गजानन विजय/अध्याय २१

विकिस्रोत कडून

<poem> श्रीगणेशाय नमः ॥

जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा । जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥

देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास । सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥

पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य । पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥

म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी । धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥

म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा । काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥

तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन । या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥

सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत । कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥

तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई । अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥

पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा । आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥

कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजला करी । दासगणू हा घ्यावा पदरीं । हेंच आहे मागणें ॥१०॥

तुझ्यावांचून मजप्रत । नाहीं वशिला जगतांत । अवघेंच तुझ्या हातांत । आहे कीं रे पांडुरंगा ॥११॥

श्रोते आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण । तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥१२॥

एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची । त्याच्या दुःखसंकटांची । होळीच होते निःसंशय ॥१३॥

बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर । एक होता मजूर । हाताखालीं गवंडयांच्या ॥१४॥

तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकीं झोक गेला । तीस फुटांवरुन पडला । खालीं घडीव दगडावर ॥१५॥

तो पडतां लोकांनीं पाहिला । जन म्हणती मेला मेला । उंचावरुन खालीं पडला । आतां कशाचा वांचे तो ? ॥१६॥

परी घडलें अघटित । कोठें न लागलें त्याप्रत । जैसा चेंडू झेलितात । तैसें त्यांचें जाहलें ॥१७॥

सोपानसाह्यें ज्यापरी । जन उतरती भूमीवरी । तेथें झालें त्याचपरी । त्या मजुराकारणें ॥१८॥

मजूर म्हणे लोकांला । माझा जेव्हां झोक गेला । तेव्हां एकानें धरलें मला । पडतां पडतां करास ॥१९॥

पाय भूमीसी लागतां क्षणीं । तो न दिसला मजलागुनी । हें वृत्त ऐकुनी । लोक अवघे आनंदले ॥२०॥

अभिश्राप कोणाचा । समर्थ ना घेती साचा । हा योग पडण्याचा । दैवानेंच आला तुज ॥२१॥

या तुझ्या पडण्यानें । स्पर्श केला समर्थानें । तुझ्या कराकारणें । ऐसें भाग्य कोणाचें ? ॥२२॥

असो एक बाई रजपुताची । जयपुराहून आली साची । बाधा होती भूताची । तया अबलेकारणें ॥२३॥

तिसी जयपूर ग्रामाला । दत्तात्रयाचा दृष्टान्त झाला । तूं या रामनवमीला । जाई शेगांवाकारणें ॥२४॥

तेथें संत जागती ज्योत । श्रीगजानन सद्‌गुरुनाथ । ते या तुझ्या पिशाच्याप्रत । मुक्ति देतील निःसंशयें ॥२५॥

या दृष्टान्तेंकरुन । आपुल्या दोन मुलांसी घेऊन । रामनवमीसाठीं जाण । बाई आली शेगांवा ॥२६॥

प्रतिपदेपासून भला । उत्सवासी आरंभ झाला । अफाट समुदाय मिळाला । नवमीस श्रोते शेगांवीं ॥२७॥

काम सभामंडपाचें । चाललें होतें तेथ साचें । खांब मोठमोठे दगडाचे । उभे केले असती ॥२८॥

दीड फूट जाडीचा । पांच फूट लांबीचा । प्रत्येक खांब दगडाचा । ऐसे होते किती तरी ॥२९॥

उत्सवाच्या निमित्त भलें । काम भक्तांनीं बंद केलें । खांब होते बसविलेले । नुसते मात्र ते ठाईं ॥३०॥

श्रीरामाचा जन्म झाला । प्रसादासाठीं लोटला । जनांचा तो समुदाय भला । तो न मसी वर्णवे ॥३१॥

त्या गर्दीत ही बाई । उभी खांबास एक्या पायीं । होती तिला सोसली नाहीं । गर्दी ती यत्किंचित ॥३२॥

म्हणून खांबाच्या आश्रया । गेली निर्भय व्हावया । गर्दी ती चुकवावया । परी झालें विपरीत ॥३३॥

तोच खांब कोसळला । तिच्या शरीरा पडला । तो पहातां लोकांला । ऐसें वाटूं लागलें ॥३४॥

तिचा बहुतेक गेला प्राण । ही बाई कोठील कोण ? । लहान मुलें दिसतीं दोन । खांबाखालीं येधवां ॥३५॥

दहावीस जणांनीं । खांब काढिला अंगावरुनी । पाणी मुखांत घालोनी । लोबोकडे पाठविलें ॥३६॥

ही लोबो डाँक्टरीण । शस्त्रविद्येंत अतिप्रवीण । ही जातीनें ख्रिश्चन । भक्त येशू ख्रिस्ताची ॥३७॥

तिनें ह्या रजपूतिणीला । रीतीप्रमाणें उपचार केला । लोबो म्हणे ना लागला । मार इला कोठेंच ॥३८॥

हें आश्चर्य खरोखर । खांब दगडाचा होता थोर । त्याच्या खालीं शरीर । सुरक्षित रहावें कसें ॥३९॥

