुन ॥५॥

आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदान्त । मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६॥

कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी । आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥७॥

जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेंच मिळेल । तेथें चालता बोलता कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥

दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी । मळ्यांत घेउनि विहिरीवरी । बसले गोसावी भोजना ॥९॥

समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरीं । गोसाव्यांनीं लाविली खरी । आपआपलीं कडासनें ॥११०॥

त्यांचा जो होतो महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य । तो भगवद्गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥

गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले । पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥

"नैनं छिन्दन्ति" हा श्लोक । निरुपणाचा होता देख । ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥

निरुपण त्याचें ऐकिलें । गांवकर्‍यास नाहीं पटलें । ते आपसांत बोलूं लागले । हा नुसता शब्दच्छल ॥१४॥

सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं । गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥१५॥

लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला । येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥

तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष । या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥१७॥

अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया । त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥१८॥

पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी । चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥१९॥

त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची । ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥१२०॥

कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर । पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥

तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्‌गुरुनाथा । पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥२२॥

लाकडें हीं पलंगाचीं । आहेत कीं सागाचीं । तीं न आतां विझायाचीं । पाण्यावांचून दयाळा ॥२३॥

तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें । कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥२४॥

अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी । तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥

त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ । ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥

"नैनं छिन्दन्ति" श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर । आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥

जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी । आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥२८॥

ऐशी आज्ञा होतां क्षणीं । भास्कर गेला धांवोनी । ब्रह्मगिरीचा सव्य पाणी । धरिला त्यानें निजकरें ॥२९॥

भास्कराचें शरीर । धिप्पाड सशक्‍त पिळदार । तो गोसावि त्याच्या समोर । शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥

पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर । परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥३१॥

श्री प्रल्हाद कयाधूसुत । उभा केला अग्नींत । हें लिहिलें पुराणांत । श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥

त्या लिहिल्या गोष्टीचें । प्रत्यंतर दाविलें साचें । मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥

ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं । महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥३४॥

तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर । उभा केला समोर । आपल्या सद्‌गुरुरायाच्या ॥३५॥

’नैनं दहति पावक ।’ हें खरें करुन दावा वाक्य । ऐसें बोलतां महाराज देख । गोसावी परम घाबरला ॥३६॥

गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्‍या आहे संत । शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥

माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शांतिधामा । केला खटाटोप रिकामा । गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥

तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों । मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला अभय दे ॥३९॥

शेगांवच्या जनांनीं । केली समर्थां विनवणी । आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥१४०॥

तरी महाराज आमच्याकरितां । खालीं यावें लवकर आतां । अशा स्थितींत पाहतां । तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥

म्हणून आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी ॥ गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥४२॥

लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन । तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥४३॥

अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला । तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥

ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला । स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥

मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला । आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥४६॥

ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी । अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥

नुसतें शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात । तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥

गोसावी मच्छिंद्र जालंदर । गोरख गहिनी साचार । ज्ञानेश्वराचा अधिकार । किती म्हणून सांगावा ॥४९॥

स्वानुभवाचे झाले यती । श्रीशंकराचार्य निश्चितीं । प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति । अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥

स्वामी समर्थ ब्रह्मचारी । हेही ब्रह्मसाक्षात्कारी । होऊन गेले भूमीवरी । यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥

उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी । सार न तयामाझारीं । येतुलेंही गवसणार ॥५२॥

ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला । प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥५३॥

ही गोष्ट दुसर्‍या दिवशीं । कळली अवघ्या गांवासी । जो तो आला पाहावयासी । मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥

हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ । तारो भाविकां भवाब्धींत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]