गजानन विजय/अध्याय ७

विकिस्रोत कडून

<poem> ॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय जयाजी राघवा रामा । जय जयाजी मेघःश्यामा ।

संतजनांच्या विश्रामा । सीतापते दाशरथे ॥१॥

तुझ्या कृपेनें वानर । बलिष्ठ झाले भूमीवर ।

ज्यांनीं रावणाचा चक्काचूर । केला देवा लंकेवरी ॥२॥

तुझी कृपा झाल्या पाही । तो सर्वदा होतो विजयी ।

जें जें इच्छील तें तें नेई । काम आपलें तडीला ॥३॥

भूपतीचा वशीला । ज्यातें देवा ! लाधला ।

तो वंद्य होतो दिवाणाला । नीच कितीही असला जरी ॥४॥

ऐशा अमोघ कृपेला । होईन कां मी योग्य भला ।

याचा जों मीं विचार केला । तों ऐसें आलें कळोन ॥५॥

नाहीं ज्ञान नाहीं भक्ति । खरीखुरी हे श्रीपती ।

ऐसी आहे माझी स्थिति । शोचनीय पांडुरंगा ॥६॥

मन सदा आशाळभूत । तें ना कदा स्थिर होत ।

नाना विकल्प मनांत । येऊं लागती वरच्यावरी ॥७॥

मग ऐशा पातक्याला । केवि लाधावा वशीला ।

तुझा सांग जगत्पाला । हें व्यावहारिक म्हणणें असे ॥८॥

तुला आवडी पातक्याची । मनापासून आहे साची ।

ऐसी साक्ष पुराणाची । आहे कीं दीनबंधो ॥९॥

पुण्यवानाचें तारण । केल्या न कांहीं नवल जाण ।

जो पातक्यालागून । उद्धरीतसे तोच मोठा ॥१०॥

या जगतीं तुझ्याहून । मोठा नाहीं कोणी आन ।

देवा मम पातकालागून । किमपि आतां पाहूं नको ॥११॥

रक्षी आपला मोठेपणा । मज सांभाळी नारायणा ।

दासगणू शरण चरणा । आतां उपेक्षा करुं नका ॥१२॥

हा मारुतीचा उत्सव । करीत होता अवघा गांव ।

याचा पुढारी खंडेराव । पाटील गणेशकुळीचा ॥१३॥

हें पाटीलघराणें जाण । आहे अति पुरातन ।

घरचें धन कनकसंपन्न । पसारा थोर शेतीचा ॥१४॥

पूर्वीपासून यांच्या घरीं । संत-सेवा होती खरी ।

आली भाग्यें जमेदारी । मग काय विचारितां ? ॥१५॥

महादाजी पाटलास । दोन मुलगे औरस ।

थोरल्या त्या पुत्रास । नांव असे कडताजी ॥१६॥

कुकाजी तो धाकटा । पंढरीचा भक्त निका ।

गोमाजीचा उपदेश देखा । होता या घराण्यातें ॥१७॥

पाटील कडताजी कारण । मुलगे होते सहाजण ।

कुकाजी नुसता भाग्यवान । पुत्र नव्हता त्याचे कुशीं ॥१८॥

कडताजी पावतां मरण । साही मुलांचें संगोपन ।

कुकाजीनें केलें जाण । जन्मदात्या बापापरी ॥१९॥

कुकाजीच्या अमदानींत । भरभराट झाली बहुत ।

अष्टसिद्धि सदनांत । वाटे नांदूं लागल्या ॥२०॥

पाटील कुकाजीनंतर । खंडू करी कारभार ।

याच्या पुढें साचार । कांहीं न चाले कोणाचें ॥२१॥

या खंडू पाटलाप्रती । पांच बंधु निश्चिती ।

गणपती नारायण मारुती । हरी आणि कृष्णाजी ॥२२॥

आधींच पाटील जमेदार । सत्ता हातीं साचार ।

पैशाचा तो निघे धूर । जयाचिया सदनामध्यें ॥२३॥

बंधु सारे तालीम करिती । दांडपट्टे खेळती ।

कुस्तीचा तो षोक अती । होता हरी पाटलास ॥२४॥

उत्सव नांवास मारुतीचा । तरी जयजयकार पाटलाचा ।

म्हणतील तो शब्द त्यांचा । झेलणें भाग रयतेला ॥२५॥

नेहमीं कटकटी मारामार्‍या । शेगांवांत होती खर्‍या ।