आश्चर्य वाटलें लोकांला । प्राण बाईचा वांचला । हा जो कांहीं प्रकार झाला । तो घडला इतुक्यास्तव ॥४०॥

खांब पाडून अंगावरी । भूत जें होतें शरीरीं । त्या भूतास मुक्ति खरी । दिधली त्या गजाननें ॥४१॥

बाई होऊन पूर्ववत । गेली जयपूर शहराप्रत । नांदूं लागली आनंदांत । ऐसा प्रभाव स्वामीचा ॥४२॥

ऐसेंच एका उत्सवाची । नाईक नवर्‍याच्या मस्तकांसी । सोडीत असतां मंडपासी । लाकडी गोल पडला हो ॥४३॥

तोही गोल थोर होता । परी स्वामीची अगाध सत्ता । कोठेंही ना आघात होतां । नाईक नवरा वांचला ॥४४॥

पुत्र कृष्णाजी पाटलाचा । रामचंद्र नांवाचा । परमभक्त समर्थांचा । एक असे शेगांवीं ॥४५॥

एके दिवशीं त्याच्या घरीं । येते झाले साक्षात्कारी । ऐन दुपारच्या अवसरीं । गोसाव्याच्या रुपानें ॥४६॥

भूक लागलि मला देखा । अन्न कांहीं देतां कां ? । ऐसें म्हणून मारिली हांका । रामचंद्र पाटलातें ॥४७॥

पाटील मूळचा भाविक । त्याची वाटलें कौतुक । गोसाव्याची ऐकून हांक । दारामाजीं पातला ॥४८॥

निरखून पाहातां गोसाव्यासी । तों ते असावे पुण्यराशी । स्वामी गजानन निश्चयेंसी । ऐसें त्याला वाटलें ॥४९॥

गोसाव्याचा धरुन हात । आला घेऊन घरांत । दिला बसण्या पाट । पूजा केली पायांची ॥५०॥

गोसावी म्हणे पाटलाला । आज मी मुद्दाम आलों मुला । कांहीं तुज सांगण्याला । तें तूं ऐके मनापून ॥५१॥

कर्जाची न चिंता करी । तें फिटून जाईल निर्धारीं । अरे उन्हाळ्यांत गोदावरी । थोडी कोरडी पडतसे ॥५२॥

तैसाच हाही प्रकार । संपन्नतेचा येईल पूर । कृपाघन वर्षल्यावर । श्रीहरीचा समज हें ॥५३॥

उष्टें माझे जें ठायीं । पडेल बापा तें ठाईं । कशाचेंही कधीं पाही । कमी नाहीं पडणार ॥५४॥

आण ताट वाढून । सुग्रास देईं भोजन । मर्जी असल्या पांघरुण । घाल एखादें अंगावरी ॥५५॥

पूजा अन्न दक्षिणा । याचकांसी दिल्या जाणा । तें पावतें नारायणा । येविषयीं शंका नसे ॥५६॥

परी तो याचक । आधीं पाहिजे शुद्ध देख । त्यावांचून हें कौतुक । होणार नाहीं कधींही ॥५७॥

आणलें ताट वाढूनी । गोसावी जेवला प्रेमानीं । पांच रुपये पाटलांनीं । दक्षिणा ठेविली त्याच्या करां ॥५८॥

तैं गोसावी म्हणाला । ही दक्षिणा नको मला । तूं पाहिजे कारभार केला । गजाननाच्या मठांत ॥५९॥

तीच दक्षिणा मागण्यासी । मी आलों तुझ्यापासीं । ती आनंदें देईं मसी । म्हणजे कल्याण होईल ॥६०॥

समर्थसेवेची दक्षिणा । देऊन तुष्टवी माझ्या मना । योग्य मनुष्य तुझ्याविणा । कोणी न येथें सांप्रत ॥६१॥

तुझी कांता आजारी । वरचेवरी पडते जरी । तीही होईल बापा परी । ही दक्षणा दिल्यानें ॥६२॥

बोलाव तुझ्या पुत्राप्रत । त्याच्या कंठीं एक ताईत । बांधितों म्हणजे चेटूकभूत । याचीन बाधा होय त्यासी ॥६३॥

का कीं ही जमेदारी । कठीण आहे भूमीवरी । पाण्याशींच पाणी वैरी। ये ठाईं होत असे ॥६४॥

पाटीलकीचें तुझें वतन । हें वाघाचें पांघरुण । त्याचा उपयोग करणें जाण । अति जपून रामचंद्रा ॥६५॥

द्वेषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये । राजाविरुद्ध जाऊं नये । उगीच भलत्या कामांत ॥६६॥

साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून । दांभिकांच्या नादीं जाण । कदापीही लागूं नये ॥६७॥

हीं व्रतें पाळल्यास । तुझा ऋणी श्रीनिवास । होईल या वचनास । असत्या माझ्या मानूं नको ॥६८॥

आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी । साधुसंत येतां घरीं । विन्मुख त्याला लावूं नये ॥६९॥

अपमान खर्‍या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा । होतसे बापा साचा । संतचरणीं प्रेमा धरीं ॥७०॥