पाटील एक्या मापीं सार्‍या । लोकांप्रती मोजितसे ॥२६॥

हा सज्जन साधुसंत । हें न ज्यांच्या मनीं येत ।

वाटेल त्या बोलती सत्य । अद्वातद्वा यथामती ॥२७॥

असो पाटीलबंधूंनीं । राउळांत येऊनी ।

महाराजातें हेटाळणी । करण्याचें तें सुरुं केलें ॥२८॥

कोणी म्हणावें पिश्यागण्या । खातोस का ताककण्या ? ।

ऐशा गोष्टी अति उण्या । त्यांनीं कराव्या समर्थासी ॥२९॥

कोणी म्हणावें खेळ कुस्ती । आम्हांसवें निश्चिती ।

तुला लोक बोलती । योगयोगेश्वर म्हणोन ॥३०॥

त्याचें दाव प्रत्यंतर । ना तरी आम्ही देऊं मार ।

याचा करी विचार । बर्‍या बोलानें येधवां ॥३१॥

त्यांचे बोल ऐकावें । समर्थांनीं न उत्तर द्यावें ।

अवघें हंसण्यावारी न्यावें । कोप न धरावा यत्किंचित्‌ ॥३२॥

ऐसा उर्मट प्रकार । मंदिरीं चाले निरंतर ।

म्हणून पाटील भास्कर । समर्थासी ऐसें वदला ॥३३॥

नका महाराज येथें राहूं । चला आकोलीं ग्रामा जाऊं ।

हीं पाटील पोरें माजलीं बहु । यांचा नको संबंध ॥३४॥

हे शक्तीनें माजलें । लक्ष्मीनें धुंद झाले ।

सत्तेपुढें कांहीं न चाले । येथें यांची पाटीलकी ॥३५॥

गजानन बोलले त्यावरी । भास्करा थोडा दम धरी ।

ही पाटील मंडळी सारी । आहेत माझे परम भक्त ॥३६॥

मात्र विनयाप्रती थारा । यांच्यापाशीं नाहीं जरा ।

शोधुनि पहा अंतरा । त्यांच्या म्हणजे कळेल तुज ॥३७॥

हीं पोरें पाटलाचीं । माझीं लेंकरें आहेत साचीं ।

कृपा आहे संतांची । यांच्या कुळावर भास्करा ॥३८॥

जमेदारा उर्मटपण । हेंच आहे भूषण ।

काय वाघाचें तें वजन । असावें सांग गाईपरी ? ॥३९॥

तलवारीला मऊपणा । मुळीं उपयोगी नाहीं जाणा ।

अग्नीनें तो थंडपणा । सांग धरावा कवण्या रीती ? ॥४०॥

गेल्यावरी कांहीं काळ । हा उर्मटपणा जाईल ।

पावसाळ्याचें गढूळ जल । हिंवाळ्यांत निवळ होई ॥४१॥

एके दिवशीं पाटील हरी । आला मारुतीच्या मंदिरीं ।

महाराजाला धरुन करीं । म्हणे कुस्ती करी माझ्यासवें ॥४२॥

तुला कुस्तींत करीन चीत । चाल जाऊं तालमींत ।

उगे न बैसे ऐसें म्हणत । गण गण गणांत बोते ॥४३॥

तुझें प्रस्थ माजलें बहु । तें खरें खोटें आज पाहूं ।

मला पाडसी तरी देऊं । तुला मोठें बक्षीस ॥४४॥

तें समर्था मानवलें । दोघें तालमीमध्यें गेले ।

समर्थांनीं कौतुक केलें । तें आतां परियेसा ॥४५॥

खालीं बसले गजानन । उठीव आतां मजलागून ।

असलास जरी पैलवान । तरी साच करशील हें ॥४६॥

हरी पाटील उठवावया । लागला यत्‍न करावया ।

परी ते अवघे गेले वायां । हालेनात समर्थ मुळीं ॥४७॥

घामाघूम तनु झाली । शक्तीची ती कमाल केली ।

पेच झाले निर्बळी । समर्थांसी झुंजतां ॥४८॥

हरी म्हणे मनांत । हा केवढा तरी सशक्त ? ।

अचल ऐसा पर्वत । याच्यापुढें येईल उणा ॥४९॥

हा किडकिडीत दिसतो जरी । शक्ति याची गजापरी ।

खोडया आमुच्या नानापरी । आजवरी यानें सहन केल्या ॥५०॥

त्याचें हेंच कारण । हा गजापरी बलवान ।

आम्ही जंबुकासमान । म्हणून नाहीं रागावला ॥५१॥

जंबुकाच्या चेष्टेला । गजपती न मानी भला ।

श्वानाचिया भुंकण्याला । व्याघ्र दे ना किंमत ॥५२॥

कांहीं असो याच्या पायीं । आतां ठेवणें आली डोई ।

आजपर्यंत मी नाहीं । कवणासीही नमन केलें ॥५३॥

समर्थ म्हणाले हरीला । आतां बक्षिस द्या आम्हांला ।

ना तरी चीत मजला । तुवां करावें कुस्तींत ॥५४॥

कुस्ती हा मर्दानी । षोक श्रेष्ठ सर्वांहुनी ।

कृष्ण बलरामें बालपणीं । ऐशाच कुस्त्या केल्या रे ! ॥५५॥

मुष्टिक आणि चाणूर । मल्लविद्येनें परमेश्वर ।

वधिता झाला साचार । जे देहरक्षक कंसाचे॥५६॥

पहिली संपत्ति शरीर । दुअरें तें घरदार ।

तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ॥५७॥

तुझ्याप्रमाणें पूतनारी । पाटील होता यमुनातीरीं ।

गोकुळींचीं पोरें सारीं । त्यानें केलीं सशक्त ॥५८॥

तैसें तुवां करावें । शरीरबला वाढवावें ।

ना तरी हें सोडावें । पाटील नांव आपुलें ॥५९॥

हेंच बक्षीस द्यावें मज । ना तरी कुस्ती करी आज ।

येणें रिती उतरला माज । समर्थांनीं हरीचा ॥६०॥

हरी म्हणे समर्थांस । आपुली कृपा असल्यास ।

शेगांवच्या लेंकरांस । सशक्त करितां येईल कीं ॥६१॥

ऐसें धूर्तपणाचें बोलणें । केलें पाटील हरीनें ।

जे मुळांत असती शहाणे । त्यांना शाळा नको कीं ॥६२॥

असो त्या दिवसापासून । हरीने दिलें सोडून ।

अद्वातद्वा भाषण । करणें पुण्यपुरुषाशीं ॥६३॥

ही पाहोनि त्याची कृति । इतर बंधु बोलती ।

हरी तूं त्या जोगडयाप्रति । कां भितोसी कळेना ॥६४॥

आपण पाटलाचे कुमार । या गांवींचे जमेदार ।

तें तूंच कां रे ठेविशी शिर । पदीं त्या नागव्याच्या ॥६५॥

त्या पिशाचें थोतांड । गांवीं माजलें उदंड ।

त्याचा पाहिजे काढिला दांड । लोकां सावध करावया ॥६६॥

ऐसें न जरी आपण केलें । तरी लोक अवघे होतील खुळे ।

पाटलाचें कर्तव्य भलें । गांवा हुशार करण्याचें ॥६७॥

मैंद साधूचे वेष घेती । वेडयावांकडया कृत्या करिती ।

बाया बापडया भोंदिती । याचा करी विचार ॥६८॥

सोन्या कस लाविल्याविना । न कळे रे सोनेपणा ।

तुकारामाचा शांतपणा । कळून आला उंसानें ॥६९॥

ज्ञानेश तेव्हां साधु कळला । जेव्हां रेडा बोलला ।

परीक्षेविण कवणाला । अस्थानीं मान देऊं नये ॥७०॥

चाल परीक्षा तयाची । आज आपण करुं साची ।

मोळी घेऊन ऊंसाची । मंदिरांत पातले ॥७१॥

हरी न कांहीं बोलला । इतरांनीं प्रश्न केला ।

अरे पिशा या ऊंसाला । खातोस कां तूं सांग हें ? ॥७२॥

जरी ऊंस खाण्याची । इच्छा असेल तुला साची ।

तरी एक अट आमुची । आहे ती तूं मान्य करी ॥७३॥

आम्ही ऊंसाचे करुं प्रहार । तुझ्या येधवां अंगावर ।

त्याचे वळ ना उठले जर । तरीच योगी मानूं तुला ॥७४॥

ऐसें भाषण ऐकिलें । महाराज कांहीं न बोलले ।

लेंकरांचे बालिश चाळे । मनीं न आणी सुज्ञ कदा ॥७५॥

मारुती म्हणाला त्यावर । अरे हा भ्याला साचार ।

ऊंसाचा तो खाण्या मार । हा कांहीं तयार नसे ॥७६॥