आपल्या वंशजाचें उणें । पाहूं नये कदा मनें। सोयर्‍याधायर्‍यांकारणें । समयानुसार मान द्यावा ॥७१॥

कोप असावा बाह्यात्कारी । दया असावी अंतरीं । जैसें का तें फणसावरी । कांटे आंत गोड गरे ॥७२॥

मी तुझ्या पाठीस । आहे जाण रात्रंदिवस । ताईत बांधून कंठास । गोसावी जाऊं लागला ॥७३॥

दाराबाहेर जातां भला । अंतर्धान पावला । पाहातां पाहातां झाला । दिसेनासा रस्त्यांत ॥७४॥

पाटील अवघ्या दिवसभर । मानसीं करी विचार । हा गोसावी कोणी इतर । नसावा ऐसें वाटतें ॥७५॥

श्रीगजाननस्वामी मला । आले उपदेश करायाला । घेऊन गोसावीवेषाला । हें आतां समजलें ॥७६॥

रात्रीं स्वप्नीं येऊन । संशय केला निरसन । ऐसें स्वामीगजानन । भक्तवत्सल खरोखरी ॥७७॥

श्रीगजानन चरित्र । तारक असोनी परमपवित्र । अनुभव येण्या मात्र । सबळ निष्ठा पाहिजे ॥७८॥

या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां ही तुम्ही ऐका । वेळ उगा दवडूं नका । पूर्ण व्हावें सावधान ॥७९॥

प्रथमाध्यायीं मंगलाचरण । देवगुरुचें वंदन । केलें पुढें निवेदन । गजाननाच्या पूर्वचरिता ॥८०॥

माघमासीं सप्तमीसी । समर्थ आले शेगांवासी । देवीदासाच्या सदनापासीं । दिसते झाले प्रथमतः ॥८१॥

बंकटलाल दामोदर । दोन होते चतुर नर । त्यांनीं परीक्षा अखेर । केली गजाननाची ॥८२॥

कथा द्वितीयाध्यायांत । येणेंपरी आहे सत्य । गोविंदबुवाच्या कीर्तनांत । महाराज येऊन बैसले ॥८३॥

पितांबर शिंप्याला । रस्त्यांत चमत्कार दाविला । बंकटलालाच्या घराला । महाराज गेले शेवटीं ॥८४॥

कथा तृतीयाध्यायाला । गोसाव्यानें नवस केला । गांजाचा श्रीसमर्थाला । पाजण्याचा विबुध हो ॥८५॥

त्याची इच्छा पुरविली । प्रथा गांजाची पडली । तेथपासोनी भली । शेगांवचे मठांत ॥८६॥

जानराव देशमुखाचें । गंडांतर टाळिलें साचें । देऊन तीर्थ पायांचें । आपुलें तें स्वामींनीं ॥८७॥

मृत्यूचे ते प्रकार । तेथें कथिले सविस्तर । तुकारामासी दिला मार । ढोंग करितो म्हणोनी ॥८८॥

कथा चतुर्थाध्यायाठायीं । येणें रीतीं असे पाही । जानकीरामें दिला नाहीं । विस्तव चिलमीकारणें ॥८९॥

किडे पडले चिंचवण्यांत । अन्न गेलें वायां सत्य । सोनारानें जोडून हात । केली विनंती समर्थांला ॥९०॥

त्याचा अपराध क्षमा केला । पूर्ववत्‌ केले चिंचवण्याला । जानकीराम भक्त झाला । ते दिवसापासून ॥९१॥

होते दोन कान्होले । उतरंडीसी ठेविलेले । तेच समर्थें मागितले । खाया चंदू मुकिंदासी ॥९२॥

चिंचोलीच्या माधवाला । यमलोक दावून मुक्त केला । शिष्याहातें करविला । थाट वसंतपूजेचा ॥९३॥

कथा पंचमाध्यायांत । महाराज पिंपळगांवांत । बसले शंकराच्या मंदिरांत । पद्मासन घालोनियां ॥९४॥

गुराख्यांनीं पूजा केली । गांवची मंडळी तेथें आली । महाराजांसी घेऊन गेली । पिंपळगांवाकारणें ॥९५॥

हें कळलें बंकटलाला । तो पिंपळगांवास गेला । महाराजासी आणण्याला । परत शेगांवाकारणें ॥९६॥

समर्थासी आणले परत । कांहीं दिवस राहून तेथ । पुन्हां गेले अकोलींत । भास्करासी तारावया ॥९७॥

कोरडया ठणठणीत विहिरीला । जिवंत झरा फोडीला । एका क्षणांत आणिलें जला । त्या कोरडया विहिरी ठायीं ॥९८॥

भास्कराची उडवलि भ्रांती। घेऊन आले तयाप्रती । शेगांवास गुरुमूर्ति । ही कथा पंचमांत ॥९९॥

षष्ठाध्यायीं ऐसी कथा । बंकटलालें सद्‌गुरुनाथा । मक्याचीं कणसें खाण्याकरितां । नेलें आपुल्या मळ्यांत ॥१००॥