मग म्हणाला गणपती । अरे मौन हीच संमती ।

त्यानें दिधली आपणाप्रति । आतां काय पहातां ? ॥७७॥

तें दोघां तिघां मानवलें । ऊंस करीं घेतले ।

समर्थांसी मारण्या भले । आले चढून अंगावर ॥७८॥

तें पाहतां नारीनर । मंदिरीं जे होते इतर ।

ते पळूं लागले भराभर । भास्कर तेवढा जवळ असे ॥७९॥

भास्कर म्हणे पोरांसी । नका मारुं समर्थांसी ।

या ऊंसानें आज दिवशीं । हें कांहीं बरें नव्हे ॥८०॥

तुमचा पाटील-कुळांत । जन्म झाला आहे सत्य ।

तुमचें असावें दयाभूत । अंतःकरण दीनांविषयीं ॥८१॥

हे महासाधु तुम्हांसी । जरी न वाटतील मानसीं ।

तरी हीन दीन लेखून यासी । द्यावें सोडून हेंच बरें ॥८२॥

अरे शूर जे का शिकारी । ते चाल करिती वाघावरी ।

उगीच बंदूक घेऊनि करीं । न मारिती नाकतोडा ॥८३॥

मारुतीनें जाळिली । रावणाची लंका भली ।

उगीच नाहीं चाल केली । झोंपडया पाहून दुबळ्यांच्या ॥८४॥

यावरी म्हणती पोरें । तुमचें भाषण ऐकिलें सारें ।

गांवींचे लोक अत्यादरें । योगयोगेश्वर म्हणती या ॥८५॥

म्हणून त्याचा पहाया योग । येथें आलों आम्ही चांग ।

यांत न घ्यावा तुम्ही भाग । पहा मौज दुरुनी ॥८६॥

ऊंस घेऊन हातांत । मारुं लागले समर्थांप्रत ।

जैशा का झोडितात । ओंब्या शेतीं कृषीवल ॥८७॥

परि न महाराज डगमगले । मुलां पाहून हंसत बसले ।

कोठेंही ना उमटले । वळ त्यांच्या अंगावर ॥८८॥

तें पहातां पोरें भ्यालीं । चरणीं त्यांच्या लागलीं ।

म्हणती खराच आहे बली । हा योगयोगेश्वर ॥८९॥

महाराज म्हणती पोरांला । मुलांनो ! तुमच्या करांला ।

असेल अती त्रास झाला । मारण्यानें मजलागीं ॥९०॥

त्या श्रमाचा करण्या नास । काढून देतों इक्षुरस ।

तुम्हांलागीं प्यावयास । या बसा माझ्यापुढें ॥९१॥

ऐसें म्हणून घेतला । एक ऊंस करीं भला ।

हातानेंच पिळून त्याला । रस काढिला पात्रामध्यें ॥९२॥

त्या ऊंसांची अवघी मोळी । समर्थांनीं पहा पिळिली ।

आणि प्यायाकारणें दिली। रस नव्हाळी पोरांस ॥९३॥

श्रीगजानन पुण्य पुरुष । चरकावांचून काढिला रस ।

तें पाहातां बालकांस । अति आनंद जाहला ॥९४॥

लोक म्हणती ही योगशक्ति । दंतकथा मुळीं नसती ।

योगें जी का प्राप्त होती । त्या शक्तीला च्युति नसे ॥९५॥

पौष्टिक पदार्थें शक्ति येते । परी न ऐशी कायम टिकते ।

सशक्त आपुल्या राष्ट्रातें । करणें असल्या योग शिका ॥९६॥

हेंच तत्त्व सुचवावयासी । त्या पाटील अर्भकांशीं ।

करें काढून रसाशीं । दाविते झाले श्रोते हो ॥९७॥

समर्थांसी वंदून । गेलीं पोरें निघून ।

खंडू पाटलाकारण । वर्तमान श्रुत केलें ॥९८॥

दादा आपुल्या गांवांत । गजानन ईश्वर साक्षात्‌ ।

त्याचा आज आम्हांप्रत । आला आहे प्रत्यय ॥९९॥

ऐसें म्हणून कथिली सारी । हकीकत त्याला खरी ।

ती ऐकतां अंतरीं । खंडू पाटील चकित झाला ॥१००॥

मग तोही दर्शनाला । समर्थांच्या येऊं लागला ।

परी मार्दव वाणीला । मुळीं नव्हतें यत्किंचित्‌ ॥१॥