गांधीलमाशा उठल्या तेथ । लोक होऊन भयभीत । पळूं लागले असती सत्य । जीव आपुला घेऊनी ॥१॥

बाधा गांधीलमाश्यांची । महाराजा न झाली साची । घेतली असे शिष्यत्वाची । परीक्षा बंकटलालाची ॥२॥

नरसिंगजीस भेटण्याला । स्वामी गेले अकोटाला । जो नरसिंगजी होता भला । शिष्य कोतशा अल्लीचा ॥३॥

कांहीं दिवस राहिले । अकोटामाजीं भले । नरसिंगजीसी हितगुज केलें । बंधु आपुला म्हणून ॥४॥

चंद्रभागेच्या तीरीं । शिवरग्रामाभीतरीं । कृपा व्रजभूषणावरी । केली असें जाऊन ॥५॥

मारुतीच्या मंदिरांत । श्रावणमासाच्या उत्सवांत । समर्थ आले राहण्याप्रत । येथें षष्ठमाची पूर्तता ॥६॥

गांवींची पाटीलमंडळी । अवघी आडदांड होती भली । हमेश होई बोलाचाली । त्यांची समर्थाबरोबर ॥७॥

हरि पाटलासवें भले । महाराज कुस्ती खेळले । मल्लविद्येचें दाविलें । प्रत्यंतर बहुताला ॥८॥

उंसाचा चमत्कार । दाऊनियां साचार । अभिमानाचा परिहार । केला पाटील मंडळींच्या ॥९॥

भिक्यानामें दिला सुत । खंडू कडताजी पाटलाप्रत । आम्रभोजनाचें व्रत । चालविण्यास कथिलें पाटलाला ॥११०॥

ऐशा कथा सप्तमाध्यायीं । कथन केल्या आहेत पाही । निष्ठा समर्थांच्या ठायीं । जडली पाटीलमंडळींची ॥११॥

कथा आहे अष्टमांत । दुफळी पाटील देशमुखांत । अर्ज दिधला सरकारांत । महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ॥१२॥

खंडूवरी बालंट आलें। तें समर्थांनीं नासिलें । निर्दोष सुटते झाले । खंडू पाटील खटल्यांतून ॥१३॥

तेलंगी ब्राह्मणाला । वेद म्हणून दाखविला । आपण कोण हा कळविला । सहज लीलेनें समाचार ॥१४॥

कृष्णाजीच्या मळ्याशीं । महाराज राहिले छपरासी । मंदिराच्या सान्निध्यासी । चंद्रमौळी हराच्या ॥१५॥

ब्रह्मगिरी गोसाव्याला । अभिमानविरहित केला । "नैनं छिन्दन्ति" श्र्लोकाला । रहस्यासह सांगून ॥१६॥

जळत्या पलंगाच्यावर । महाराज बसते झाले स्थिर । न जाळे वैश्वानर । केव्हांही खर्‍या संताला ॥१७॥

कथा नवमाध्यायाला। द्वाड घोडा शांत केला । खूण नवस करणाराला । दिली असे गांजाची ॥१८॥

दासनवमीचे उत्सवासी। समर्थ बाळापुरासी । घेऊन आपल्या शिष्यांसी । बाळकृष्णाच्या घरां गेले ॥१९॥

बाळकृष्णालागून । करविलें समर्थाचें दर्शन । संशयरहित केलें मन । तया रामदास्याचें ॥१२०॥

दशमाध्यायीं सुरेख । उमरावतीचें कथानक । उपरति झाली पुरी देख । तेथें बाळाभाऊला ॥२१॥

गणेश आप्पा चंद्राबाई । यांनीं अर्पिला संसार पाईं । भावभक्तीनें लवलाही । श्रीगजाननस्वामीच्या ॥२२॥

गणेश दादा खापडर्याला । शुभ आशीर्वाद दिधला । छत्रीनें मारुन बाळाला । परीक्षा त्याची घेतली ॥२३॥

द्वाड गाय सुकलालाची । अति गरीब केली साची । दांभिक भक्ति घुडयाची । कशी ती कथन केली ॥२४॥

एकादशाध्यायीं कथन । भास्करासी डसला श्वान । आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन । गोपाळदासा भेटले ॥२५॥

झ्यामसिंगाच्या विनंतीसी । देऊन मान अडगांवासी । येते झाले पुण्यराशी । श्रीगजाननमहाराज ॥२६॥

निजधामा भास्कर गेला । त्याचा देह ठेविला । द्वारकेश्वरासन्निध भला । सतीबाईचे शेजारीं ॥२७॥

आज्ञा केली कावळ्यांला । तुम्ही न यावें या स्थला । वांचविले गणु जवर्‍याला । सुरुंग उडतां विहिरींत ॥२८॥

शेट बचुलालाची । कथा द्वादशाध्यायीं साची । मूर्ति निरिच्छपणाची । प्रत्यक्ष होते महाराज ॥२९॥

स्वामीचें वस्त्र नेसला । पितांबर शिंपी कोंडोलीला । स्वइच्छेनें येता झाला । परमभक्त होता जो ॥१३०॥

पितांबरानें कोंडोलीसी । बळिरामाच्या शेतासी । वठलेलिया आंब्यासी । पानें फळें आणविलीं ॥३१॥

पितांबर राहिला कोंडोलींत । तेथेंच झाला समाधिस्थ । नव मठ झाला स्थापित । शेगांवीं समर्थ इच्छेनें ॥३२॥

विचार करुनी मानसीं । बसून रेतीच्या गाडीसी । महाराज नव्या मठासी। आले जुन्या मठांतून ॥३३॥

झ्यामसिंगानें मुंडगांवाला । नेलें गजाननस्वामीला । पर्जन्यानें घोटाळा । भंडार्‍याचा केला असे ॥३४॥

झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट समर्था अर्पिली । पुंडलिकाची निमाली । गांठ प्लेगची श्रीकृपें ॥३५॥

कथाभाग तेराव्याचा । महारोग गोसाव्याचा । हरण गंगाभारतीचा । केला असें गजाननें ॥३६॥

बंडुतात्यासी भाग्य आलें । भूमींत धन सांपडलें । कर्जापासून मुक्त केलें । समर्थानें निजकृपें ॥३७॥

नर्मदेच्या स्नानास । सोमवती अमावास्यास । नौका फुटतां छिद्रास । हात लाविला नर्मदेनीं ॥३८॥

विडा माधवनाथाला । शिष्याहातीं पाठविला । या कथा चवदाव्याला । वर्णिल्या असती साकल्यें ॥३९॥

अध्याय तो पंधरावा । शिवजयंतीचा आहे बरवा । आले अकोले नामक गांवा । टिळक बाळ गंगाधर ॥१४०॥

भाकरी प्रसाद पाठविला । कोल्हटकराचे हस्तें भला । मुंबईंत लोकमान्याला । ग्रहण करायाकारणें ॥४१॥

श्रीधर गोविंद काळ्यास । करिते झाले उपदेश । नको जाऊं विलायतेस । येथेंच आहे सर्व कांहीं ॥४२॥

कथा ऐशा सोळाव्यासी । पुंडलीक अंजनगांवासी। जातां निवारिले त्यासी । येऊनिया स्वप्नांत ॥४३॥

पादुकाचा प्रसाद त्याला । झ्यामसिंगहस्तें पाठविला । कवराच्या भाजीभाकरीला । ग्रहण केलें आनंदें ॥४४॥

छरा तुकारामाचा । कानामधून पडला साचा । ह्या अशा कथांचा । समावेश सोळाव्यांत ॥४५॥

सतराव्यांत कथा सुरस । विष्णूसाच्या घरास । जाया मलकापुरास । समर्थ निघाले गाडींतून ॥४६॥

नग्न फिरती म्हणूनी । खटला भरला पोलिसांनीं । केवळ अहंपणानीं । सत्पुरुषासी त्रास द्याया ॥४७॥

महताबशा सांईला । पाठवून दिलें पंजाबाला । हिंदुयवनांविषयीं केला । कळकळीचा बोध त्यासी ॥४८॥

बापुरावाच्या कांतेसी । भानामती न मानी साची । भेट गंगाभागीरथीसी । झाली अकोटीं विहिरींत ॥४९॥

कथा बायजा माळणीची । अठराव्यामाजीं साची । कवर डाँक्‍टरच्या फोडाची । कथा यांत ग्रथित असे ॥१५०॥

महाराज गेले पंढरीला । घेऊन अवघ्यां लोकांला । तेथें बापुना काळ्याला । दर्शन हरीचें करविलें ॥५१॥

कवठे बहादुरचा वारकरी । मरीनें झाला आजारी । त्यास घटकेमाझारीं । समर्थानें बरें केलें ॥५२॥

एक्या कर्मठ ब्राह्मणाला । श्वान उठून मेलेला । दाऊन त्याचा गलित केला । कर्माभिमान श्रोते हो ॥५३॥

कथा एकोणविसाव्यासी । दिला काशीनाथपंतासी । आशीर्वाद तो अतिहर्षी । तो येता दर्शना ॥५४॥

गोपाळ मुकिंद बुटी भला । नागपुरासी घेऊन गेला । श्रीगजाननस्वामीला । आपुल्या गेहाकारणें ॥५५॥

त्याच्या मनीं ऐसा हेत । महाराज ठेवावें नागपुरांत । परी हरि पाटलांनीं परत । आणिले समर्थ शेगांवीं ॥५६॥

धार-कल्याणचे रंगनाथ । साधु आले भेटण्याप्रत । समर्थासी शेगांवांत । ऐसे आणि कितीतरी ॥५७॥

श्रीवासुदेवानंद सरस्वती । जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति । दृष्टादृष्ट होतां नुसती । आनंद झाला उभयतातें ॥५८॥

तेव्हां बाळाभाऊला । जो कां होता संशय आला । तो समर्थांनीं निवटिला । करुनियां उपदेश॥५९॥

केलें खळ्याचें संरक्षण । गाढवाचे पासून । समर्था मारितां आलें मरण । नारायणासी बाळापुरीं ॥१६०॥