गण्या, गजा ऐसें म्हणे । पाटील समर्थाकारणें ।

अरे तुरे हें बोलणें । होतें दोन ठिकाणीं ॥२॥

प्रेम आत्यंतिक जें काई । तेथें ऐसें घडून येई ।

आई लेंकरांमाजी होई । भाषण अरेतुरेचें ॥३॥

हा एक प्रकार झाला । आतां दुसरा राहिला ।

तोही सांगतों ऐका भला । सावधान चित्तानें ॥४॥

नोकर चाकर हीन दीन । यांच्या सवें जें भाषण ।

करिती संभावित जन । तेंही एकेरी स्वरुपाचें ॥५॥

अरे तुरे म्हणण्याची । संवय पाटला पडे साची ।

कां कीं रयत गांवचीं । लेकरें त्याचीं निःसंशय ॥६॥

श्रोते याच संवयीनें । खंडू पाटील गण्या म्हणे ।

श्रीसमर्थांकारणें । कांहीं न दुसरें कारण ॥७॥

गण्या गण्या म्हणे वाणी । परी प्रेम उपजे अंतःकरणीं ।

पहा नारळालागुनी । वर करवंटीं खोबरें आंत ॥८॥

याच न्यायें तयाचा । परिपाठ होता बोलण्याचा ।

वृद्धापकाळ कुकाजीचा । झाला म्हणून कारभार करी ॥९॥

कुकाजी तो एके दिवशीं । बोलतां झाला खंडूशीं ।

तूं जातोस प्रतिदिवशीं । महाराजांच्या दर्शना ॥११०॥

सांगतोस मला साक्षात्कारी । गजानन एक भूमीवरी ।

मग का रे तुझी वैखरी । मुग्ध होते त्याच्या पुढें ॥११॥

तुला नाहीं पोरबाळ । माझा झाला वृधापकाळ ।

नातवंडाचे बोल खेळ । पाहूं दे मज डोळ्यानें ॥१२॥

आज विनंती करी त्यांना । स्वामी समर्थ गजानना ।

म्हणावें त्या करुन करुणा । पोर एखादें द्या मज ॥१३॥

तो खरा साधु असल्या सत्य । पुरतील तुझे मनोरथ ।

आणि माझाही अवघा हेत । तडीस जाईल त्यायोगें ॥१४॥

साधु पुरुषा अशक्य कांहीं । जगत्रयीं या उरलें नाहीं ।

संतलाभाचा करुन घेई । कांहीं आपणां उपयोग ॥१५॥

तें खंडूतें मानवलें । एके दिवशीं बोलणें केलें ।

मारुतीच्या मंदिरीं भलें । तें ऐका येणें रितीं ॥१६॥

अरे गण्या माझा चुलता । वृद्ध झाला आहे आतां ।

इच्छा उपजली त्याच्या चित्ता । नातवंड तें पाहण्याची ॥१७॥

तुला लोक साधु म्हणती । दर्शन केल्या तुजप्रती ।

इच्छा मनींच्या पूर्ण होती । ऐसें लोक सांगतात ॥१८॥

त्याचें दावी प्रत्यंतर । उगा नको करुं उशीर ।

तुझ्या पायीं ज्याचें शिर । तो कां रहावा निपुत्रिक ? ॥१९॥

ऐसें भाषण ऐकिलें । महाराज त्याशीं बोलले ।

आज हें उत्तम घडून आलें । त्वां याचना केली आम्हां ॥१२०॥

सत्ता धन तुझ्या हातीं । तूं प्रयत्‍नवादी असशी निगुती ।

मग विनंती आम्हांप्रति । कां करितोस कळेना ? ॥२१॥

धन आणि बलापुढें । अवघेंच म्हणशी बापुडें ।

मग कां रे हें न घडे । साह्यें धनबालच्या ॥२२॥

तुझी भव्य आहे शेती । गिरण्या दुकानें पेढया अती ।

तुझें न कोणी मोडती । जन शब्द या वर्‍हाडांत ॥२३॥

मग त्या ब्रह्मदेवाला । कां न आज्ञा करिशी भला ? ।

आपणां पुत्र द्यावयाला । हेंच कोडें पडलें मज ॥२४॥

खंडू करी भाषण । ही गोष्ट ना यत्‍नाधीन ।

पिकें पाण्यापासून । येती जरी जगामध्यें ॥२५॥

तरी पाडणें पाणी । मानवाच्या न करी जाणी ।

दुष्काळांत जमिनी । पडती उताण्या ख्यात हें ॥२६॥