गजाननाचे कृपें भलें । जाखडयाचें लग्न झालें । कपीलधारेसी दिधलें । दर्शन निमोणकराला ॥६१॥

तुकारामें आपुला । पुत्र समर्था वाहिला । नारायण नामें भला । सेवा करावयाकारणें ॥६२॥

पंढरीतें जाऊन । विठ्ठलातें विचारुन । महाराज आले परतून । शेगांवाकारणें ॥६३॥

पुढें भाद्रपदमासासी । ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं । आधुनिक कालाचा हा ऋषि । समाधिस्त जहाला ॥६४॥

विसाव्यामाजीं इतर । श्रींची समाधि झाल्यावर । जे का घडले चमत्कार । त्यांचें वर्णन केलें असे ॥६५॥

जे जे भाविक भक्त कोणी । त्यांना त्यांना अजुनी । दर्शन देती कैवल्यदानी । त्यांच्या इच्छा पुरवून ॥६६॥

आतां हा एकविसावा । अवघ्या कथेचा कळस बरवा । अवघ्यांचा लेखावा । तुम्ही सार श्रोते हो ॥६७॥

प्रत्यक्षापरी प्रकार । येथें होती वरच्यावर । म्हणून म्हणणें आहे सार । अवघ्यांचें या अध्याया ॥६८॥

वर्गणीच्या जोरें भलें । समाधीचें काम झालें । मनापासून भक्त झटले । वर्गणी गोळा कराया ॥६९॥

ऐसें भव्य सुंदर । काम कोठें न भूमीवर । धर्मशाळा चौफेर । चहूं बाजूंनीं बांधिल्या ॥१७०॥

या भव्य कामाला । बहुतांनीं हात लाविला । त्यांचीं नांवें तुम्हांला । सांगतां ग्रंथ वाढेल ॥७१॥

मुख्य जे होते त्यांतून । त्यांचीं नांवें करितों कथन । कुकाजीचा नंदन । हरी पाटील नाम ज्याचें ॥७२॥

सांगवी गांवचा बनाजी । उमरीचा तो गणाजी । बटवाडीचा मेसाजी । लाडेगावचा गंगाराम ॥७३॥

भागू, नंदू, गुजाबाई । अकोल्याची बनाबाई । सुकदेव पाटलाची ती आई । यांनीं हजारों रुपये दिले ॥७४॥

पाटील रामचंद्र कृष्णाजी । दुसरा दत्तु भिकाजी । पळसखेडचा सुखदेवजी । मार्तन्ड गणपती शेगांवचा ॥७५॥

बालचंद्राचा रतनलाल । पंचगव्हाणचा दत्तुलाल । त्याच गांवींचा बिसनलाल । अंबरसिंग टाळकीचा ॥७६॥

किसन बेलमंडळेकर । विठोबा पाटील चावरेकर । हसनापुरचा राहणार । गंगाराम नाम ज्याचें ॥७७॥

या दानशूरांनीं । मोठमोठया रकमा देऊनी । केली मठाची उभारणी । भक्तिस्तव समर्थांच्या ॥७८॥

कोठया कचेरी स्वैंपाकघरें । सोपे उत्तम प्रकारें । बांधिले असती साजिरे । समाधीच्या चौफेर ॥७९॥

लोकांनीं ज्या देणग्या दिल्या । त्या बांधकामीं जिरुन गेल्या । परी पुष्कळ गोष्टी राहिल्या । बांधण्याच्या अवशेष ॥१८०॥

त्यासाठीं युक्ति केली । वर्गणी जमवण्यासाठीं भली । योजना ती ऐशी झाली । ती ऐका विबुध हो ॥८१॥

बसविला शेतसार्‍यावर । समर्थांचा धार्मिक कर । कोणासी न करितां जोर । रुपयामागें एक आणा ॥८२॥

तैशीच बाजारपेठेशीं । धान्य अथवा कपाशी । जी येईल विकायासी । पट्टी बसविली त्यावर ॥८३॥

गाडीमागें अर्धा आणा । हर्ष वाटे देतांना । कां कीं समर्थांच्या चरणां । निष्ठा होती सर्वांची ॥८४॥

समाधीपुढें स्वाहाकार । होऊन गेले अपार । परी त्यांतून मोठे चार । सर्वश्रुत जाहले ॥८५॥

शतचंडीचें अनुष्ठान । ब्राह्मणांच्या करवीं जाण । केलें आदरेंकरुन । किसनलाल शेठजीनें ॥८६॥

अनुष्ठान शतचंडीचें । करणें अति अवघड साचें । अधिकशून्य ना खपायाचें । जगदंबे कालिकेस ॥८७॥

कांहीं चुकतां विधानांत । तात्काळ होतें विपरीत । काम्य अनुष्ठानाप्रत । भीति चहूं बाजूंनीं ॥८८॥

वडील किसनलालाचा । बंकटलाल नांवाचा । भक्त होता समर्थांचा । एकनिष्ठ पहिल्यापून ॥८९॥

पूर्ण आहुतीच्या दिवशीं । त्या बंकटलाल भक्तासी । व्याधि उद्भवली शरीरासी । प्राणांताचा समय आला ॥१९०॥

लोक गेले घाबरुन । म्हणती हें काय आलें विघ्न । शतचंडीचें अनुष्ठान । करतां विपरीत व्हावें कां ? ॥९१॥

बंकटलाल म्हणे पुत्रासी । भिऊं नकोस मानसीं । माझा तारिता पुण्यरासी । समाधीसी बसलासे ॥९२॥

तो अवघें करील बरें । नका होऊं बावरें । पूर्ण आहुतीचें काम सारें । घ्यावें सशास्त्र उरकून ॥९३॥

माझा स्वामी गजानन । येऊं न देई कदा विघ्न । भक्ताचें करण्या संरक्षण । मुळींच बसला येथें तो ॥९४॥

तेंच पुढें सत्य झालें । व्याधीचें स्वरुप मावळलें । एका बाईचें निमालें । भूत शतचंडींत या ॥९५॥

बनाजी तिडके सांगवीकर । यांनीं केला स्वाहाकार । कसुर्‍याची रहाणार । गुजाबाई नाम जिचें ॥९६॥

चापडगांवींचा वामन । शामरावाचा नंदन । यांनींही एक यज्ञ । केला समाधीच्या पुढें ॥९७॥

ऐसीं धर्मकृत्यें किती तरी । झालीं समर्थासमोरी । खरे खरेच साक्षात्‌कारी । श्रीगजाननमहाराज ॥९८॥

यावत्‌ कालपर्यंत । लोक होते निष्ठावंत । तावत्‌ कालपर्यंत । वर्‍हाड होता सुखी बहु ॥९९॥

जसजसी निष्ठा कमी झाली । तों तों विपन्न दशा आली । अवदसेनें घातली । माळ कंठीं वर्‍हाडाच्या ॥२००॥

विपुल पिकणें टाकिलें । काश्यपीनें पहा भले । नवे वाहूं लागले । वारे सर्व वर्‍हाडांत ॥१॥

वर्‍हाडाची ऐसी दैना । समर्थांसी पाहवेना । म्हणून घेतलें आपणां । कोंडोनीं त्यांनीं जलांत ॥२॥

तीस फुटांपासून । पाया आणिला भरुन । तेथेंच कां हें जीवन । निर्माण व्हावें श्रोते हो ॥३॥

म्हणून ऐसें वाटतें । राग आला समर्थांतें । म्हणून त्यांनीं जलातें । भोंवतीं केलें निर्माण ॥४॥

सुखसंपन्न पहिल्यापरी । वर्‍हाड व्हावा निर्धारी । ऐसें चित्तांत असल्या जरी । या वर्‍हाडी जनांच्या ॥५॥

तरी त्या अवघ्या जनांनीं । श्रीगजाननाच्या चरणीं । पूर्ववत् निष्ठा ठेवूनी । सुखालागीं अनुभवावें ॥६॥

ऐसें न जरी करतील । तरी याहीपेक्षां येईल । वर्‍हाडासी बिकट काळ । याचा विचार करा हो ॥७॥

गजाननपदीं निष्ठा ठेवा । सुख-अनुभव सर्वदा घ्यावा । कुतर्कासी मुळीं न द्यावा । ठाव आपुल्या मानसीं ॥८॥

या गजाननरुप जमिनींत । जें जें कांहीं पेराल सत्य । तें तें मिळणार आहे परत । बहुत होऊन तुम्हांला ॥९॥

दाणे टाकिल्या खडकावरी । त्यांचीं न रोपें होतीं खरीं । याचा विचार अंतरीं । सर्व काळ करा हो ॥२१०॥

कंटाळा संतसेवेचा । ज्या ज्या प्रांता येत साचा । त्या त्या प्रांतीं दुष्काळाचा । प्रादुर्भाव होतसे ॥११॥

धर्मश्रद्धा ही वाघीण । गेल्या मनरुपी दरींतून । दुर्वासनेचे कोल्हे जाण । येऊन बसतील ते ठायां ॥१२॥

भक्ति शुचिर्भूत अंगना । अभक्ति वारांगना । तिच्या नादीं लागल्या जाणा । विटंबनाच सर्वत्र ॥१३॥

सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका । शत्रु न माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ॥१४॥

ऐसें तुम्ही वागल्यास । येतील चांगले दिवस । या वर्‍हाड प्रांतास । हें कधींहि विसरुं नका ॥१५॥

एकदां तरी वर्षांतून । घ्यावें गजाननाचें दर्शन । एकदां तरी पारायण । करा गजाननचरित्राचें ॥१६॥

हा एकवीस अध्यायांचा । गजाननविजय नांवाचा । नैवेद्य एकवीस मोदकांचा । गजाननासी अर्पा हो ॥१७॥

वा हे अध्याय साचार । माना एकवीस दुर्वांकुर । पारायणरुपें निरंतर । वाहाव्या गजाननासी ॥१८॥

सद्‌भाव जो मानवाचा । तोच दिवस चतुर्थीचा । प्रेमरुपी चंद्राचा । उदय झाला पाहिजे ॥१९॥