मात्र पाणी पडल्यावर । कर्तृत्व आपुलें चालवी नर ।

तैसाच हाही प्रकार । तेथें न गती मानवाची ॥२७॥

खंडू पाडील ऐसें बोलतां । हंसूं आलें समर्था ।

तूं केलीस याचना आतां । मजकारणें पोराची ॥२८॥

याचना म्हणजे मागणें भीक । हें तूं आज केलें देख ।

तुला होईल बालक । भिक्या नांव ठेव त्याचें ॥२९॥

पुत्र देणें माझ्या करीं । सर्वतोपरी नाहीं जरी ।

परी मी विनंती करीन खरी । तुझ्यासाठीं परमेश्वरा ॥१३०॥

तो ऐकेल माझी भीड । त्याला न हें कांहीं जड ।

तूं घरचा आहेस धड । रस आंब्याचा द्विजां घाली ॥३१॥

हें मम मानी प्रमाण वचन । पुत्र होईल तुजकारण ।

आम्ररसाचें भोजन । दरसाल घाली ब्राह्मणां ॥३२॥

हें खंडुनें ऐकिलें । घरीं येऊन सांगितलें ।

कुकाजीसी निवेदिलें । मंदिरींचें वर्तमान ॥३३॥

हें ऐकतां कुकाजीस । आनंद झाला बहुवस ।

तो कांहीं लोटतां दिवस । समर्थ वचन झालें खरें ॥३४॥

कांता खंडू पाटलाची । गंगाबाई नांवाची ।

गर्भिणी झाली साची । नवमास पूर्ण झाले ॥३५॥

तिजलागीं पुत्र झाला । खंडू पाटील आनंदला ।

कुकाजीच्या हर्षाला । पारावार कांहीं नसे ॥३६॥

त्यानें दह्र्म केला बहू । गरीबां दिले गूळ गहूं ।

पेढे-बर्फीचा दिला खाऊ । गांवांतील अर्भकांना ॥३७॥

थाटांत झालें बारसें । भिकू नांव ठेविलेंसें ।

पुढें बाळ वाढला असे । शुक्लपक्षीच्या इंदूपरी ॥३८॥

आम्ररसाचें भोजन । दिलें ब्राह्मणांकारण ।

तो सांप्रदाय अजून । शेगांवांत चालत असे ॥३९॥

पुण्यपुरुषाची वैखरी । कोठून होईल असत्य तरी ।

पाटलाच्या ओसरीवरी । बाळ रांगूं लागला ॥१४०॥

हा बोलबाला पाटलाचा । देशमुखां पटला न साचा ।

शेगांव हा दुफळीचा । गांव पहिल्यापासून ॥४१॥

एक फळी देशमुखांची । एक फळी पाटलांची ।

अंतःकरणें एकमेकांचीं । मुळीं होतीं अशुद्ध ॥४२॥

प्रत्येक आपुल्या डावांत । एकमेकांचा करण्या घात ।

सदा इच्छिती मनांत । लेश नसे प्रेमाचा ॥४३॥

शास्त्री दोन मंत्री दोन । शस्त्री दोन तंत्री दोन ।

एकमेकांपुढें श्वान । येतां गुरगुर रोकडी ॥४४॥

तैसें झालें शेगांवांत । पाटील आणि देशमुखांत ।

छत्तिसाचा आंकडा सत्य । झाला न होईल त्रेसष्टाचा ॥४५॥

पुढें गोष्ट झाली ऐशी । कुकाजी झाले स्वर्गवासी ।

पाहूनिया नातवंडासी । भीमातटीं पंढरींत ॥४६॥

तेणें खंडूचें उद्विग्न मन । गेलें सहज होऊन ।

तो म्हणे छत्र पूर्ण । माझें आज ढासळलें ॥४७॥

ज्या चुलत्याच्या जिवावरी । मी निर्भय होतों भूमिवरी ।

तो आधार माझा श्रीहरी । कां रे नेलास काढून ? ॥४८॥

ऐशी संधि पाहून । बालंट आणायाकारण ।

पाटलावरी सवड पूर्ण । मिळाली देशमुखमंडळीला ॥४९॥

तो वृत्तान्त अष्टमांत । सांगेन श्रोते तुम्हांप्रत ।

ही जमेदारी खाण सत्य । आहे प्रत्यक्ष द्वेषाची ॥१५०॥

हा दासगणूविरचित । गजाननविजयनामें ग्रंथ ।

परिसा श्रोते सावचित्त । कुतर्कातें सोडोनिया ॥१५१॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]