मग या ग्रंथाचें अक्षर । एकेक हें दुर्वांकुर । अर्थ शब्दाचा साचार । मोदक समजा विबुध हो ॥२०॥

तो अर्पून गजानना । पारायणरुपी पारणा । साधून घ्यावा करा ना । वेळ आतां थोडकाही ॥२१॥

हा ग्रंथ ना कादंबरी । ती गजाननाची लीला खरी । येथें जो अविश्वास धरी । तो बुडेल निःसंशय ॥२२॥

श्रीगजाननस्वामी चरित्र । जो नियमें वाचील सत्य । त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥२३॥

हें गजाननचरित्र भागीरथी । कथा या तोय निश्चिती । महाराष्ट्र ओंव्या तयावरती । लहरी समजा विबुध हो ॥२४॥

वा कल्पवृक्ष हें स्वामीचरित्र । शाखा अध्याय तयाप्रत । पद्मरचना हीच सत्य । पालवी या वृक्षाची ॥२५॥

जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥२६॥

हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी । दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥२७॥

जेथें गजाननचरित्राचा । पाठ होईल नित्य साचा । तेथें वास लक्ष्मीचा । चिरकाल होईल हो ॥२८॥

दारिद्रयासी मिळेल धन । रोगीयासी आरोग्य जाण । साध्वी स्त्रीचें वांजपण । फिटेल याच्या वाचनें ॥२९॥

निपुत्रिकासी होईल पुत्र । निष्कपटी मिळेल मित्र । चिंता न राहील अणुमात्र । या ग्रंथाच्या वाचका ॥२३०॥

दशमी एकादशी द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला । अनुपम येईल भाग्य त्याला । श्रीगजाननकृपेनें ॥३१॥

गुरुपुष्य योगावरी । जो याचें पारायण करी । बसून एक्या आसनावरी । राहूनियां शुचिर्भूत ॥३२॥

त्याच्या अवघ्या मनकामना । खचित होतील पूर्ण जाणा । कसल्याही असोत यातना । त्या त्याच्या निरसतील ॥३३॥

जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत । लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्म समंधाचा ॥३४॥

ऐसें याचें महत्त्व । ये भाविकाला प्रचीत । कुटिलदुष्टदुर्जनांप्रत । याचा अनुभव येणें नसे ॥३५॥

मानसाची योजना । राजहंसासाठीं जाणा । तैसें हें संतसज्जनां । मानस स्वामीचरित्र ॥३६॥

पूर्वकालीं ज्ञानेश्वर । मीरा मेहता कबीर । नामा सांवता चोखा महार । गोरा बोधला दामाजी ॥३७॥

उंबरखेडी ऐनाथ । सखाराम अंमळनेरांत । वा देव मामलेदार यशवंत । वा हुमणाबादी माणिकप्रभू ॥३८॥

तेवींच हा वर्‍हाडांत । गजाननस्वामी सद्‌गुरुनाथ । फरक नाहीं यत्किंचित । त्यांच्या यांच्या मधीं हो ॥३९॥

आतां हीच विनंति । तुम्हां अवघ्यां भाविकांप्रती । अत्यंत असूं द्यावी प्रीति । श्रीगजाननांचे चरणीं ॥२४०॥

म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार । होऊनियां व्हाल पार । दुस्तर भवामधूनी ॥४१॥

आतां स्वामी दयाघना ! । तुला येवो माझी करुणा । दासगणूच्या यातना । सकल निवारी कृपेनें ॥४२॥

मी तुझा झालों भाट । मार्ग दावी मला नीट । दुर्वासनेचा येतो वीट । चित्तामाजीं दयाळा ! ॥४३॥

आमरण वारी घडो । संतचरणीं प्रेमा जडो । अक्षय्यीचा वास घडो । श्रीगोदेच्या तीराला ॥४४॥

प्रसंग याचना करण्याचा । मशीं नको आणूंस साचा । समर्था दासगणूचा । अभिमान वाहावा मानसीं ॥४५॥

मी सकल संतांचा चरणरज । माझी राखा तुम्ही लाज । हेंचि मागणें आहे आज । पदर पसरुन तुम्हांतें ॥४६॥

जैसी केलीस प्रेरणा । तैसेंच मी वदलों जाणा । हे स्वामी गजानना ! । तुझें चरित्र लिहितां कीं ॥४७॥

शेगांवचे मठांत । कांहीं होतें कागदपत्र । ते रतनसातें मजप्रत । आणूनियां दाखविले ॥४८॥

त्यांच्या आधारें ग्रंथ लिहिला । कल्पनेच्या ना उपयोग केला । म्हणून अधिक न्यूनाला । मी नाहीं कारण ॥४९॥

झालें असल्या अधिकऊन । त्याची क्षमा गजानन । करो सर्वदा मजलागून । हीच आहे विनंती ॥२५०॥

शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत । चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥

हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला । तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । नौका होवो भाविकांप्रत । भवसिंधु तरावया ॥२५३॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥


॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥

॥ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ॥

॥ सीताकांतस्मरण जयजय राम ॥

॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥

॥समाप्त॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]